आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतीय स्वातंत्र्य लढा अनेक अर्थाने दैदिप्यमान लढा होता. या लढ्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या परीने देशासाठी बलिदान दिले. शालेय इतिहास शिकताना आपल्याला भारतीय स्वातंत्र्यलढा जवळजवळ प्रत्येक वर्षी थोड्याफार प्रमाणात शिकवला गेलेला आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला देखील या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अनेक लोकांना होता.
जर पाठ्यपुस्तकांकडे नजर टाकली तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख चेहरे फक्त पाठ्यपुस्तकांमध्ये शिकण्यास मिळतात. अनेक लोकांचे कार्य फक्त एक किंवा दोन उताऱ्यामध्येच गुंडाळलेले दिसून येते, पण या लोकांचे योगदान प्रचंड मोठे आहे.
अशा झाकोळल्या गेलेल्या एका भारतीय स्वातंत्र्य सेनानी विषयी आज आपण माहिती बघत आहोत. या सेनानी आहेत उषा मेहता.
उषा मेहता यांनी भारतीय स्वातंत्र्य यु*द्धामध्ये पहिल्यांदा अंडरग्राउंड रेडिओ स्टेशन चालवले होते.
२५ मार्च १९२० साली गुजरातमधील सुरत शहरामध्ये उषा मेहता यांचा जन्म झाला. उषा मेहता यांचे कुटुंब तसं बघायला गेलं तर गर्भश्रीमंत कुटुंबांमध्ये मोडणारे होते. त्यांचे वडील ब्रिटिशकालीन राजवटीमध्ये जज होते. सरकारी नोकरी असल्यामुळे सरकारी नोकरीत मिळणारे मानमरातब आणि नोकरचाकर तसेच इतर सोयीसुविधा उषा मेहता यांनी लहानपणापासून आपल्या घरामध्ये पाहिल्या होत्या.
उषा मेहता यांची पहिली भेट गांधीजींबरोबर त्या पाच वर्षे वयाच्या असताना झाली होती. गांधीजी त्यावेळी स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून देशभरामध्ये पदयात्रा काढत होते. सुरतला असताना उषा मेहता यांच्या कुटुंबाने गांधीजींच्या स्वदेशी चळवळीला आपला जोरदार पाठिंबा दिलेला होता.
त्यानंतर उषा मेहता वयाच्या आठव्या वर्षी गांधीजींना पुन्हा एका कॅम्पच्या निमित्ताने भेटल्या. त्या गांधीजींच्या विचारांनी नंतर इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी नंतर आयुष्यभर खादीचे कपडे वापरले. आपली महागडी जीवनशैली सोडून अत्यंत साध्या जीवनशैलीचा स्वीकार केला.
त्यांनी आपल्या वडिलांना देखील सांगितले की आपण इथून पुढे भारतीय स्वतंत्र यु*द्धामध्ये भाग घेणार आणि त्यासाठी आपले पुढचे जीवन देखील व्यतीत करणार. त्यावेळी त्यांचे वय लहान होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सांगितले.
वडील रिटायर झाल्यानंतर सर्व कुटुंब मुंबईला येऊन स्थायिक झाले. मुंबईलाच उषा मेहता यांनी आपले पुढचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तो काळ गांधीजींच्या विचारांनी भारलेला काळ होता. संपूर्ण भारताने गांधींचे पुढारीपण मान्य केले होते. आणि भारतीय काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य यु*द्धाची तयारी जोरात सुरू होती.
वडिलांच्या इच्छेनुसार उषा मेहता यांनी मुंबई विद्यापीठातून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी भारतीय काँग्रेस पार्टीच्या सक्रीय सदस्य म्हणून देखील काम पाहण्यास सुरुवात केली.
१९४२ साल उजाडले गांधीजींनी इंग्रजांना भारत सोडून “चले जाव” म्हणून बजावले. इंग्रजांनी देश सोडून जावा यासाठी मोठे आंदोलन पेटले. गांधीजींच्या या चले जाव चळवळीला देशभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांनी अनेक ठिकाणी आंदोलने केली. मोर्चे काढले.
इंग्रजांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. गावागावातील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निदर्शने केली. याला प्रत्युत्तर म्हणून इंग्रजांनी ठिकाणी लाठीचार्ज केला. अनेक लोकांना तुरुंगामध्ये टाकले.
गांधीजींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील तुरुंगामध्ये डांबण्यात आले. यामागे इंग्रज सरकारचा असा विचार होता की काँग्रेसचे प्रमुख नेते जर तुरुंगात गेले तर ही चळवळ बंद पडेल.
गांधीजींची भाषणे लोकांनी ऐकली नाहीत तर आपोआप या चळवळीमधला जोर थंडावेल. इंग्रजांच्या या विचारांची भारतीय काँग्रेस पार्टीला कल्पना आली.
