आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बॉलिवूडचे आकर्षण अनेकांना खेचून मुंबईत आणते, पण इथल्या भुलभुलैय्यात हरवलेल्या माणसाला स्वतःचा शोध घेणे वाटते तितके सोपे निश्चितच नाही. अनेक जण आपले नशीब आजमावायला या मुंबानगरीत येतात, ज्यांच्याकडे अस्सल कला आणि हुशारी असते त्यांना ही चमकीली नगरी कधीच निराश करत नाही.
या शहरातील संघर्षाने अनेकांना जमिनीवरून उचलून आकाशातील चमचमता तारा बनवले आहे,
अशा लोकांच्या यशाकडे पाहून अगदी कुणालाही हेवा वाटावा!
पण, हे यश मिळेपर्यंत जो कसोटीचा काळ असतो तो तरुन जाणं मात्र अगदीच कठीण असतं. असाच काहीसा संघर्ष आहे सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या या संघर्षशील प्रवासाची गोष्ट!
बिहारच्या एका छोट्या गावात, शेतकरी कुटुंबात उदित नारायण यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. आईसोबत ते लग्नासारख्या मोठ्या कार्यक्रमात जात तेव्हा मैथिलीसारखी गाणी म्हणत असत. गावात जिथे जत्रा-यात्रा भरतात तिथल्या थिएटर मधूनही ते गाणी म्हणत. शाळेतील अभ्यासापेक्षा त्यांचे मन संगीत आणि गाण्यातच रमत असे.
त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांनी अभ्यास करावा शाळा, कॉलेज शिकावं आणि चांगली नोकरी करून घराचं आणि स्वतःचं नाव मोठ्ठ करावं. पण घरची परिस्थितीच अशी होती की, गाऊन चार पैसे कमवण्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हतं. उदित जेव्हा जत्रेतून गाणी गात तेव्हा त्यांना २५ पैसे बक्षीस मिळत असे.
त्यानंतर त्यांचा आवाज ऐकून कुणीतरी त्यांना नेपाळच्या काठमांडू रेडीओ स्टेशनवर गाणे म्हणण्याची नोकरी दिली. या स्टेशनवर त्यांना महिना १०० रुपये पगार मिळत असे. या काळात त्यांना पगार कमी मिळत असला तरी गायनाचे शास्त्रोक्त धडे इथे शिकायला मिळाले ज्यामुळे त्यांच्या गायनाचा दर्जा अधिक सुधारला.
पण, एवढ्या कमी पगारात घरखर्च भागत नसल्याने नशीब आजमावण्याचे स्वप्न घेऊन ते मुंबईत आले.
१९७८ साली वयाच्या २२व्या वर्षी स्वप्नांचा पाठलाग करत उदित एक दिवस नेपाळ मधून थेट मुंबईत येऊन धडकले.
मुंबईत आल्यावर अनेक संगीतकर, गीतकार आणि गायकांची त्यांनी भेट घेतली. काही लोकांनी त्यांना मदत देखील केली देखील. पण, म्हणावे तसे यश मिळत नव्हते. आत्ता त्यांचा संसार देखील वाढत होता, त्यामुळे खर्च आणि कमाई यांचा ताळमेळ लागत नव्हता. अशावेळी ते घर चालवण्यासाठी रात्री हॉटेलमध्ये देखील गायला जात असत. पण, यातूनसुद्धा म्हणावी तशी कमाई होत नव्हती.
आदित्यच्या जन्मानंतर आपले दिवस पालटतील असा त्यांना विश्वास होता. जवळजवळ मुंबईत नऊ वर्षे घालवून देखील म्हणावे तसे यश हाती न लाभल्याने शेवटी कंटाळून गावी जाऊन शेती करून कुटुंबाचा उदारनिर्वाह सुरळीतपणे करता येईल या विचाराने त्यांनी मुंबई सोडून गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला.
पण नशिबाने त्यांच्यासाठी काही वेगळं लिहुन ठेवलं होतं कारण त्यांनी मुंबई सोडायचा विचार केला आणि त्याच वेळी,
त्यांना आमीर खानच्या “कयामत से कयामत तक” या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली.
या चित्रपटातील सर्व गाणी त्यांनीच गायली. चित्रपट प्रदर्शित झाला पण, पहिल्या आठवड्यात चित्रपट म्हणावा तसा चालला नाही. यामुळे पुन्हा कुठे आशेचा गवसलेला किरण अंधारात गडप होतो की काय अशी धुकधुक त्यांच्या मनाला वाटू लागली.
पण, दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने चांगलीच उचल खाल्ली. तिसऱ्या आठवड्यात तर चित्रपटाने उच्चांकी कमाई सुरु केली. यशासाठी तब्बल दहा वर्षे संघर्ष केला, ते यश आज त्यांच्या अगदी दारात उभे होते.
‘कयामत से कयामत’ तक मधील ‘पापा कहते है….,’
हे गाणं तर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलं होतं. या चित्रपटाने उदित नारायण यांना चित्रपट सृष्टीत नाव मिळवून दिले.
किशोर दा, लता मंगेशकर, रफी साहेब यांनाच गुरु मानून आजपर्यंतचा प्रवास केला आहे असे ते अगदी नम्रतेने सांगतात. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान यांसारख्या दिग्गज कलाकारांना त्यांनी आपला आवाज दिला.
त्यांनी गाणी गायलेला “लगान” या चित्रपटाचे ऑस्करमध्ये नामांकन झाले होते. “स्वदेस” मधील त्यांची गाणी देखील हिट ठरली.
फक्त स्वदेसच नाहीतर आजवर शेकडो हिट गाणी त्यांच्या नावावर जमा आहेत. “पापा कहते है बेटा बडा नाम करेगा, हे गाणं तर माझ्या काळजावर कोरलं गेलंय” असं उदित सांगतात.
लगान, गदार-एक प्रेम कथा, दिल तो पागल है आणि कुछ कुछ होता है यांसारख्या चित्रपटांत गाण्याची संधी मिळाली हेच माझे भाग्य आहे असे मी समजतो, असे देखील ते नम्रपणे सांगतात.
स्वातंत्र्यानंतरही ७० वर्षे नंतरही बिहारमधील त्यांच्या जन्मगावात वीज पोहोचली नव्हती. एकदा नालंदातील एका कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणे आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील उपस्थित होते. त्यांनी नितीश कुमार यांना विनंती केली की, माझ्या गावात अजूनही विजेसारखी मुलभूत सोय पोचलेली नाही, तेव्हा तुम्ही जातीने या विषयात लक्ष घालावे.
या कार्यक्रमानंतर आठवडाभारतच त्यांच्या जन्मगावात वीज पोचली देखील. यातून कितीही मोठे झालो तरी, आपल्या जन्मगावाशी आणि मातीशी असलेली आपली नाळ कधीच तुटत नसल्याचे त्यांनी आपल्या चालत्याबोलता उदाहरणातून दाखवून दिले.
फक्त हिंदी भाषेतच नाही तर त्यांनी वेगवेगळ्या ३६ भाषेतून गाणी गायली आहेत. त्यांना किमान १० वेगवेगळ्या भाषा सफाईदारपणे बोलता येतं.
त्यांना पाच वेळा फिल्म फेअर अवॉर्ड, तीन वेळा नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. इतकेच नाही तर, २००९ मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्मभूषणसारख्या नगरी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.