आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
युद्ध म्हटलं की सामान्य जनतेच्या कपाळावर आठ्या येतात. ज्यांनी युद्धानंतरचा काळ बघितला किंवा वाचला आहे, ते नक्कीच युध्द टाळण्याच्या बाजूने असतील. पण युध्दाची वेळ येतेच का??
आत्तापर्यंत अनेक कारणांसाठी युध्द झाले आहेत. एखाद्या राज्याच्या महत्त्वाकांक्षा, सीमा प्रश्न, घुसखोरी, अशा काही कारणांसाठी युध्द झालेले आपण ऐकले असतील. येणाऱ्या काळात युद्ध झालं तर ‘पाण्यासाठी’ होईल असं तज्ञ सांगतात.
युद्धाचं केवळ एकच कारण नसतं. त्यामागे बरीच मोठी पार्श्वभुमी असते. साचत गेलेला संताप, समोरच्या देशाकडून मिळणारी वागणूक व त्यांच्यासोबत असलेले संबंध या सगळ्या गोष्टी पार्श्वभुमी तयार करत जातात.
त्यामुळे परिस्थिती जर अस्थिर असेल तर किरकोळ वाटणारा प्रसंग देखील युद्ध घडवुन आणतो. ओपीयमच्या व्यवसायावरुन ब्रिटिश आणि चीन यांच्यामध्ये झालेले युद्ध आपण ऐकले असेल,
पण डुक्कर या प्राण्यामुळे सुद्धा युध्द झालं असेल याचा विचार तरी आपण कधी केला होता का?
पण या कारणावरून युध्द झालं आहे. आश्चर्य वाटलं ना ऐकून. वरवर पाहता आत्तापर्यंतच्या इतिहासात हे कारण ऐकायला सर्वांत विचित्र वाटतंच. पण या मागे बराच मोठा इतिहास आहे!
१९व्या शतकात अमेरिका आणि ब्रिटन हे दोन्ही राष्ट्र आपल्या सीमा वाढवण्यासाठी आणि वाचविण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत होते. या दोन्ही देशांमध्ये सीमावाद तर अखंड सुरू होतेच. हे वाद मिटविण्यासाठी ऑरेगोन तह करण्यात आला होता.
या तहाचा मुख्य हेतु दक्षिण अमेरिका (सध्याचा कॅनडा) आणि ब्रिटन यांच्यातील सीमा प्रश्न सोडवणे हा होता. पॅसिफिक समुद्राची किनारपट्टी व आजूबाजूचा डोंगराळ प्रदेश यांच्या सीमा हा मुख्य प्रश्न होता. पण फक्त नकाशावर रेषा ओढून सीमा ठरवता येत नसतात.
भौगोलिक, नैसर्गिक आणि बरेचदा सांस्कृतिक प्रश्नांचा देखील विचार करावा लागतो. वॅनकुवरच्या दक्षिण-पश्चिम भागात काही बेट होते, त्यांची भौगोलिक स्थिती थोडी किचकट होती. एका चॅनलने वॅनकुवर व खंडाला विभाजित केले होते. त्यानुसार सीमा प्रश्न सोडवावे असे त्या तहात नमूद होते.
पण बेटांच्या किचकट रचनेमुळे हे थोडं अवघड जाणार हे निश्चीत होतं. ज्या बेटावर दोन्ही देशांची खास नजर होती.
ते सगळ्यांत मोठे आणि महत्वाचे बेट होते, सॅन जूआन.
सैनिकी रणनीती व भौगोलिक दृष्टीने या खंडाला अनन्यसाधारण महत्व होते. आणि ते चॅनल याच बेटात उघडते. त्यामुळे हे बेट घेण्यासाठी दोन्ही राष्ट्र कसोशीचे प्रयत्न करु लागले.
दोन्ही राष्ट्रांनी यावर आपला हक्क सांगितला. एवढंच नव्हे तर नागरिकांना तिथे राहण्याची परवानगी सुध्दा दिली. १८५९ सालापर्यंत तिथे ब्रिटिश नागरिकांची वस्ती वाढली होती. त्या ठिकाणी विविध व्यवसाय देखील सुरू झाले.
