आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक अशा घटना घडल्या ज्याने पूर्ण जगाला विस्मित करून सोडले. हे युद्ध अनेक कारणांनी इतिहासात नोंदवले गेले आहे. क्रौर्य आणि हुकुमशाहीवर मात करून शेवटी युद्ध हा पर्याय नाही असे म्हणत या युद्धाचा अंत कसा झाला आणि त्यानंतर जागतिकीकरणाची गणिते कशी बदलली हे देखील या युद्धातून शिकण्यासारखे आहे.
या युद्धात शत्रू राष्ट्रे आणि मित्र राष्ट्रे यांच्या सेना, त्यांचे सैनिक, ज्यांनी या युद्धात असीम शौर्य गाजवले असे लोक आणि यांच्या सुरस कहाण्या प्रसिद्ध आहेत.
दुसऱ्या महायुद्धात जपान आपलं सर्वस्व पणाला लाऊन उतरला होता. जपानी सैनिक जीवावर उदार होवून युद्ध लढत असत, जर एखादी लढाई अथवा उठाव ते हरले तर त्याक्षणी स्वत:ला गोळ्या घालून घेण्याचे त्यांना आदेश दिलेले होते आणि या आदेशाचे पालन त्यांचे बहुतांशी सैनिक करत असत. त्यातलीच एक कहाणी आपण आता बघणार आहोत ती म्हणजे हिरू ओनोडा नावाच्या जपानी सैनिकाची.
हिरू ओनोडा वयाच्या २० व्या वर्षीच जपानच्या सैन्यात भारती झालेला होता. अत्यंत शूर आणि कुठलीही कामगिरी फत्ते करून येणारा सैनिक असा त्याचा नावलौकिक होता.
डिसेम्बर १९४४ मध्ये ओनोडो आणि त्याच्याबरोबर एका लहानशा सैनिकांच्या तुकडीला फिलिपाइन्स देशातील लुबंग नावाच्या बेटावर पाठवण्यात आले. तिथे असलेले अमेरिकन एअरस्ट्रीप आणि जहाज तळ उध्वस्त करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते.
जर समजा सोपवलेले काम पार पाडले नाही तर कोणाही सैनिकाला आत्महत्त्या करण्यावर बंदी घालण्यात आली होते याचे कारण म्हणजे त्या काळात जपानची सर्व आघाड्यावर पीछेहाट चालू होती, युद्ध हरण्याचे संकेत मिळत होते त्यामुळे जपानी सैनिक जिथे कुठे युद्ध हरतील तिथे आत्महत्त्या करत होते.
ओनोडो आणि त्याच्या तुकडीला सांगण्यात आले जर तुम्ही या लुबंग बेटावर अडकलात तर तिथे तुमची सुटका करण्यासाठी कोणी येईपर्यंत तुम्हाला तेथील भयानक जंगलात तग धरून राहावे लागेल.
या बेटावर गेल्यानंतर जपानला पराभव पत्करावा लागला. १९४५ साली अमेरिका आणि फिलिपाइन्सने या बेटावर कब्जा मिळवला. ओनोडा बरोबरचे अनेक सैनिक मारले गेले आणि बाकीचे युद्धकैदी म्हणून सापडले. मात्र ओनोडा त्याच्या ३ साथीदारसह जंगलामध्ये निसटला.
युद्ध करताना घेतलेल्या शपथेला स्मरून त्यांनी ठरवले की ते शेवट पर्यंत लढत राहतील. लुबंग बेट फक्त २५ किलोमीटरचा व्यास असलेले आहे मात्र या बेटाचा भाग अत्यंत घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या सैनिकांना तेथील जंगलात लपणे सोपे गेले.
या चार उरलेल्या जपानी सैनिकांनी त्या बेटावर अक्षरश: गुरील्ला पद्धतीचे युद्ध आरंभले. अचानक कुणाला खबर लागू न देता अंधारात हल्ले करायचे आणि कुणाच्या लक्षात येण्यापूर्वी लगोलग जंगलात पसार व्हायचे ही पद्धत त्यांनी अवलंबिली. त्यांनी जवळजवळ ३० फिलिपिन्स नागरिक मारले अनेक वेळा पोलिसांबरोबर हातापाई केली. तरीही त्यांना पकडण्यात तेथील लोकांना यश आले नाही.
१९४५ साली एके दिवशी या ओनोडो आणि त्याच्या ३ सहकाऱ्याला एक बोर्ड त्यांच्या नावे लिहून ठेवलेला आढळला. त्यावर लिहिले होते की आता युद्ध संपले आहे तुम्ही जंगलातून बाहेर या. ओनोडोचा आणि त्याच्या साथीदारांचा याच्यावर विश्वास बसला नाही. आपल्याला फसवण्यासाठी ही काहीतरी शत्रूची चाल आहे असं त्यांना वाटलं आणि १९४५ नंतर सुद्धा त्यांचे युद्ध चालू ठेवले.
