आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करणे आज एक सहज बाब बनली आहे. नोकरी, शिक्षण, व्यवसाय, पर्यटन अशा अनेक निमित्ताने अनेक नागरिक देशाबाहेर ये-जा करत असतात. परदेश वारी ही म्हणावी तितकी अप्रूपाची बाब राहिली नाही. कधी काळी समुद्र पार करण्यालाही पाप मानल्या गेलेल्या देशात आज समुद्रावरून उड्डाण करणे ही एक सामान्य बाब बनली आहे.
आज या हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात अनेक खाजगी कंपन्या उतरल्या आहेत. त्यामुळे या वाहतुकीत सोयीसुविधांनुसार प्रवासी वेगवेगळ्या हवाई कंपन्यांना प्राधान्य देतात. एखाद्या कंपनीची सुविधा आवडली नाही तर, पुढच्या वेळी दुसऱ्या कंपनीची सुविधा वापरली जाते.
पण काही वर्षांपूर्वीची परिस्थिती नेमकी उलटी होती!
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील वेगवेगळ्या आठ हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांचे एकत्रीकरण करून एकच इंडियन एअरलाइन्स कार्पोरेशन नावाची सार्वजनिक कंपनी स्थापन करण्यात आली.
१ ऑगस्ट १९५३ रोजी या कंपनीची स्थापना झाली. त्याआधी भारतात टाटा सन्स या नावाने एक विमान वाहतूक सेवा देणारी कंपनी सुरु होती, जिची स्थापना जेआरडी टाटा यांनी केली होती. १९४८ साली टाटांनी टाटा सन्स हे नाव बदलून तिचे नाव एअर इंडिया असे ठेवण्यात आले.
भारत सरकारने या एअर इंडिया कंपनीतील आपली गुंतवणूक वाढवली आणि एअर इंडियाची सर्व देशांतर्गत विमानसेवा इंडिअन एअरलाइन्सकडे वळवण्यात आली. अशाप्रकारे इंडियन एअरलाइन्सचा हवाई उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला. तेंव्हा आंतरराष्ट्रीय वाहतूक करण्याची संधी क्वचितच येत असे, त्यामुळे इंडियन एअरलाइन्स देशांतर्गत हवाई वाहतूक सेवा पुरवत असे.
ज्यांचा जन्म १९९० पूर्वी झाला आहे, त्यांनी अनुभवले असेल की, इंडियन एअरलाइन्स हा हवाई वाहतुकीचा एकमेव पर्याय होता. इंडियन एअरलाइन्सचा भगव्या रंगाचा लोगो म्हणजे हवाई वाहतूक! इतके हे समीकरण पक्के झाले होते. स्वातंत्र्यानंतर किमान तीन पिढ्यांनी तरी हाच अनुभव घेतला असेल.
हा असा काळ होता जेंव्हा भारतात हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दुसरा पर्यायच नव्हता. त्याकाळी विमानतळ सुनसान असायचं. कसलाही गोंधळ नाही की गडबड नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी इंडियन एअरलाइन्स एवढाच एकमेव पर्याय होता. त्यामुळे कितीही अडचण असली किंवा इंडियन एअरलाइन्सची सेवा कितीही खराब असली तरी तिच्याशी जुळवून घेणे भाग होते.
हा प्रवास करणे इतके सोपे नव्हते. कारण त्याकाळी काही ऑनलाईन तिकीट बुकिंग वगैरे करणे शक्यच नव्हते. सगळ्या सोपस्कारांसाठी प्रत्यक्ष विमानतळावर जाणे भाग होते. शिवाय, विमानातील सेवांच्या दर्जा याबाबत तडजोड करणे तर ओघाने आलेच. तरीही या ब्रँडशी लोकांची नाळ जोडली गेली होती. कारण काही झाले तरी ही कंपनी म्हणजे आपली राष्ट्रीय संपत्ती होती.
“या कंपनीने देशाला जोडून ठेवले. उदारीकरणाचे धोरण स्वीकारण्यापूर्वी, बरीच वाहतूक ही देशांतर्गतच केली जात असे. आंतरराष्ट्रीय फेऱ्यांचे प्रमाण अगदीच तुरळक होते. त्यातही इंडियन एअरलाइन्सशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.” ब्रँड हिस्टॉरियन संतोष देसाई सांगत होते.
या क्षेत्रात खाजगी कंपन्यांचे आगमन होण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्स तेजीत चालली होती. उदारीकरणानंतर या क्षेत्रात खाजगी कंपन्यांनीही आपली सेवा सुरु केली. खाजगी कंपन्यांच्या आगमनानंतर इंडियन एअरलाइन्सची हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातील मक्तेदारीला जणू आव्हान मिळाले. परंतु इतर सरकरी अस्थापनांप्रमाणेच इंडियन एअरलाइन्स नेहमीच फायद्यात राहिली.