त्यामुळे जे लोक जेलच्या बाहेर राहिले होते त्यांच्यापुढे आता गांधीजी आणि इतर प्रमुख सहकाऱ्यांशिवाय ही चळवळ पुढे कशी न्यायची असा यक्ष प्रश्न उभा राहिला.
त्यात भरीत भर म्हणून इंग्रजांनी भारतातील सगळे रेडिओ स्टेशन बंद करून टाकले. त्याकाळी लोकांना एकमेकांना जोडण्याचा एकमेव दुवा म्हणजे रेडीओ होता. गांधीजींचे विचार देशभरात पोहोचवण्यासाठी रेडिओ हे माध्यम प्रभावीपणे वापरले जात असे.
वेगवेगळ्या रेडिओ स्टेशनवरून गांधीजींची आणि इतर काँग्रेस नेत्यांची भाषणे प्रसारित केली जात. ज्यामुळे लोकांना भारतीय काँग्रेस पार्टीच्या कार्यांची आणि देशभरात काय चालले आहे याची माहिती मिळत असे. संपूर्ण भारताची ब्रॉडकास्टिंग सिस्टीम बंद करून टाकल्यामुळे लोकांचा पार्टी सोबतचा दुवा तुटला.
यासंदर्भात मुंबईला काँग्रेस पार्टीची एक गुप्त मिटिंग झाली. या मीटिंगमध्ये नरिमन प्रिंटर नावाचे एक इसम होते. त्यांनी इंग्लंडमधून रेडिओ ट्रान्सलेशनची कला शिकून घेतली होती. त्यांनी शिकागो रेडिओ केंद्राचे तेव्हाचे मालक नानक मोटवानी यांना रेडिओ स्टेशन चालू करण्यासाठीचे साहित्य पुरविण्याची विनंती केली.
गांधीजींचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून आपण स्वतःची सिक्रेट रेडिओ सर्विस सुरू करू असे त्या पार्टीतील लोकांचे एकमत झाले. उषा मेहता देखील या पार्टीमध्ये सहभागी होत्या.
शेवटी अनेक खटपटी केल्या नंतर २७ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसच्या सिक्रेट सर्विस रेडिओ स्टेशनचे पहिले प्रसारण देशभरामध्ये झाले. पहिल्या प्रसारणाच्या निवेदिका होत्या अर्थातच उषा मेहता.
“४१.७८ मीटर बैंड पर एक अनजान जगह से यह इंडियन नॅशनल काँग्रेस का रेडियो है.” हे त्यांचे पहिले शब्द.
या रेडिओ स्टेशनवरून इंग्रजांनी सेन्सर केलेल्या सगळ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत असत. गांधीजींना अटक झालेली आहे, काँग्रेसचे इतर लोक जेलमध्ये आहेत, मेरठमध्ये सैनिकांनी उठाव केला त्यामध्ये ३०० सैनिक मारले गेले. अशा अनेक बातम्या त्यावेळी या सिक्रेट रेडिओने लोकांपर्यंत पोहोचवल्या.
इंग्रज सरकारला या गोष्टीची खबर लागली आणि त्यांनी हे स्टेशन कुठून चालत आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. इंग्रज सरकार पाठलागावर आहे याची कल्पना असल्यामुळे या सिक्रेट रेडिओ सर्विसच्या जागा रोजच्या रोज बदलत असत.
त्या काळात इंग्रजांचा ससेमिरा पाठीमागे असून देखील तब्बल ८८ दिवस काँग्रेसचा हा सिक्रेट रेडिओ चालला. उषा मेहता यांच्याबरोबर चंद्रकांत जवेरी बाबुभाई ठक्कर नानक मोटवानी असे इतर लोक देखील काम करत होते.
या स्टेशनमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने फितुरी केली आणि इंग्रजांना याची माहिती दिली. १२ नोव्हेंबर १९४२ रोजी इंग्रजांनी हे रेडिओ स्टेशन चालवणार्या सर्व लोकांना अटक केली.
यामध्ये उषा मेहता सहीत इतर सर्व लोक ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर पुढे खटला चालला आणि त्यांना चार वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली.
उषा मेहता धीरोदत्तपणे या शिक्षेला सामोरे गेल्या. १९४२ ते १९४६ पर्यंतची वर्षे त्यांनी जेलमध्ये काढली. जेलमध्ये प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे त्यांना इस्पितळामध्ये दाखल करावे लागले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर उषा मेहता यांनी आपले पुढचे शिक्षण घेतले आणि शिक्षकी पेशा स्वीकारला. उषा मेहता यांना भारताची पहिली ‘रेडिओ वुमन’ असा किताब मिळाला होता.
११ ऑगस्ट २०००० साली वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. अत्यंत लहान वयामध्ये देशासाठी स्वतःचे सर्वस्व झोकून देणाऱ्या उषा मेहता यांना मानाचा मुजरा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.