या चौघांना अजून काही महिन्यांनी हवेतून विमानाने खाली सोडलेले आणखी एक पोस्टर दिसले त्यावर लिहिले होते मी सध्याच्या स्थितीमधील जपानी लष्कराचा सैन्य प्रमुख टोमोयुकी यामाशिता तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही या दाट जंगलातून बाहेर येवून माझ्यासमोर सरेंडर करा.
आता हे पोस्टर खरोखर जपानच्या अधिकाऱ्यानेच फिलिपिन्स सरकारच्या विनन्तीवरून टाकले होते पण आपल्या देशाबरोबर शेवटपर्यंत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेल्या ओनोडो आणि त्याच्या ३ साथीदाराने या पोस्टर ला सुद्धा भीक घातली नाही आणि त्यांचे युध्द चालूच ठेवले. या चौघांपैकी एकाचा पुढे जंगलात विषारी वनस्पती खाण्यात आल्याने मृत्यू झाला आणि पाठीमागे उरले ते ओनोडो आणि त्याचे दोन सैनिक.
१९४७ साली २ वर्षानंतर एक दिवस विमानातून या लुबंग बेटावर घनदाट जंगलात या ४ जणांच्या कुटुंबाचे असंख्य फोटो, युद्ध जिंकल्याचे फोटो, जपानने सरेंडर केल्याचे फोटो सोडण्यात आले. परंतु ही देखील अमेरिकन सैन्याची आपल्याला बाहेर काढण्याची एक ट्रिक आहे असेच ओनोडो आणि त्याच्या सहकाऱ्यांना वाटले त्यांनी आपले छुपे युद्ध चालू ठेवले.
त्यांच्याकडील अन्नधान्याचा पुरवठा सुद्धा संपत आलेला होता. अनेक दिवस ते बेटावरील नारळ आणि केळी खाऊन जगले. खुप वेळा जंगली प्राणी मारून त्यांनी स्वत:चा उदरनिर्वाह केला.
परिस्थिती भयानक होती, प्रचंड गरमी, प्रचंड पाउस आणि थंडीचा सामना जंगलात राहताना करावा लागत होता. या तिघांनी स्वत:साठी जंगलात फांद्यांच्या सहाय्याने राहण्यासाठी कॉटेज बांधलेले होते. या ओनोडोचा एक साथीदार १९५४ साली एका चकमकीत मारला गेला, दुसरा त्याचा साथीदार कोझुका १९७२ साली पोलिसांनी केलेल्या encounter मध्ये ठार झाला. उरला फक्त ओनोडो जो १९४४ चं दुसर महायुद्ध अजूनही लढत होता जे १९४५ साली संपलं होत.
१९७४ साली ओनोडो जेव्हा फिलिपिन्स नागरिकांविरुद्ध लढत होता तेंव्हा त्याची भेट नोरीया सुजुकी नावाच्या विद्यार्थ्याबरोबर झाली जो ते बेट पाहण्यासाठी आलेला होता. सुजुकीने त्याला युद्ध अनेक वर्षापूर्वी संपल्याचे सांगितले पण त्यावर ओनोडोने विश्वास ठेवला नाही.
सुझुकी ओनोडो बरोबरचे फोटो घेवून जपानला परत आला आणि त्याबाबत त्याने लोकल न्यूजपेपर मध्ये लिहिले. जपान सरकारला त्याच्याबाबत माहिती कळवण्यात आली. हे पाहून जपान सरकारने या ओनोडोचा जुना कमांडर, जनरल तानिगुची जो आता रिटायर झाला होता त्याला शोधून फिलिपिन्सला ओनोडोला परत आणण्यासाठी पाठवले.
त्याप्रमाणे तानिगुची फिलिपिन्सला पोचला तिथल्या जंगलात त्याची फायनली ओनोडो बरोबर भेट झाली आणि त्याने जपान १९४५ साली युद्धात हरला असून आता ओनोडोने हे युद्ध बंद करावे आणि देशात परत यावे अशी आज्ञा त्याला दिली.
हे सगळ ऐकून ओनोडो हादरून गेला. जेव्हा तो जपान मध्ये आला तेव्हा संपूर्ण देशाने त्याचा जंगी सत्कार केला पण त्यानंतर आयुष्यभर ओनोडो आपला देश १९४५ साली हरला या दु:खातून बाहेर येउ शकला नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.