आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पानिपताचं तिसरं यु*द्ध हे मराठेशाहीच्या इतिहासातलं सर्वात महत्त्वपूर्ण यु*द्ध, हे यु*द्ध जरी मराठे हरले असले तरी या यु*द्धात मराठ्यांनी दाखवलेल्या पराक्रमाने इतिहासात सोनेरी पान लिहिले गेले. वीर मराठ्यांच्या रक्ताने पानिपताची भूमी पावन झाली होती खरी पण या यु*द्धाने मराठा साम्राज्याचे आतोनात नुकसान केले.
“लाख बांगड्या फुटल्या होत्या”, अशी मन हेलावणारी वर्णने या यु*द्धाबद्दल केली गेली आहेत.
या यु*द्धात मराठ्यांनी त्यांचे अनेक कर्तबगार सरदार गमावले, वीर सेनानी गमावले, सुपुत्र गमावले, सकलराजकार्यधुरंधर ही बिरुदावली कमावलेल्या व त्याला जागलेल्या सदाशिवरावभाऊंंना गमावले. पण या सर्वांत जास्त दुखःदायी होतं ते तरुण, उमद्या विश्वासराव पेशव्यांना गमावणे.
विश्वासराव पेशवे, ज्यांनी अगदी अल्पवयात आपल्या पराक्रमाच्या जोरावर स्वतःला पेशवाईचा भावी वारसदार म्हणून सिद्ध केलं होतं. पण नियतीला हे मंजूर नव्हतं.
त्यामुळे पानिपताच्या रणसंग्रामात त्यांना वीरमरण आले. हिंदवी स्वराज्यासाठी या तरुण पराक्रमी पेशव्याने आपले प्राण पणाला लावले होते. या तरुण पेशव्याला गमावण्याचं नुकसान पेशवाईला भरून काढता आलं नाही.
विश्वासराव नानासाहेब पेशवे आणि गोपिकाबाईंचे थोरले सुपुत्र होते. त्यांचा जन्म ७ मार्च १७४१ रोजी झाला. विश्वासराव बालपणापासूनच अत्यंत पराक्रमी होते. वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्यांनी स्वतःला तयारीत झोकून दिले होते.
त्यांनी धनुर्विद्या आणि तलवारबाजीत मोठे कसब प्राप्त केले होते. विश्वासराव दिसायला अत्यंत रूपवान, त्यांना पेशवाईतला सर्वांत देखणा पेशवा म्हटलं जात होतं, अशी नोंद स्वत: रियासतकार सरदेसाईनी यांनी केली आहे.
विश्वासराव यु*द्ध कौशल्याचा बाबतीत आपले आजोबा आणि परम पराक्रमी थोरले बाजीराव पेशव्यांशी साधर्म्य साधत होते, अशी वर्णनं बखरकारांनी करून ठेवली आहेत.
सदाशिवरावभाऊ यांनी विश्वासरावांना प्रशिक्षण दिलं होतं. सदाशिवरावभाऊंच्या तालमीत तयार झाल्यामुळे विश्वासराव पराक्रमी तर झालेच, शिवाय त्यांना राज्यकारभारासंबंधीचे ज्ञान देखील प्राप्त झाले होते. सदाशिवरावभाऊंचा विश्वासरावांवर फार जीव होता. त्यांनी व पार्वतीबाईंंनी त्यांना आपल्या पुत्रासमान वागणूक दिली.
विश्वासरावांचा संबंध थोरल्या बाजीराव पेशव्यांचे टिपणीस असलेल्या सरदार गुप्ते यांच्या कन्या राधिकाबाई यांच्याशी करण्यात आला.
परंतु राधिकाबाई या जातीने चित्पावन ब्राम्हण नसल्याने नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी आणि विश्वासरावांच्या आई गोपिकाबाई यांनी या विवाहास आक्षेप घेतला होता. पुढे यातून वाद निर्माण झाले. विश्वासराव आणि राधिकाबाई यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दोघेही पुढे सदाशिवरावभाऊ आणि पार्वतीबाईंच्या छत्रछायेखाली होते.
अखेरीस विश्वासरावांनी त्यांच्या आईकडून वचन घेतले की त्यांचा विवाह राधिकाबाईसोबतच होणार, यावर अखेरीस त्यांच्या मातोश्रींनी होकार दिला, पण त्यांना आधी पानिपतला जाऊन यु*द्ध जिंकून येण्यासाठीचे आश्वासन मागितले होते. या संपूर्ण प्रकरणावर इतिहासकारात मतभेद आहेत. अनेकांच्या मते गोपिकाबाईंचा असा विरोध नव्हता.
विश्वासारावांनी आपल्या आयुष्यातील पहिलं यु*द्ध साल १७५६ साली निजामाच्या विरोधात लढलं होतं. या मोहिमेत दाखवलेल्या पराक्रमामुळे त्यांची वीरयो*द्धा म्हणून प्रतिमा पेशवे घराण्यात नावारुपास आली होती. पुढे सदाशिवरावभाऊंच्या नेतृत्वाखाली त्यांनी उदगीरच्या यु*द्धात मोठा पराक्रम गाजवला होता.
