आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
क्रिकेट म्हटले की भारतातील प्रेक्षक तहान भूक विसरून जातात. आता प्रत्येकाच्या घरी टीव्ही आले पण पहिल्या काळी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक टीव्हीवर क्रिकेट मॅच लागली तर ती पाहण्यासाठी सगळे गाव जमा होत असायचा. कोणी फोर किंवा सिक्स मारला की सगळे जण एका सुरात “चिअर” करायचे आणि कोणाचा बळी गेला की प्रतिस्पर्धी संघाच्या नावाने टाळ कुटायला पण मागे पुढे बघत नसायचे. अशात भारत पाकिस्तान मॅच असली तर प्रेक्षकांच्या उत्साहाला मर्यादाच नसायची.
भारताची मॅच पाकिस्तानसोबत असो किंवा, दुसऱ्या कोणत्या संघासोबतची मॅच असो, प्रत्येकवेळी प्रमुख आकर्षण म्हणजे सचिन तेंडुलकरची फलंदाजी!
सचिन तेंडुलकर खेळायला आला की घरातील सर्वांचे डोळे टीव्हीकडेच असायचे. सचिन मैदानावर आला की भारत जिंकणार आणि तो आउट झाला कि भारत हारणार असे म्हणून टीव्ही बंद केले जायचे. त्याला क्रिकेटमधील देव समजला जाणारा काळ होता. सचिन तेंडुलकरच्या खेळण्यात एक वलय होते ज्याच्यामुळे सर्वजण त्याच्या फलंदाजीकडे डोळे लावून बसलेले असायचे.
भारतीय संघाकडून खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने पाकिस्तान संघाकडून क्षेत्ररक्षण केल्याचे तुम्ही ऐकले नसेल!
ती गोष्ट आहे १९८७ सालची. सचिन तेंडुलकर १४ वर्षांचा व्हायला ३ महिन्यांचा वेळ होती. त्या दिवशी सचिनच्या ध्यानीमनी नसताना पण पाकिस्तान संघाकडून खेळण्याची त्याला संधी मिळाली.
झालं असं की, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्या गोल्डन जुबलीचा कार्यक्रम साजरा केला जाणार होता आणि योगायोगाने सचिन क्लब क्रिकेटरच्या नात्याने मैदानावर हजर होता. गोल्डन जुबली कार्यक्रमानिमित्त दोन संघांच्या दरम्यान मैत्रीपूर्ण सामना खेळवला जाणार होता. हा मैत्रीपूर्ण सामना ज्या संघांमध्ये खेळवला जाणार होता त्यामध्ये इंडियन इलेव्हन विरुद्ध भ्रमणकारी पाकिस्तान या दोन संघांचा समावेश होता. यावेळी मैदानावर पाकिस्तान संघाकडून इम्रान खान कॅप्टन होता तर इंडियन संघाकडून हेमंत केंकरे हे कर्णधारपदाची भूमिका बजावत होते.
पाच सामन्यांच्या मालिकेमधील हा सामना ४० षटकांचा खेळवला जाणार होता. भारत पाकिस्तान संघाच्या या मैत्रीपूर्ण सामन्यामध्ये पाकिस्तान संघाला दोन क्षेत्ररक्षकांची निकड भासत होती. कारण त्यांच्या संघाकडून जावेद मियाँदाद आणि अब्दुल कादिर हे दोन खेळाडू हॉटेलवर आराम करायला गेले होते. पाकिस्तान संघाचा कर्णधार असणाऱ्या इम्रान खानपुढे आता हा प्रश्न उभा राहिला की या दोघांच्या जागेवर कोणाला संघामध्ये स्थान द्यायचे?
यावेळी मैदानावर अंडर १९ मध्ये खेळलेले कुसूब वसमानी आणि सचिन तेंडुलकर हे दोन खेळाडू उपस्थित होते. बदली खेळाडू म्हणून इम्रान खानने कुसूब वसमानीला संघात स्थान देण्यात यावे अशी मागणी हेमंत केंकरे यांच्याकडे केली. त्यांनी ती मागणी बिनशर्त मंजूर केली. त्यानंतर त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या सचिन तेंडुलकरने पण बदली खेळाडू म्हणून खेळण्यात रस दाखवला.
त्यावर इम्रान खानने हेमंत केंकरेंना विचारले की “हा पोरगा खरंच फिल्डिंग करू शकेल?” त्यावर त्यांनी हसून उत्तर दिले की, हा मुलगा खूप हुशार आहे. खऱ्या अर्थाने सचिन तेंडुलकरच्या अंतराष्ट्रीय कारकिर्दीला येथूनच सुरुवात झाली.
सचिन जेव्हा पहिली आंतरराष्ट्रीय मॅच पाकिस्तान संघाकडून खेळत होता तेव्हा कोणी हा विचार पण नव्हता केला की हाच पुढे जाऊन क्रिकेटमधील देव बनेल.
मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानावर खेळवली जाणारी ही मॅच सुरु झाली. भारताकडून कपिल देव मैदानावर उतरले होते. क्रिकेट सामन्यातील एका बॉलवर कपिल देव यांनी लांब फटका मारला. सचिन सीमारेषेवर असल्यामुळे हा फटका त्याच्या वरून जाणार तोच त्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याची उंची कमी पडल्यामुळे त्याला झेल घ्यायला जमले नाही. झेल घेता न आल्यामुळे सचिन हिरमुसला.
त्या वेळी कर्णधाराने मैदानावर जवळचे क्षेत्ररक्षण लावले नसल्यामुळेही सचिन नाराज झाला. त्या काळी सचिनचे मित्र राहिलेल्या मार्कस कांटो यांनी या संदर्भात एक किस्सा सांगितला आहे. भारत पाकिस्तान संघामधील मैत्रीपूर्ण मॅच संपवून जेव्हा भारतीय संघातील खेळाडू ट्रेनने घरी परतत होते तेव्हा ट्रेन मध्ये बसलेला सचिन झेल न पकडल्यामुळे नाराज दिसत होता. तेव्हा त्याचे मित्र मार्कस कांटो यांनी सचिनला समजावून सांगितले की, कपिल देवचा सीमारेषेवरील कॅच तुझ्या उंचीच्या खूप वरून गेला. त्या बॉलपर्यंत तुझी उंची न पुरल्यामुळे तुला झेल पकडता आले नाही. त्यामुळे तू नाराज होऊ नकोस.
यानंतर लवकरच सचिनने भारतीय संघाकडून खेळण्यास सुरुवात केली आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळख मिळवली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.