एकेकाळी इंडियन एअरलाइन्सने भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हा काळ इंडियन एअरलाइन्सचा सुवर्णकाळ होता. अगदी अधिकारी वर्गापासून ते कुटुंबांसोबत प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी देखील हा प्रवास अतिशय सुखाचा आणि परवडणारा होता. विशेषत: ६०, ७० आणि ८०च्या दशकात तर विमान प्रवास म्हणजे एक सुखद अनुभव होता.
हवाई वाहतूक तज्ञांच्या मते, इंडियन एअरलाइन्ससाठी खरी समस्या तेंव्हा सुरु झाली जेंव्हा त्यांनी एक अलायन्स एअर नावाची दुसरी उपशाखा उघडली. १९९६पासून ही अलायन्स कार्यान्वित करण्यात आली. प्रादेशिक विमान वाहतुकीत वाढ करण्यासाठी अलायन्सची निर्मिती करण्यात आली.
पण, त्यामुळे एअरलाइन्सच्या मार्गातील नफाही अलायन्सच्याच खात्यात जाऊ लागला. प्रवासी अलायन्स आणि एअरलाइन्स यांची सांगड घालू लागले तेंव्हा एअरलाइन्सचा दबदबा कमीकमी होत गेला.
याशिवाय, दमानिया, किंगफिशर अशा मोठमोठ्या कंपन्या या क्षेत्रात उतरल्या तेंव्हा या खाजगी कंपन्यांसोबतच्या स्पर्धेत टिकून राहणे इंडियन एअरलाइन्ससाठी कठीण जाऊ लागले. या खाजगी कंपन्या अनेक एक्स्ट्रा सुविधा देऊ लागल्या आणि त्यासाठी एक्स्ट्रा किंमतही मोजू लागल्या.
विमान प्रवास अधिक रोचक होण्यासाठी या खाजगी कंपन्यांनी अनेक मनोरंजक सुविधा देण्यास सुरुवात केली. अशा नवनव्या कल्पना राबवण्यात भारताच्या सरकारी एअरलाइन्सला शक्य झाले नाही.
अगदी दमानिया कंपनीने तर विमान प्रवासात अल्कोहोल पुरवण्याचीही सेवा सुरु केली. आणखी एका खजगी विमान वहातुक कंपनीने विमानात फॅशन शो आयोजित केला. विमानातून मॉडेल्सना पाहण्याचा हा आनंद खासच होता.
प्रवाशांनी याचा भरपूर आनंद लुटला. मात्र अधिकाऱ्यांना अशा गोष्टींसाठी रोषही ओढवून घ्यावा लागला.
या सगळ्या खाजगी कंपन्या आल्या आणि गेल्या. जाताजाता त्यांनी इंडियन एअरलाइन्सवर असा परिणाम केला की इंडियन एअरलाइन्सला पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात करणे शक्यच झाले नाही.
२००५ साली इंडियन एअरलाइन्सने जुनी कात टाकून नवा अवतार धारण करण्याचा प्रयत्न केला. ब्रँडचे नाव आणि लोगो बदलण्यात आले.
७ डिसेंबर २००५ रोजी इंडियन एअरलाइन्सचे नामकरण फक्त इंडियन असे ठेवण्यात आले. या बदलामुळे कंपनी थोडी आधुनिक आणि तरुण वाटेल अशी अपेक्षा होती. ज्यामुळे वाढत्या स्पर्धेत टिकणे सोपे जाईल. पण, प्रत्यक्षात झाले ते उलटेच.
परंतु, माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी कंपनीच्या फायद्यासाठी पुन्हा एक नवा निर्णय घेतला. त्यांनी इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडिया या दोन्ही कंपनीचे विलीनीकरण करण्याचे ठरवले. यामुळे इंडियन एअरलाइन्स या सरकारी कंपनीचे अवतार कार्य तर संपुष्टात आलेच पण, एअर इंडियाच्या उड्डाणांवर देखील याचा परिणाम दिसून येऊ लागला.
या विलिनीकारणामुळे एअर इंडियावर अतिरिक्त ३०,००० कामगारांचा बोजा वाढला. शिवाय, मानवी संसाधनाच्या बाबतीत अधिक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले.
कधी काळी भारतीय नागरिकांच्या अभिमानाचे प्रतिक असणाऱ्या इंडियन एअरलाइन्सचा असा अंत होणे हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण बाब होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.