आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या भारत देशात उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांपैकी राजस्थान हे एक राज्य आहे. अत्यंत सुंदर प्रेक्षणीय स्थळे असणाऱ्या या राज्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या राज्यातले अनेक क्रांतिकारक आपल्याला माहिती असतीलच. राजस्थानमधला इतिहाससुद्धा माहिती असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका विशेष लढाईची माहिती देणार आहोत.
तुमचा विश्वास बसणार नाही पण १६४४ साली झालेली ही लढाई चक्क कलिंगडावरून झाली होती.
आजवरच्या इतिहासात ही जगातली एकमेव अशी लढाई आहे की जी फक्त एका फळावरून लढली गेली होती.
ही घटना आहे इसवी सण १६४४ सालची जेव्हा बिकानेरचं सिलवा गाव व नागौरचं जाखणिया नामक गाव समांतर असल्यासारखे होते. ही दोन्ही गाव बिकानेर संस्थान व नागौर संस्थानच्या सीमेवर होते.
आपल्याला आज आजूबाजूला शेजाऱ्यांचे आपसांत होणारे भांडण काही नवीन नाहीये, कितीतरी वेळा आपल्या परिसरात आपल्याला काही लोक क्षुल्लक कारणावरून भांडताना दिसत असतात. हे इथे सांगण्याचं कारण म्हणजे या लढाईचं कारण सुद्धा तसचं क्षुल्लकच होत. एक कलिंगडाचा वेल उगवतो, नंतर तो वेल पसरतो नंतर त्याला फळ लागतं व त्या फळावरून चक्क युद्ध होतं. या सगळ्याची कल्पना जरी करवत नसली तरी सुद्धा हे शंभर टक्के खरं आहे.
तर बिकानेर संस्थान व नागौर संस्थान या दोन संस्थानांमध्ये ही विचित्र लढाई लढण्यात आली होती. आणि झालं काय होतं तर एक कलिंगडाची वेल बिकानेरमध्ये उगवली होती पण ती पसरली नागौरमध्ये. त्या वेलीला लागलं एक कलिंगड, मग त्या कलिंगडावर दोन्ही पण संस्थाने आपला हक्क दाखवू लागली.
एका संस्थानचे म्हणणे होते की वेल आमच्या हद्दीत असल्याने फळ आमचं आहे, तर एका संस्थानचे म्हणणे होते की फळ आमच्या हद्दीत आहे म्हणून ते आमचं आहे. यातून काही मार्ग निघत नव्हता मग शेवटी लढाई लढली गेली. ही लढाई इतिहासात कलिंगडाची लढाई किंवा मतीरे की राड (हिंदी शब्द) म्हणून प्रसिद्ध आहे.
या लढाईबद्दल सांगायचं झालं तर हे आधी केवळ एक प्रकारची भांडण होती. नंतर काही केल्या दोन्ही संस्थानांपैकी कोणीच माघार न घेतल्याने हे भांडण वाढले व त्याच रूपांतर घनघोर लढाई मद्धे झाले. या युद्धात नागौरच्या सैन्याचं प्रतिनिधित्व सुखमल सिंघवी करत होते तर बिकानेर संस्थांच्या सैन्याचं नेतृत्व सरदार रामचंद्र करत होते.
त्याकाळी बिकानेरचे राजा महाराजे करणसिंग हे होते. जेव्हा युद्ध झाले तेव्हा मुघलांसाठी दक्षिण मोहिमेवर गेले होते. तर नागौरचे राजे अमरसिंग होते ते आपल्या राज्यातच होते. पण तेसुद्धा मुघल राज्यकर्त्यांची चाकरी करायचे व त्यांनी मुघल साम्राज्याचे वर्चस्व स्वीकार केलं होतं.
इथे झाले काय तर राजा अमरसिंग यांनी बादशाहला या सगळ्या प्रकरणाची तक्रार केली तर राजा करणसिंग याने सलावतखां बक्षी यांस पत्र लिहून बिकानेरचा बचाव करण्यास सांगितले.
पण दुर्दैवाने हे प्रकरण मुघल दरबारात चालण्याआधीच युद्ध झाले, व या युद्धात नागौर संस्थान हरले. तर बिकानेर संस्थान जिंकले व त्यांना हजारो लोकांचे प्राण गेल्यावर हे टरबूज खायला मिळाले.
या घटनेने मुघल राजा शहाजहान प्रचंड नाराज झाला. कारण त्याची अशी इच्छा होती की दोन्ही राजांनी मिळून युध्द न करता बादशहाच्या मध्यस्थीने या दोन संस्थानातले वाद मिटवून घ्यावेत. पण असे काही झाले नाही.
याचे परिणाम पुढे असे झाले की नागौरचे राजा अमरसिंग व शाहजहान यांच्यात मतभेद व्हायला लागले व त्यांच्यात संघर्ष होऊ लागला.
पण शेवटी एकदा अमरसिंग राठोड यांनी शहाजहानचा मेव्हणा सलावत खान याचा भर दरबारात खून करून लाल किल्ल्यावरून आपल्या घोड्यासह उडी मारली व शूरपणे स्वतःला वीरगती प्राप्त करून घेतली.
एका कलिंगडावरून काय होऊ शकत हे एव्हाना आपणांस हा लेखाच्या माध्यमातून लक्षात आलेच असेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.