आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लेखक – श्रीपाद कुलकर्णी
जेव्हा कोणी मला तुझा आवडता ट्रॅव्हल व्लॉगर कोण असा प्रश्न विचारतं तेव्हा जास्त वेळ न दवडता तोंडातून नाव येत ते जीवन कदमचं. कोण हा जीवन कदम ? लोकांना हा एवढा जवळचा का वाटतो? तर आज जाणून घेऊया या व्यक्तिमत्वा बद्दल.
मूळचा सातारा जिल्ह्यातला एका लहानश्या खेड्यातला असणारा पण पोटापाण्यासाठी मुंबईत राहणारा हा तरुण तुमच्याआमच्या सारखाच एक सामान्य माणूस आहे. ज्याला फिरण्याची आवडत आहे व भटकंती हा त्याचा छंद आहे.
आपली सॉफ्टवेअरइंजिनिअर ची नोकरी सांभाळत व छंद जोपासत गेल्या 4 वर्षांपासून आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या विशाल सौंदर्यसृष्टीचे अवघ्या जगाला दर्शन व्हावे या उद्देशाने जीवन स्वतः फिरत असलेल्या ठिकाणांचे माहितीपर व्हिडिओ बनवत असतो जे जगभरातून पाहिले जातात.
जीवन कदम याच्या स्वतःबद्दल किंवा त्याच्या स्वभावाबद्दल सांगायच झालं तर साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील चंचळी गावात वाढलेला हा तरुण, हा असा तरुण ज्याला शिक्षणात अज्जिबात रस नव्हता. असा तरुण जो दहावीची परीक्षा असताना क्रिकेट खेळायचा, गुरे चारायचा.
घरची परिस्थिती पहायची झाली तर ती सुद्धा जेमतेम. वडिलांची नोकरी गेलेली, पुस्तके घ्यायची झाली तर आठवडाभर दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करावी लागायची. एवढेच काय तर शिक्षण घेताना कधीकाळी १०० रुपयात संपूर्ण एक महिना सुद्धा काढलेला, पण वाढत्या वयाने जशी समज आली तस शिक्षणाचा महत्व समजू लागलं व जेमतेम ५०/५५% टक्के मिळवणारा हा मुलगा उच्चशिक्षणाच्या वेळी ७०% मिळवून टॉप ५ मध्ये होता.
हा सगळा युट्युबचा प्रवास कुठे चालू झाला असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा जीवन सांगतो,
की २०१६ साली गावाच्या जवळ असलेल्या तापोळा येथे मित्र फिरायला आले होते. त्यांनी मला गावातून येऊन त्यांना जॉईन करायला सांगितलं, पण नंतर त्यांच्या फोनचं नेटवर्क गेलं आणि त्यांचा संपर्क तुटला.
पण काहीही झालं तरी आपण त्यांना शोधून काढुया असं म्हणून या गड्याने त्या मित्रांच्याकडे जाण्याचा प्रवास चालू ठेवला आणि चालता चालता आपला कॅमेरा चालू करून ते सगळं रेकॉर्ड केलं जेणेकरून मित्रांना दाखवता येईल की मला इथवर येण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागला व त्यांना त्याची जाणीव होईल.
नंतर ते काही दिवसांनी एडिट केलं युट्युबला अपलोड केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला व मग बदल होत गेले सुधारणा होत गेल्या. आणि या सगळ्यात सुखावणारी बाब ही आहे की आज जीवन कदम व्लॉग्सने अडीच लाखांच्या पेक्षा जास्त Subscribers चा टप्पा ओलांडलाय.
हे सगळं बदलत कसं गेलं? व्हिडिओ मध्ये/माहिती मध्ये बदल कसा केला किंवा आपण बदललं पाहिजे असं केव्हा वाटलं तेव्हा जीवन सांगतो की त्याच्या एका भावाने त्याला प्रश्न केला होता की तू हे का करतोय ?
त्यावर त्याचं उत्तर होतं की मला आवडतं म्हणून करतोय मग ते लोकांनी का पाहावं ? त्यातून लोकांना काय मिळेल? असा प्रश्न जेव्हा त्या भावाकडून विचारला गेला तेव्हा त्याच्या लक्षात काही गोष्टी आल्या व मग बदल होत गेले, त्यात नवनवीन प्रयोग होत गेले. माहिती वाढत गेली.
