आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
As an actor i want to create a performance that will start interacting with the audience after they leave the theatre – Irfan Khan
टॉम हँक्स सोबत इरफानचा “इनफर्नो” चित्रपट आला होता, तेव्हा दिलेल्या एका मुलाखतीतील त्याचं हे वाक्य आहे. आज इरफान आपल्यात नाही, आणि आता या वाक्याचं महत्व येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत वाढत जाईल. इरफान जाऊन आज एक वर्ष झालं, आता खरं या वाक्याचं महत्व कळतंय. अजूनही ती दुर्दैवी घटना आठवून प्रत्येकजण हळहळतो. इरफान फक्त माणूस म्हणून नाही तर त्याच्या कामातून त्याने जागवलेल्या जाणिवांमुळे जास्त स्मरणात राहील.
सुरुवात आपण पान सिंग तोमर पासून करू.
तिगमांशू धुलिया म्हणतो की इरफान खान आतापर्यंतच्या भारतीय सिनेमातला सर्वोत्तम अभिनेता आहे.
तिगमांशू ने इरफानला पान सिंग तोमरमध्ये मुख्य भूमिका दिली, चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, समीक्षकांनी कौतुक केलं आणि थिएटर मध्ये प्रेक्षकांनी देखील उचलून धरलं. काही वर्षांनी सिनेमा युट्युबवर आला, आणि आता मात्र प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं, आणि आता इरफान चं ते वाक्य परत वाचा. “प्रेक्षकांनी थिएटर सोडल्यावर त्यांच्या सोबत संवाद साधणारं काम…”
पण हे झालं 2010 साली. म्हणजे सिनेमात त्याने काम करायला चालू केल्यानंतर 20 वर्षांनी. इंडस्ट्रीला दोन दशकं लागली इरफान मधला कलाकार शोधायला.
1990 साली आलेल्या पंकज कपूरच्या “एक डॉक्टर की मौत” मध्ये आपण त्याला पत्र लिहिणाऱ्या एका छोट्या भूमिकेत बघितलं होतं. मे बी पंकज कपूरने त्याला लक्षात ठेवलं असेल. कारण 2003 साली आलेल्या विशाल भारद्वाजच्या “मकबूल” चित्रपटात आपण त्याला मुख्य भूमिकेत बघितलं. पंकज कपूर, नासिरुद्दीन शहा, ओम पुरी यांच्या सारख्या महान आणि जेष्ठ अभिनेत्यांना छोटी भूमिका देऊन तब्बू सोबत इरफानला मुख्य भूमिका देताना विशालला इरफानचं महत्व नक्कीच कळाल असेल.
स्वतःच्या करिअरच्या एवढ्या सुरुवातीला शेक्सपिअरच्या नाटकातील एवढी क्लिष्ट भूमिका एवढ्या जेष्ठ कलाकारांसोबत त्याने साकारली. तरीही अजून भारतातल्या जास्तीत जास्त प्रेक्षकांना हे नाव माहीतही झालं नव्हतं.
तीन वर्षानंतर त्याला “नेम सेक” या हॉलिवूड चित्रपटात काम करायची संधी मिळाली. पण अजूनही त्याच्या अभिनयाला थिएटरमध्ये टाळ्या पडल्या नव्हत्या… अजूनही सामान्य प्रेक्षकांना हे नाव माहीत नव्हतं.
हिंदी चित्रपटातल्या त्याच्या निगेटिव्ह भूमीका किंवा सहकलाकार म्हणून त्याने केलेलं काम एव्हाना जगाला दिसायला लागलं होतं. आजही टीव्हीवर किंवा युट्युबवर एखादा मागच्या दशकातला सिनेमा बघताना त्यात इरफान असेल तर तेवढा एका कारणासाठीही आपण तो सिनेमा आवर्जून बघतो.
“आन”, “डेडलाईन”, “बिल्लू”, “थँक्यु” या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये आजही इरफानच्या जागी दुसऱ्या कुठल्या अभिनेत्याची कल्पना करवत नाही.
