आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
तुम्ही एखाद्या व्यक्तीला समोरच्याचा राग आला म्हणून त्याला शाप दिल्याच्या कहाण्या तर खूप ऐकल्या असतील. रामायणातील अहिल्येच्या शापाची कथा तर प्रसिद्धच आहे. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की आत्ताच्या काळात देखील कोणी कोणाला शाप देतं तर तुम्ही विश्वास ठेवाल का..? आणि जर आम्ही तुम्हाला सांगितलं की हे चक्क महात्मा गांधींसोबत घडलंय तर..?
हो! एकदा एका मंदिरातल्या पंडिताने गांधीजींना शाप दिला होता…
झालं असं होतं की, गांधीजी नुकतेच आफ्रिकेहून भारतात परतले होते. भारतातील वातावरण, विविधता समजून घेण्यासाठी ते भारतभ्रमणावर होते. असेच ते फिरत फिरत वाराणसीला पोहोचले. पण त्यांचा तिथला अनुभव काही फार चांगला नव्हता. याबद्दल त्यांनी आपली आत्मकथा “माय एक्स्पेरीमेन्ट्स विथ ट्रुथ”मध्ये लिहून ठेवलंय.
१९१५ साली पुण्याहून गांधीजींनी आपल्या या यात्रेची सुरुवात केली. मंदिरांचं शहर वाराणसीला जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांचा फारच अपेक्षाभंग झाला. इतकं घाणेरडं शहर त्यांनी कधीच बघितलं नव्हतं. जागोजागी कचरा पडलेला. रस्त्यांवर घाणीमुळे चिखल जमा झालेला. हा सगळा प्रकार पाहून, वाराणसीच्या मंदिरांची अवस्था पाहून गांधीजींची मंदिरांवरील श्रद्धाच संपू लागली. त्यात काशी विश्वनाथाच्या मंदिरात तर एका त्यांना पंडिताने कमी दक्षिणा दिली म्हणून खरीखोटी सुनावली.
याचं वर्णन ते स्वतःच्या आत्मचरित्रात करतात. ते सांगतात,
“वाराणसीच्या गल्ल्या इतक्या लहान आणि घाणेरड्या होत्या की तिथे चालणं देखील अशक्य. सगळीकडे नुसता गोंधळ. घाणीमुळे जिकडेतिकडे माशा उडत होत्या. माणसांची गर्दी वेगळी. यात दुकानदारांचा कोलाहल. त्यांच्या वस्तू विकण्यासाठी चाललेला संघर्ष. मी मंदिरात पोहोचलो तेव्हा मुख्य दरवाज्यासमोर सडलेली फुलं पडली होती. या अशा सगळ्या वातावरणात देव कसा भेटेल? शांतपणे त्याचं दर्शन कसं घेणार? याच विचाराने माझं मन खिन्न झालं होतं”
तरीही ते दर्शनासाठी आत गेले. दर्शन घेतलं. त्यांनी दक्षिणा म्हणून एका आण्याचं नाणं दक्षिणा म्हणून दिली. पण तिथल्या पंडिताला एक आणं बघून भयंकर अपमानित झाल्यासारखं वाटलं. त्याने ते नाणं तर फेकून दिलंच, पण गांधीजींना उलट बोलून त्यांचा अपमानही केला.
तो त्यांना शाप देऊन म्हणाला, “देवाला इतकी कमी दक्षिणा देऊन तू देवाचा अपमान करतोयस. यासाठी तुला सरळ नरकात जावं लागेल.”
गांधीजींचा दक्षिणा वगैरे देण्याकडे फार कधी कल नव्हताच. तो लालची पंडित इतक्या वाईट पद्धतीने वागूनही त्यांनी त्याला अतिशय शांतापणे उत्तर दिलं. ते म्हणाले की, एका मंदिराच्या पुजाऱ्याला ही अशी भाषा शोभत नाही. मी एक आण्याच्या वर दक्षिणा देणार नाहीये. हवी असेल तर ठीक आहे नाही तर मी जातो.
एवढं ऐकल्यानंतर तर त्या पुजाऱ्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने गांधीजींना अजून चार गोष्टी ऐकवल्या, शिव्या दिल्या. गांधीजी तिथून निघून गेले. पण अर्थात माणसाची हाव, लालच कधीच कमी होत नसतो. त्याला तेवढा एक आणासुद्धा सोडायचा नव्हता. त्याने गांधीजींना पुन्हा बोलावून घेतलं. म्हणाला की, माझी इच्छा नाही देवाने तुझ्यासोबत काही बरं वाईट करावं म्हणून हा एक आणा मी स्वीकारतो.
गांधींनी तो एक आणा घेतला आणि खिन्नपणे तिथून निघून गेले. देवाच्या घरातील हा सगळा प्रकार पाहून त्यांना खूपच दुःख झाले होते. देवाच्या नावाखाली चालवलेली लुट, ढोंगीपणा या सगळ्याचीच त्यांना मनस्वी चीड होती.
असाच अनुभव त्यांना कोलकत्यातसुद्धा आला. तिथल्या कालीमातेच्या मंदिरात बकरीला बळी देणे हा प्रकार पाहून त्यांना शिसारी आली. गांधींनी कायमच स्वच्छतेवर जास्ती भर होता. आपल्या सगळ्या भाषणातून त्यांनी स्वच्छतेचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच श्रद्धास्थानी असणाऱ्या किळसवाण्या प्रकारांमुळे ते फारच खिन्न झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.