आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
“अंग्रेज चले गये पर अंग्रेजी छोड गये” हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. सत्य परिस्थितीही तशीच आहे. जरी भारताची राष्ट्रभाषा हिंदी असली तरीही आज भारतात बहुतांश भागात इंग्रजीचं चलन अधिक प्रमाणात आहे.
कामाच्या ठिकाणी तर हमखास इंग्रजीचाच वापर होतो. अगदी एखाद्याची विचारपूस करण्यापासून तर एखाद्या मोठ्या कराराच्या कागदपत्रापर्यंत, सगळीकडे इंग्रजीचाच वापर होतो.
भारताची न्यायव्यवस्थाही या इंग्रजीच्या जाळ्यातून सुटली नाहीये. जवळपास सगळे वकील त्यांचं काम इंग्रजीतूनच करतात, काही थोडकेच आहेत जे हिंदीतून लिखापढी करतात. आता जिथे हिंदीचीच ही व्यथा आहे तिथे देववाणी संस्कृतबद्दल काय बोलणार!
आता तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण एक असा अतरंगी वकील आहे जो ना इंग्रजीचा वापर करतो ना हिंदीचा.
वाराणसीमधला हा वकिल गेल्या जवळपास ४० वर्षांपासून कोर्टातलं सगळं कामकाज संस्कृतमधूनच करतो आहे.
त्यांनी आपले आजपर्यंतचे सगळे खटले संस्कृतमधूनच लढले आहेत. त्यासाठी लागणारे सगळे कागदपत्र, शपथपत्र, वकीलपत्र, इत्यादी ते संस्कृतमधूनच जमा करत.
त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट श्यामजी उपाध्याय.
श्यामजी मूळ मिर्झापुर या गावचे आहेत. त्यांचे वडील संगठा प्रसाद उपाध्याय संस्कृत पंडित होते. संस्कृतचं शिक्षण त्यांना आपल्या घरातून, वडिलांकडूनच मिळालं. गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयातून बौध्द दर्शन या विषयात आचार्य ही पदवी प्राप्त केली. आपले गुरु प्रा. जगन्नाथ उपाध्याय यांच्या इच्छेचा मान ठेवत त्यांनी वर्षभर कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केलं.
त्यानंतर ते हरिशचंद्र महाविद्यालयातून विधीची पदवी प्राप्त करून वकिली करायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी सगळे खटले संस्कृतमधूनच लढले आहेत.
श्यामजींना संस्कृतवरील त्यांच्या प्रेमाबद्दल विचारणा केली असता ते सांगतात की, एकदा ते वडिलांसोबत गावातून चालले होते. तेव्हा त्यांच्या वडिलांना काही लोक भेटले आणि स्वाभाविकपणे सगळे भोजपुरीत गप्पा मारायला लागले. तेव्हा त्यांचे वडील सहज बोलून गेले की आपण सगळे जर का असं संस्कृतमध्ये बोललो तर किती छान झालं असतं ना?
ही गोष्ट दहा वर्षांच्या श्यामजींच्या डोक्यात एकदम फिट्ट बसली आणि त्यानंतर त्यांनी संस्कृतमध्येच बोलायचं असं मनाशी पक्कं केलं.
एकदा बनारसच्या एका व्यक्तीवर ४० खासदारांची खोटी सही करण्याचा आरोप होता. त्य केसमध्ये जिल्हा न्यायाधीशांनी यांना संस्कृतमध्ये याचिका दाखल करून त्याचं हिंदी भाषांतर करायला सांगितलं. उपाध्याय सांगतात की, ही केस ते दिल्लीतील पटियाला कोर्टात लढायला पण तयार होते.
संस्कृतमध्येच सगळी उलटतपासणी व्हावी याचा त्यांनी कायमच प्रयत्न केला आहे.
ते फक्त स्वतः संस्कृतमध्ये बोलतात असं नाही तर ते देववाणीला पुढे नेण्याचंही काम करतात. यासाठी दरवर्षी ४ सप्टेंबरला संस्कृत दिवस आयोजित करतात. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ५० वकिलांचा सत्कार देखील केला जातो.
श्यामजी उपाध्याय यांना भारत सरकारने संस्कृत मित्र या पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
जेव्हा ते कोर्टात उलटतपासणी त्यांच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं प्रतिपक्षाला देता येत नाही. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी संस्कृत भाषेच्या विकासासाठी खर्ची केलं आहे. जिथे लोक आपल्याला किती इंग्रजीचं ज्ञान आहे हे दाखवत असतात. आणि इंग्रजी बोलता येणं हेच बुद्धिमत्तेचं प्रमाण आहे असं मानतात तिथे श्यामजींसारख्या आयुष्य संस्कृतसाठी वाहणाऱ्या माणसाचं काम खरंच वाखाणण्याजोगं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.