हडसन्स बे या प्रतिष्ठित कंपनीने तिथे व्यवसाय सुरू केला. हळूहळू अमेरिकन नागरिकांची सुद्धा संख्या वाढायला लागली. हे सगळं सुरळीत सुरू असतानाच एक घटना घडली.
घटना फार किरकोळ होती, पण परिस्थिती बिघडवण्यासाठी दोन्ही देशांकरीता एक उत्तम कारण घडलं.
ब्रिटिश वसाहतीतील एका डुकराने अमेरिकन नागरिकाच्या शेतात शिरून बटाटे खाल्ले, एवढी क्षुल्लक घटना होती ती.
लेमन कटलेर असं त्या अमेरिकन शेतकऱ्याचं नाव. हे बघताच रागात त्याने त्या डुकराला गोळी मारून ठार केले. हे डुक्कर हडसन बे कंपनी मधे काम करणाऱ्या चार्ल्स ग्रीफीनचं होतं.
हा प्रसंग पहिल्यांदाच झाला नव्हता. ग्रीफीन अनेकदा आपले डुक्कर असे वाऱ्यावर सोडायचा आणि ते इतरांच्या शेतात सर्रासपणे घुसत. या वेळी मात्र हा वेगळाच प्रकार घडला.
डुक्कराला मारलं ही बातमी ऐकून कटलरला ग्रीफीनने बोलावून घेतले. कटलरने त्याला पैसे देखील देऊ केले पण तो ऐकायला तयार नव्हता. ग्रीफीनने त्याची तक्रार अधिकाऱ्यांकडे केली.
त्यांनी त्याला अटक करण्याची धमकी दिली. या प्रकरणामुळे अमेरिकन नागरिक संतापले. आणि सुरक्षेची मागणी त्यांच्या सरकारकडे केली.
ऑरेगॅन तहाचे अधिकारी जनरल विल्यम हार्न यांच्या पर्यंत हा अर्ज पोहचला.
शहानिशा करून त्यांनी २७ जुलै १८५९ ला बेटावर सैन्य पाठवलं. हे ऐकताच तत्कालीन ब्रिटिश गवर्नर जेम्स डोग्लास यांनी देखील सैन्य पाठवायला सुरुवात केली. हळूहळू दोन्ही देश बेटावर आपली सैनिकी ताकद वाढवत होते.
वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनलं होतं. इतकी छोटीशी घटना दोन राष्ट्रांतील अस्थिरतेचं निर्माण कारण बनली. २६०० सैनिक, ८४ बंदूका आणि ३ युध्दनौका दोन्ही बाजूने तैनात करण्यात आल्या होत्या.
अड्मिरल रॉबर्ट बेन्स यांच्या पुढाकाराने ही परिस्थिती शांत झाली. खरंतर डोग्लस यांनी त्यांना बेटावर चाल करून ब्रिटिश सैन्याशी युध्द करण्याचे आदेश दिले होते, पण त्यांनी यासाठी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले,
दोन बलाढ्य राष्ट्रांमधे एका डुक्करासाठी कधीही युद्ध होवु देणार नाही.
त्यांनी दोन्ही राष्ट्रांना शांततेत विचार करण्याचा सल्ला दिला. इतिहासात एका डुकरामुळे दोन राष्ट्र लढले असा उल्लेख नसावा हा त्यांचा युक्तीवाद सर्वांना पटला. अखेर अमेरिकाने आपला कँम्प दक्षिणेकडे हालवला आणि ब्रिटनने उत्तरेकडे.
दोन्ही राष्ट्रांनी आपले सैन्य मागे घेतले तसेच संख्याबळ कमी केले. १८७२ साली कैसर विलिअम यांच्या मध्यस्थीनंतर हे बेट अमेरिकेला देण्याचा निर्णय झाला. पण आज दोनही देशांचे नागरीक या बेटाला भेट देऊ शकतात.
दोन्ही राष्ट्रांचा ध्वज तेथे फडकावण्यात येतो. हे कदाचित एकमेव उदाहरण असेल ज्यात अमेरिकन धरतीवर परकीय राष्ट्राचा ध्वज फडकावला जातो. शांतता व दोन्ही राष्ट्रांमधील मैत्रीचं प्रतिक दोन्ही राष्ट्रातील अधिकारी व नागरीक या जगेकडे बघतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.