आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
इंग्रज भारतात असताना त्यांनी भारताचे फक्त राजकीय स्वातंत्र्यच नाही तर सांस्कृतिक स्वातंत्र्यही हिरावून घेतले. भारतातल्या अनेक मौल्यवान गोष्टी त्यांनी चोरून इंग्लंडला नेल्या. रत्नजडीत मयुर सिंहासन, अन्नपूर्णा देवीची १८ व्या शतकातील मुर्ती, अनेक नाणी, चित्रे आजही इतर देशांच्या संग्रहालयांची शान वाढवत आहेत.
आज आपण अशाच काही विविध मार्गांनी भारताबाहेर गेलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जाणुन घेणार आहोत.
इंग्रजी शब्दकोशात सुरूवातीला स्थान मिळवणाऱ्या काही शब्दांपैकी एक भारतीय शब्द होता, “लूट”. यावरुन इंग्रजांनी भारताच्या संपत्तीची केलेली लयलूट किती जास्त होती याचा अंदाज येतो.
१८ व्या शतकात इंग्रज अधिकाऱ्यांनी अनेक छायाचित्र, नाणी, हस्तलिखीते भारतातुन इंग्लंडला नेली.
बंगालचा पहिला गवर्नर असलेल्या रॉबर्ट क्लाईव्ह, याच्या घरात असलेल्या मुघल कलाकृतींची संख्या भारतात बाकी असलेल्या कलाकृतींपेक्षाही जास्त होती असे म्हटले जाते. या कलाकृतींमध्ये विविध हिरेमाणकं, रत्नजडीत खंजीर इत्यादी गोष्टींचा समावेश होता.
आपण केलेली लूट ही योग्य होती असंच दाखवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. इंग्रजांनंतर हा वारसा तस्करीच्या रुपात दुसऱ्या देशात गेला. सुभाष कपूर, विजय नंदा, दीनदयालन या लोकांची आजही याविषयी न्यायालयीन चौकशी सुरू आहे. आपल्या वर्चस्वाची छाप सोडण्यासाठी इंग्रज अधिकारी भारतीय कलाकृती लुटत असले तरी स्वातंत्र्यानंतर पैसे कमवण्यासाठी अनेक भारतीय या ऐतिहासिक वारशाची तस्करी आजही करत आहेत.
मागच्या काही वर्षांत अनेक जुन्या कलाकृती भारतातून अवैधरीत्या निर्यात झाल्या आहेत. युनेस्कोच्या अहवालानुसार १९७९-८९च्या दशकात ५०,०००पेक्षा जास्त कलाकृती भारतातून निर्यात झाल्या होत्या. भारत सरकारने या वस्तूंचे महत्त्व लक्षात घेऊन त्या पुन्हा भारतात आणण्याचे काम सुरू केले. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या माहितीनुसार २०१४ ते २०२० या कालावधीत ४० कलाकृती भारतात परत आणण्यात यश आले आहे. तर, ७५-८० कलाकृती देशात परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भारतातून बाहेर गेलेल्या वस्तूंपैकी सर्वात महत्त्वाचे स्थान आहे ते बौद्ध मंदिर, अमरावती स्तूप, जे आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात इ.स. पूर्व ३ऱ्या शतकात स्थापित केले गेले होते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा कोलिन मॅकेन्झीने उत्खनन केले तेव्हा ते लोकांच्या लक्षात आले. १८४५ पर्यंत सर वॉल्टर इलियट यांनी शिल्पातील काही भाग काढून ते मद्रास संग्रहालयात ठेवले, तेथून ते १८५९ मध्ये लंडनला हस्तांतरित केले गेले. ते भारतात खराब होतील अशी सबब देत. सध्या ब्रिटिश संग्रहालयात मयुर सिंहासनाबरोबरच ही वास्तू ठेवली गेली आहे. या दोन्ही वास्तू भारतात परत आणण्यासाठी कोणतीही राजकीय इच्छाशक्ती अजून तरी दिसत नाही.
मॅकेन्झी याला भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली याने दक्षिण भारतातील कलाकृती, इतिहास आणि धर्म यासंबंधी सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त केले होते.
कारकीर्दीच्या शेवटी, त्याच्या संग्रहित वस्तूंमध्ये ६२१८ नाणी, १०६ चित्र, ४० पुरातन वास्तू, १५६८ हस्तलिखिते, तसेच मंदिरातील शिलालेख आणि ताम्रपटांचा समावेश होता.
१८२० च्या दशकात, मॅकेन्झीच्या मृत्यूनंतर, लेखक एच. एच. विल्सन यांनी त्याचा संपूर्ण संग्रह लंडनला पाठवला. यापैकी काही लंडनहॉल स्ट्रीट येथील मुख्यालयात असलेल्या छोट्या संग्रहालयात प्रदर्शन करण्यासाठी ठेवले गेले होते.
ब्रिटिश संग्रहालयात भारतीय पुरातन वस्तूंचा मोठा हिस्सा आहे, त्यातील बहुतेक मेजर जनरल चार्ल्स स्टुअर्ट यांच्या संग्रहातील आहेत. स्टुअर्ट हे १७७७ ते १८२८ पर्यंत भारतात राहिले. ते मुख्यतः बिहार, बंगाल, ओरिसा आणि मध्य भारतातील भारतीय शिल्पकलेविषयी त्यांना असलेल्या आकर्षणासाठी ओळखले जात. त्यांचा संग्रह जॉन ब्रिजने १८२९-१८३० मध्ये लंडनमध्ये लिलावात खरेदी केला होता. ब्रिटिश संग्रहालयाने १८७२ साली त्यांच्या वारसदारांकडून हा संग्रह घेतला.
