आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
पूर्वी इराण, अफगाणिस्तान मार्गे भारतावर सतत आक्रमणे होत होती. त्यामार्गे देशातून प्रचंड लूट पाश्चिमात्य देशांत जात होती. त्यांच्यासाठी भारत म्हणजे “सोने की चिडियाँ”. पण या आक्रमणांमुळे अगदी इंग्रज राजवटीच्या आधीपासूनच या ‘चिडिया’चे पंख सतत छाटले जात होते.
१२९० ते १३२० या कालखंडात दरम्यान एक असाच क्रूर वंश भारताला घायाळ करीत होता. तो म्हणजे खिलजी वंश. त्यातला सर्वात भयानक शासक म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीनने भारतीय जनतेवर प्रचंड अन्याय अत्याचार केले, स्त्रियांवर बलात्कार केले. क्रूरतेच्या सगळ्या सीमा त्याने पार केल्या होत्या.
इसवीसन १२९० पर्यंत भारतावर गुलाम वंशाचे राज्य होते. गुलाम वंशातील शेवटचा राजा म्हणजे कैकुबाद. त्याच्या पतनानंतर गुलाम वंश संपला आणि भारतातील खिलजी वंशाचे राज्य सुरू झाले. आता खिलजी नेमके कोण होते आणि कुठल्या प्रदेशातून आले होते यावर इतिहासात बरेच विवाद आहेत. काहीजण खिलजी हा चंगेज खानचा जावई म्हणजेच कुलीन खानचा वंशज होता असे म्हणतात. तर काही इतिहासकार खिलजींना तुर्कांच्या वंशापैकी एक असल्याचे मानतात. याबाबत बरेच मतप्रवाह आहेत. असेही मानले जाते की भारतात येण्यापूर्वी हे लोक हेलमंद नदीच्या तीरावर राहत होते आणि त्या प्रदेशाला ‘खिलजी’ असे नाव होते. त्यावरूनच या वंशाला खिलजी नाव पडले असावे.
तर असे हे खिलजी भारतात आल्यानंतर त्यांनी गुलाम वंशाचे पतन केले. कैकुबाद हा शेवटचा गुलाम शासक फार काही ताकदवान नव्हता. त्याला हरवून स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी जलालुद्दीन खिलजीला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. जलालुद्दीनने दिल्ली काबीज करून गुलाम वंशाचा नायनाट केला.
हा जलालुद्दीन कोण?
तर हा कुठल्या साम्राज्याचा शासक नव्हता. तो गुलाम वंशाचा सुलतान गयासुद्दीन बलबनच्या सैन्यातील एक शिपाई होता. बलबनच्या कारकिर्दीत जलालुद्दीन याने बलबनच्या सैन्याचे नेतृत्व केले आणि मंगोल आक्रमणाविरुद्ध मोर्चेबांधणी केली होती. गयासुद्दीननंतर कैकुबाद या शेवटच्या गुलाम शासकाने जलालुद्दीनची कामगिरी पाहून त्याला गव्हर्नर पद बहाल केले होते. त्यानंतर त्याला संपूर्ण सेनेचा सर्वोच्च अधिकारी बनवण्यात आली.
हातात एवढे अधिकार मिळाल्यानंतर मात्र जलालुद्दीनची हाव वाढली, त्याची नजर आता दिल्लीच्या तख्तावर पडली. सुलतान कैकुबाद हा होताच विलासी वृत्तीचा त्यामुळे त्याच्या सिंहासनाला भगदाड पाडणे जलालुद्दीनसाठी फारच सोपे होते.
त्याने कैकुबाद आणि त्याचा वजीर निजामउद्दीन यांच्याविरुद्ध एक षडयंत्र रचले आणि दिल्लीची सत्ता हस्तगत केली.
दिल्लीची सूत्र हातात घेतली त्यावेळी जलालुद्दीन तब्बल ७० वर्षाचा होता. असं म्हणतात की तो एक चांगला शासक होता. त्याने राज्यात कोणत्याही अपराध्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली नव्हती. सत्ता मिळाली असली तरी जलालुद्दीनला त्याच्या राजदरबारातच काही प्रतिस्पर्धी होते. त्यातलाच एक म्हणजे किल्शु खान. हा गयासुद्दीन बलबनचा भाचा होता आणि स्वतःला बलबनचा उत्तराधिकारी समजत होता. पण खिलजीने दिल्ली काबीज केल्यामुळे किल्शुच्या इराद्यांवर पाणी फिरवले गेले.
