आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
तुम्ही गँग्स ऑफ वासेपूर बघितला आहे का? बघितला असेल तर तुम्हाला शाहीद खान नक्की आठवत असेल. तोच जो सुलताना डाकुच्या इंग्रजांची ट्रेन लुटायच्या गोष्टी ऐकून आपल्या गावातून जाणारी मालगाडी लुटू लागतो. पण सुलताना डाकूच्या गोष्टी फक्त गोष्टीच होत्या की खरंच अशी कोणी खुंखार व्यक्ती अस्तित्वात होती. जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल.
स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ होता साधारण १२० वर्षांपूर्वीचा. उत्तर प्रदेशात एका मुलाचा जन्म झाला आणि पुढे जाऊन यानेच इंग्रजांच्या नाकात दम आणला. भारतातून लुटीचे धान्य आणि खजिना नेत असलेल्या इंग्रजांच्याच ट्रेन लुटून तो त्यातील माल गोरगरिबांच्यात वाटून देत असे. पण हे फक्त इंग्रजांपुरतेच मर्यादित नव्हते. जे जे श्रीमंत लोकं गरिबांकडून पैसा लुबाडत, इंग्रजांची चापलुसी करत त्यांना त्याने अशीच वागणूक दिली. याच कारणाने तो गावकऱ्यांमध्ये लोकप्रिय होता.
असं म्हणतात की, सगळीकडे आपला दबदबा निर्माण करणाऱ्या ह्या सुलताना डाकूचा जन्म एका मुस्लीम कबिल्यात झाला होता. त्याने महाराणा प्रताप यांच्या घोड्यावरून आपल्या घोड्याचे देखील नाव चेतक ठेवले होते.
वयाच्या १७व्या वर्षीच त्याने डाकू बनून धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. गरिबांवर होणाऱ्या अन्यायांमुळेच तो इंग्रजांच्या विरोधात उभा ठाकला होता. शोषितांचे अन्याय दूर करणारा एक मसीहा म्हणून त्याच्याकडे लोक बघायचे. हळूहळू त्याच्यामागे गावकरी उभे राहू लागले, त्याला मदत करू लागले. आणि एका वर्षातच त्याच्या टोळी जवळजवळ १०० लोकांची झाली.
सुलतानासाठी गोरगरिबांकडून त्यांच्या मेहनतीचा लुटलेला इंग्रजांचा माल नेहमी निशाण्यावर असायचा. त्या काळात उत्तर प्रदेशचा नजीबाबाद भागात सुलतानाच्या नावाने चांगलाच दबदबा निर्माण केला होता. गोर-गरिबांसाठी जरी सुरक्षित असला तरी इंग्रजांसाठी मात्र मृत्यूचा रस्ता बनला होता.
सुलतानाची माणसं या भागातील कोपऱ्या कोपऱ्यावर नजर ठेवून असायची. लाच खाणारे अधिकारी, गरिबांना त्रास देणारे श्रीमंत सावकार असे लोक त्यांच्या निशाण्यावर असायचे. त्यावेळी नैनिताल आणि देहरादूनला जाणारा एकमेव रस्ता नजीबाबादहून जात असे. तिथे हे डाकू सापळा रचून बसत आणि जाणाऱ्या इंग्रजांना लुबाडून लुट घेतल्याशिवाय सोडत नसत.
तो वयाच्या २२व्या वर्षाचा झाला तोवर त्याचा खौफ उत्तर प्रदेश पासून पंजाब आणि मध्य प्रदेशात पसरला होता. लुटलेला माल तो आजूबाजूच्या गावांत वाटून द्यायचा. गावातील जनतेसाठी जाचापासून सोडवणारा मसीहा बनला तर इंग्रजांसाठी एक डाकू, अपराधी.
त्यांनी सुलतानाला पकडण्याचे बरेच प्रयत्न केले. पण तो कधीच पकडला गेला नाही. ३०० जवानांची एक टीम सुलतानाला शोधण्याच्या कामात लागली होती. या कामासाठी पर्सी बिंडहम याची नियुक्ती करण्यात आली होती पण त्याला यश न मिळाल्याने त्याने फ्रेडी यंग याला कामाला लावले.
याच काळात हल्द्वानीच्या खडक सिंह नावाच्या एका जमीनदाराचे घर सुलतानाने लुटले होते आणि त्याला आपला शत्रू बनवून घेतला. हे जेव्हा यंग आणि जिम कॉर्बेटला कळले तेव्हा त्यांनी खडक सिंहला सोबत घेऊन सुलतानाला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याला मारण्यासाठी जिम कॉर्बेटची नेमणूक केली होती. पण त्यात त्याला यश मिळाले नाही.
सरतेशेवटी फ्रेडी यंग या अधिकाऱ्याने सुलतानाला जिवंत पकडण्यात यश मिळवले.
पकडल्या गेल्यावर फ्रेडीने त्याला माफी मागण्याचे अनेक मौके दिले पण सुलतानाने माफी मागितली नाही. सुलतानाला त्याच्या मुलाला डाकू बनू द्यायचे नव्हते आणि त्याने तशी शिफारस यंगकडे केली. असं म्हणतात की, फ्रेडी यंगनेच सुलतानाच्या मुलाला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले.
सुलतानाला पकडल्यानंतर त्याला साथ देणाऱ्या ४० कुटुंबाना इंग्रजांनी काळ्यापाण्याची शिक्षा दिली.
आणि सरतेशेवटी ७ जुलै १९२४ रोजी १५ साथीदारांसोबत गरिबांच्या ह्या मसीहाला आग्रा जेलमध्ये फाशी झाली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.