गडकिल्ले या विषयांवर माहितीपर व्हिडिओ करण्यामागे नेमकं कारण काय आहे असं विचारलं तर या तरुणाकडून उत्तर येतं, की जर आपल्याला आजच्या पिढीला इतिहासात घेऊन जायचे असेल तर आपल्याकडे मुख्य माध्यम आहे ते म्हणजे पुस्तक. जे की माहितीचा समुद्र आहेत. पण तरुणाईचा प्रामुख्याने कल हा जे सहज उपलब्ध होईल त्याकडे असतो, म्हणून इतिहासपर पुस्तके मिळवून वाचण्यासाठी जी मेहनत असते त्या तुलनेत त्यांना युट्युबवर हा विषय फार पटकन व सहजपणे मिळून जातो. ते या माध्यमातून गडकिल्ले आपला इतिहास या सगळ्या गोष्टींकडे आपसूकच वळले जातात.
या चॅनेल वर असलेल्या व्हिडिओ मध्ये जास्तीत जास्त महितीसोबतच एक विशेष प्रकारचं संगीत वापरलं जातं, त्यामागे असणारं कारण सुद्धा केवळ हेच आहे की तरुणांनी या विषयाकडे ओढलं जावं. त्यांना या विषयाची आवड निर्माण व्हावी. गडकिल्ले हे केवळ पर्यटनस्थळ म्हणून न पाहता आपला वारसा म्हणून पाहिले जावेत. त्यांचं पावित्र्य राखलं जावं ही जीवन याची मनोमन इच्छा असते. तो यासाठी गडकिल्ले व इतिहास या सगळ्यावर व्हिडिओ बनवत असतो.
आज जीवन कदम च्या युट्युब चॅनेलवर तब्बल 240 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत, आपल्या भागाचं निसर्गसौंदर्य जगभर पाहिलं जावं म्हणून ट्रॅव्हल व्लॉग्सने चालू झालेल्या या प्रवासात आता त्याची स्वतःची जीवनपद्धती, महाराष्ट्रातील गडकिल्ले अशा नानाविध आवडणाऱ्या गोष्टी जीवन त्याच्या दर्शकांना दाखवत असतो.
याच्यामागे असलेला उद्देश सांगायचा झाला तर जीवन सांगतो की मला नेहमी वाटत असतं की आपण समाजाचं देणं लागतो जे आपण दिलं पाहिजे. मग मी माझ्या परीने विचार केला तर मी काय देऊ शकतो तर मी आज लोकांना माहिती देऊ शकतो. लोकांना घरबसल्या फिरवून आणू शकतो त्यांना आनंद देऊ शकतो आणि हीच गोष्ट मनात ठेऊन स्वतःचा छंद जोपासत हा प्रवास चालू आहे…!
आजकाल युट्युब चॅनेल चालू करण्याची क्रेझ आहे, खूप तरुण मोठ्या प्रमाणात व्लॉग्ज बनवत असतात तर यांना काय सांगशील किंवा यावर तुझं मत काय ? असं विचारल्यावर जीवन कदम सांगतो, की जर तुम्ही फक्त पैसे मिळतील म्हणून युट्युबकडे पाहत आहात तर ते अत्यंत चुकीचं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला काय आवडत ते पहा त्या गोष्टीवर भर द्या. आजच्या घडीला तुम्ही इतर डिजिटल माध्यमातून युट्युबपेक्षा जास्त पैसे मिळवू शकतात. आणि जर खरच आवड म्हणून युट्युबवर असाल तर तुमच्या साहित्यावर भर द्या.
ते दिवसेंदिवस चांगलं कस होईल याकडे लक्ष द्या कारण तुमचं काम पाहून तुमच्याकडे मोठे ब्रँड्स येत असतात आणि मग त्यातून पैसे मिळतात. यातून तरुणांनी योग्य पद्धतीने जावं हा त्याचा विचार व त्यामुळे तो तरुणांना करत असलेलं मार्गदर्शन यातून त्याची एक सामाजिक बाजू दिसते..
तर आज आपलं गावाकडचं घर, आपलं मुंबईत असणार कुटुंब, स्वतःची सॉफ्टवेअर इंजिनियरची नोकरी हे सगळं सांभाळून मग स्वतःचे छंद जोपासत भटकंती करणारा जबाबदार जीवन नक्कीच भटकंतीचा छंद असणाऱ्या तरुणांसाठी आदर्श आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.