उदगीरच्या यु*द्धात त्यांनी निजामाचा पराभव केला होता आणि पानिपताला जाण्यापूर्वी दक्षिणेकडील एका मोठ्या शत्रूला अद्दल घडवल्यामुळे त्यांच्या शौर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती.
पेशव्यांच्या निष्ठावान सरदारांनी याबद्दल पेशव्यांना आपल्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
विश्वासराव खरंतर पानिपतला यु*द्धाला जाणार नव्हते, पण गोपिकाबाईंच्या हट्टामुळे, पेशव्यांनी आपला प्रतिनिधी म्हणून सदाशिवरावभाऊंच्या मदतीसाठी विश्वासरावांची रवानगी केली होती. त्यांच्यासोबत राधिकाबाई देखील यु*द्धाला गेल्या होत्या. पानिपतापूर्वी विश्वासरावांच्या नेतृत्वात पेशव्यांनी दिल्ली काबीज केली.
सदाशिवरावभाऊंंनी दिल्ली दरबारी सरदारांकरवी विश्वासरावांना नजारा केला होता. यामुळे एकार्थाने दिल्ली काबीज करणारे व दिल्लीच्या गादीवर बसलेले पहिले मराठा म्हणून विश्वासरावांची ख्याती आहे. परंतु, यावर देखील इतिहासकारात मतभेद आहेत.
पानिपतच्या यु*द्धात देखील विश्वासरावांंनी मोठा पराक्रम गाजवला होता. त्यांनी अब्दालीच्या सैन्याला पळो की सळो करून सोडलं होतं.
दोन्ही बाजूला एक लक्ष सैन्य एकमेकांशी झुंज देत होते, त्यावेळी विश्वासराव आणि त्यांचे बालपणीचे मित्र जनकोजी शिंदे यांनी एकत्रितपणे मोठा पराक्रम रणांगणी गाजवला.
त्यांनी आपल्या सरदारांच्या बळावर हजारो रोहिंग्याच्या फौजेला पिटाळून लावलं होतं. पण या काळात मराठ्यांकडे असलेल्या अन्न व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या साठ्यात मोठी कमतरता निर्माण झाली होती. त्यावेळी विश्वासरावांनी नानासाहेबांना पत्र लिहून सैन्याच्या बिकट अवस्थेबद्दल कल्पना दिली होती.
त्यांनी त्या पत्रात म्हटले होते, “या यु*द्धात आम्ही गेलो तरी चालेल, आमच्यापाठी तुम्हाला दोन पुत्र आहेत, पण सदाशिवरावभाऊसारखे पराक्रमी बंधू गमावणे आपल्याला परवडणारे नाही, त्यामुळे आपण तत्काळ मदत पाठवावी.” त्यांच्या या पत्रामधून सदाशिवरावभाऊ आणि त्यांच्यातील नात्याची कल्पना येते.
पण पुढे याच उत्कट नात्याने पानिपतात मराठ्यांचा घात केला. विश्वासराव हत्तीवर विराजमान होऊन लढत होते. पण त्या दरम्यानच त्यांना एक बाण येऊन लागला आणि ते रणांगणावर धारातीर्थी पडले.
जसे विश्वासराव पडले, हे सदाशिवरावभाऊंंनी बघितलं तेव्हा भावनेच्या आवेगातून त्यांनी हत्तीवरून उतरून सरळ सैन्यात घुसून लढायला सुरुवात केली.
हत्तीवर सदाशिवरावभाऊ दिसत नाही, म्हणून मराठे सैरभैर झाले आणि सरतेशेवटी पानिपताच्या यु*द्धाचा दु:खद शेवट झाला. या यु*द्धानंतर राधिकाबाई पुण्याला परतल्या आणि दोन वर्षांनी त्यांचा देखील मृत्यू झाला.
विश्वासरावांच्या मृत्यूनंतर अब्दालीने त्यांचं पार्थिव आपल्या ताब्यात घेतलं होतं, जे कामराज आदी मंडळीने एक लाख रुपयांचा दंड भरून सोडवून आणलं होतं आणि सदाशिवरावभाऊंचं पार्थिव शोधून अंत्यविधी केला.
विश्वासरावांच्या मृत्यूने नानासाहेबांना आलेला पुत्रवियोग ते सहन करू शकले नाहीत, विश्वासरावांबरोबरच बंधू सदाशिवरावभाऊ देखील कामी आले होते, कदाचित हे दुःख ते सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी दिनांक २२ जून १७६१ रोजी पर्वतीवर आपले प्राण ठेवले.
विश्वासरावांचं निधन मऱ्हाटशाहीचं भरून न निघणारं नुकसान करून गेलं असं म्हटलं तरी हरकत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.