अक्षय कुमार एका मुलाखतीत म्हणतो की, “आम्हाला थोडं काहीतरी अवघड करायला सांगितलं की घाम फुटतो, आणि हा माणूस येतो आणि डायलॉग म्हणून जातो, एवढं एफर्टलेस काम कसं जमत असेल याला?”
पण… पण… अजूनही ही स्तुती थिएटरच्या बाहेरची होती. तो सिनेमा येऊन गेल्याच्या काही वर्षानंतर आपल्याला त्याच्या या कामाचं महत्व कळालं.
सिनेमा थिएटरला आणि त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले, लोकं थिएटरमध्ये टाळ्या वाजवताय, अभिनेत्याचं कौतुक करताय. आणि या सगळ्या यशाचं श्रेय इरफानला देताय हे मात्र इरफानला त्याच्या आयुष्यात एकदाच मिळालं असं मला वाटतं. ते “हिंदी मिडियम” च्या निमित्ताने 2017 ला.
कुठलाही स्टार नसताना, फायटिंग, गाणे किंवा तत्सम काहीच नसताना, चांगला संदेश देणारा चित्रपट स्वतःच्या उत्तम अभिनयाने खुलवला आणि भारतीय सिनेमात इरिहास रचला, तो असा, या चित्रपटाचं बजेट 10 कोटीच्या आसपास, आणि कमाई 110 कोटी. बाहुबलीने भलेही 550 कोटी कमावले पण त्याला बनायलाही 200 कोटी लागले हे आपण विसरतो.
आजपर्यंतच्या भारतीय सिनेमाच्या इतिहासात काही अपवाद वगळता असा रेकॉर्ड करणं कोणालाही जमलं नव्हतं. सगळ्या बाजूने इरफानकडे स्पॉट लाईट येत होते. फायनली स्वतःला आवडतो त्या प्रकारचा सिनेमा आपण बनवला आणि लोकांनीही तो डोक्यावर घेतला याचा त्याला किती आनंद झाला असेल?
करिअर मध्ये जवळ जवळ तीन दशकं मेहनत घेतल्यावर हे त्याला मिळालं होतं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. “शापित राजहंस” म्हणतात ते याच प्रकारच्या लोकांना. एका वर्षानंतर 2018 ला “कारवां” चित्रपट शूट करताना इरफानच्या ब्रेन ट्युमरची बातमी कळाली. दोन वर्ष इलाज चालला. 2020 ला दोन वर्षानंतर त्याने “अंग्रेजी मीडियम” चित्रपट बनवला पण तब्येतीमुळं तो प्रमोशनला फार दिसला नाही. सिनेमा रिलीज झाला आणि लॉकडाऊन घोषित झालं, आणि इरफान गेल्याची बातमी आली…
“स्लमडॉग मिलेनियरच्या” निमित्ताने इरफान खान अजून एकदा जागतिक सिनेमातलं नाव बनलं. पण जागतिक सिनेमात या नावाचं खरं वजन “लाईफ ऑफ पाय” या चित्रपटानंतर वाढलं. आपण हा सिनेमा बघतो तेव्हा ती कथा एकसंथ चालू असते, पण इरफान चं पात्र हा घटनाक्रम झाल्यानंतर ही कहाणी एका लेखकाला ऐकवत असतं.
समुद्र, एकाच बोटीत सोबत राहणारा वाघ, अचंबित करतील असे दृश्य, आणि अजून बरंच काय काय या सिनेमात भरलंय… पण जेव्हा सिनेमा संपतो आपण थिएटरच्या बाहेर पडतो, तेव्हा आपल्याला जे लक्षात राहतं, जे आपण प्रोसेस करण्याचा प्रयत्न करतो असतो, ते इरफानच्या आवाजातलं त्या सिनेमाचं अर्क असतं. आणि आता या लेखातील ते पाहिलं वाक्य परत वाचा…
“इरफान” पर्वाच्या या शेवटासाठी त्याचंच लाईफ ऑफ पाय मधलं हे वाक्य समर्पक वाटतं…
I suppose in the end
Whole life becomes an act of letting go.
But what always hurts the most
Is not taking the moment to say Goodbye.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.