आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जर एखाद्या व्यक्तीचे हात बांधले आणि त्याला गाडी चालवण्यास सांगण्यात आले तर ती व्यक्ती गाडी सुरु देखील करू शकणार नाही. पण भारतात अशी एक व्यक्ती आहे, जी दोन हात नसून देखील उत्तम गाडी चालवू शकते. विशेष म्हणजे भारत सरकारकडून त्या व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स देखील देण्यात आले आहे. विक्रम अग्निहोत्री असे या व्यक्तीचे नाव आहे.
विक्रम बालपणापासून अपंग आहेत. त्यांचा जन्म देखील एखाद्या सामान्य मुलासारखा झाला होता. परंतु वयाच्या सातव्या वर्षी वीजेचा धक्का लागल्यामुळे त्यांना आपले हात गमवावे लागले होते. अशा अत्यंत दुर्धर परिस्थितीत देखील विक्रम यांनी धैर्य सोडले नाही. त्यांनी अपंग मुलांच्या शाळेत शिक्षण न घेता, सामान्य मुलांच्या शाळेतच शिक्षण घेतले. त्यांनी आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण केले. त्यांच्या आईने त्यांना या काळात मोठी साथ दिली होती.
त्यांनी आपल्या पायांचा हात म्हणून वापर करण्यास सुरुवात केली. जेवणापासून दाढी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी ते पायांचा वापर करू लागले.
हळूहळू विक्रम यांचा आत्मविश्वास वाढत चालला होता, आपल्या पायांच्या मदतीने ते अनेक कामे पार पाडत होते. मग एकदा त्यांनी अजून धाडस करण्याचा निर्णय घेतला. विक्रम यांनी गाडी विकत घेतली, पण गाडी विकत घेतल्यावर ती चालवणार कशी हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. विक्रम यांना गाडी चालवणे कोण शिकवेल हा देखील एक प्रश्न होता.
विक्रम यांनीच त्यांच्या गाडीत काही बदल केले. गाडीत बदल केल्यावर ते आपल्या एका पायाने गाडीचे स्टेअरिंग सांभाळू शकत होते तर दुसऱ्या पायाने ब्रेक-ॲक्सिलेटरचा वापर करू शकत होते. बराच शोध घेतल्यावर देखील त्यांना ड्रायव्हिंग शिकवू शकेल अशी कुठलीही व्यक्ती भेटत नव्हती. असं असलं तरी त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी इंटरनेटवर व्हिडीओ बघून ड्रायव्हिंग शिकण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्यात ते उत्तम गाडी चालवायला शिकले. त्यांनी ड्रायव्हिंग शिकल्यावर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केला. परंतु त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.
विक्रम यांना हात नसल्यामुळे त्यांना गाडी चालवण्याची कायदेशीर परवानगी मिळत नव्हती. विक्रम यांनी हार मानली नाही, त्यांनी सरकारकडे हे नियम बदलण्यासाठी अर्ज केला.
विक्रम यांनी सरकारकडे फक्त एक ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची मागणी केली. त्यांना आपले कौशल्य जगाला दाखवून द्यायचे होते, ते उत्तम गाडी चालवू शकतात हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे होते. बरेच प्रयत्न केल्यावर त्यांना सरकारने ड्रायव्हिंग टेस्टसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला.
शेवटी, विक्रमने आपल्या पायांनी गाडी चालवून यशस्वीपणे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलंच.
लायसन्स मिळाल्यावर विक्रमचे नाव सर्वदूर पसरले. या अगोदर कोणीच पायाने गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला पाहिले नव्हते. विक्रमची ओळख काही फक्त गाडी चालावण्यापुरती मर्यादित राहिली नाही. ते उत्तम फुटबॉलपटू बनले आणि अनेक मोटिव्हेशनल सेमिनार्समध्ये त्यांनी भाषण केले. कधीच न झुकता आणि न थकता यश कसे मिळवता येते हे विक्रम यांनी दाखवून दिले.
त्यांनी अनेक कार रैलींमध्ये सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. विक्रम हे सर्व मिळवू शकले कारण त्यांनी कधीच प्रयत्न करणे थांबवले नाही. कधी हार मानली नाही. त्यांनी सदैव स्वत:ला उत्तम बनवण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण त्यांच्यासमोर हार न मानता स्वतला सावरणे हाच खरा पुरुषार्थ आहे, हे विक्रम यांनी दाखवून दिले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.