त्याने या गोष्टीचा बदला घ्यायचं ठरवलं आणि अवधच्या शासकासोबत हातमिळवणी करून जलालुद्दीन विरुद्ध रणशिंग फुंकले. पण सुलतानचा मुलगा अर्कालीखान यानेच किल्शू खानाला धूळ चारली, आणि त्याला कैद करून घेतले.
किल्शु खानला हरवल्यानंतर जलालुद्दीन याने आपला पुतण्या अल्लाउद्दीनला इलाहाबाद जवळील कारा प्रांताचा गव्हर्नर घोषित केले. अल्लाउद्दीन हा जलालुद्दीनचा भाऊ शहाबुद्दीनचा मुलगा होता. जलालुद्दीनने त्याला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळले होते. अल्लाउद्दीन एकामागून एक मोहिमा गाजवत होता. १२९२ मधे त्याने माळवा आणि भिलसा प्रांत लुटला.
आपला काका जलालुद्दीनचे मन जिंकून घेण्यासाठी त्याने जलालला मोठ्या प्रमाणात सोने व मौल्यवान हिरे भेट म्हणून दिले. त्याने जलालुद्दीनकडून खूप मानसन्मान मिळाला. पण तो फक्त एवढ्यावरच खुश होणारा माणूस नव्हता. त्याची नजर संपूर्ण साम्राज्यावर होती.
अल्लाउद्दीनच्या साम्राज्य लालसेच्या आहारी जाऊन आपला काका जलालुद्दीनला विश्वासघाताने ठार मारले. त्याने उभारलेल्या साम्राज्यावर पुढचा सुलतान म्हणून अल्लाउद्दीन विराजमान झाला.
त्यानंतर त्याचा मंगोलांशी सतत संघर्ष सुरू झाला. मंगलांनी दिल्लीवर सतत हल्ले केले पण अल्लाउद्दीनने त्यांना धूळ चारली. त्याने जालंधर, किली अमरोहा, रावी इत्यादी युद्धांमधे विजय प्राप्त केला. त्यानंतर सुद्धा त्याने दिल्लीच्या आसपास राहणाऱ्या जवळपास ३०००० मंगोलांची निर्घृणपणे हत्या करून त्यांच्या स्त्रियांना व मुलांना त्याने आपले गुलाम बनवले.
पुढे त्याने रणथंबोर येथील रजपूत किल्ल्यावर हल्ला केला. त्याच्या कारकिर्दीत तो पहिल्यांदाच इथे पराभूत झाला. त्याने पुन्हा तयारी करून रणथंबोरवर हल्ला केला आणि दुसऱ्या वेळी मात्र तो विजयी झाला. या लढाईत पृथ्वीराज चव्हाण यांचे वंशज राजा हमीर देव धारातीर्थी पडले. हळूहळू त्याने दक्षिण भारतातसुद्धा बऱ्याच राज्यांवर आपला झेंडा रोवला होता.
अल्लाउद्दीन जगज्जेता सिकंदरला आपला आदर्श मानत होता. एवढेच नव्हे तर तो स्वतःला सिकंदर द्वितीय म्हणत असे. त्याने स्वतःच्या या नावाच्या मुद्रा सुद्धा कोरल्या होत्या आणि सिकंदर-ए-सानी असे बिरुदसुद्धा धारण केले होते.
अल्लाउद्दीन त्याच्या अनेक गैर कृत्यांसाठी ओळखला जायचा. तू स्त्रीलंपट तर होताच शिवाय त्याचा सेवक मलिक कफुरसोबत सुद्धा त्याचे अनैतिक संबंध होते. राणी पद्मावतीला मिळवण्याच्या लालसेपोटी त्याने मोठा रणसंग्राम घडवून आणला होता. त्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जात असे. असे असले तरीही इतिहासकार त्याचा उल्लेख एक कुशल सेनापती म्हणून जरूर करतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.