१८ व्या शतकाच्या अखेरीस, ईआयसीचे (ईस्ट इंडिया कंपनी) बरेच अधिकारी इंग्लंडला परत आले होते आणि त्यांनी भारतात मिळवलेल्या भारतीय सांस्कृतिक वारशाचा सांभाळ करण्यासाठी ते सक्रियपणे प्रयत्न करीत होते. याचंच एक उदाहरण म्हणजे ब्रिटीश ग्रंथालयातील ‘इंडिया ऑफिस रेकॉर्डस’चा संग्रह होता.
१८०१ मध्ये त्याने सेवानिवृत्त कंपनी सेवक रिचर्ड जॉन्सनकडून लघुचित्रांचा पहिला विशाल संग्रह विकत घेतला.
जॉन फ्लेमिंग आणि फ्रान्सिस बुकानन हॅमिल्टन यासारख्या अन्य कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हिंदू देवतांच्या आणि अन्य धार्मिक अवशेषांच्या चित्रांचेही संग्रह दान केले, काही तर विकले.
इंग्लंडमध्ये अजूनही अशा प्रकारच्या वस्तूंमध्ये सर्वात प्रसिद्ध असलेल्या शाहजहानच्या जेड वाईन कपचा समावेश आहे जो सध्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. सातव्या शतकातील ‘सुलतानगंज बुद्ध’ जे बर्मिंगहॅम संग्रहालय व कला दालनात ठेवण्यात आले आहे.
भारतात झालेल्या यु*द्धांतही मोठ्या प्रमाणात लूटमार झाली. यापैकी सर्वात प्रसिद्ध कोहिनूर १८४९ साली दुसरे इंग्रज-शीख यु*द्ध जिंकल्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला. सध्या तो लंडनच्या टॉवरमध्ये जाहीरपणे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. अशा इतर वस्तू देखील आहेत ज्यात महाराजा रणजीत सिंगचे सिंहासनही ठेवण्यात आले आहे. हे सिंहासन सोन्याच्या चादरीने सजवले गेले आहे. सध्या लंडनमधील व्हिक्टोरियन आणि अल्बर्ट संग्रहालयात हे ठेवण्यात आले आहे.
याशिवाय टिपूचा वाघ आहे, जो इंग्रजांनी १७९९ मध्ये टिपूच्या राजधानीवर ह*ल्ला केला तेव्हा तेथून काबीज केला होता. नंतर लंडनमधील व्हिक्टोरियन आणि अल्बर्ट संग्रहालयास तो हस्तांतरित केला गेला.
१९ व्या शतकाच्या अखेरीस आणि २० व्या शतकाच्या सुरूवातीस, भारताचा भूतकाळ टिकवून ठेवण्याची आणि संरक्षित करण्याची कल्पना आली. भारतीय पुरातत्व वारसा जपण्यासाठी जागरूकता निर्माण झाली. भारतीय पुरातत्व खात्याचे महासंचालक असलेले जॉन मार्शल यांच्या समवेत कर्झन हे संवर्धनाचे उत्साही समर्थक होते. त्यानंतर देशातील पुरातत्व व सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यानंतरच्या काळातही कायम राहिला.
१९०४ मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण अधिनियम मंजूर झाला, त्यानंतर १९५८ चा प्राचीन स्मारक आणि पुरातत्व ठिकाणे आणि अवशेष कायदा लागू झाला.
भारतात तस्करांचे सर्वात सोपे लक्ष्य बंद पुरातन मंदिरे, धार्मिक मठ, किंवा वेळोवेळी बेकायदेशीरपणे खोदलेली गावे व पुरातत्व टेकड्यांच्या बाहेरील व्यासपीठ होते.
जसे की, १९७६ मध्ये तंजावर जिल्ह्यातील पंथूर गावात शेत मजूर खोदकाम करत असताना त्याला नटराजाची पितळ मूर्ती सापडली. त्याने ती कॅनेडियन जिल्हाधिकाऱ्याला विकली आणि त्यांनी ती परत ब्रिटीश संग्रहालयात पाठवली. १९९१ मध्ये नटराजाची ही मुर्ती तामिळनाडूला परत आली.
वारसा तस्करीची आणखी एक उल्लेखनीय घटना म्हणजे तामिळनाडूमधील श्रीपुराथन या छोट्याशा गावात बृहदेश्वर मंदिरात कांस्य नटराज यांच्यासह आठ मूर्ती होत्या. सुभाष कपूर याने २००६ मध्ये या मुर्तींची, चोरी करून त्यांची तस्करी केली होती. २००८ मध्ये या मुर्ती ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय कलादालनाने विकत घेतल्या. चोरी उघडकीस आल्यानंतर ऑस्ट्रेलियन सरकारने मार्च २०१४ मध्ये नटराज मूर्तीसह शिवची आणखी एक मूर्ती भारतास परत केली.
पुरातन वस्तूंचे इतरही बरेच भाग आहेत जे परदेशात कायम आहेत. १९६५-१९७० च्या कालावधीत खजुराहोमधूनच १०० हून अधिक कामुक शिल्पांची चोरी झाली होती. इतर प्रसिद्ध घटनांमध्ये एक म्हणजे जयपूर राजवाड्यातील संग्रहालयात घरफोडीची खळबळजनक घटना घडली होती. यात मध्ययुगीन काळातील २४९२ चित्रे गायब झाली होती आणि दुसरे म्हणजे १९६८ साली नवी दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये चोरी झाली तेव्हा १२५ प्राचीन दागिने आणि ३२ दुर्मिळ सोन्याचे तुकडे यांची चोरी झाली होती.
अलिकडच्या काळात, एएसआयकडून तस्करी केलेल्या वस्तू शोधण्यासाठी आणि चोरीच्या वस्तू परत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. यावर्षी सप्टेंबरमध्ये, इंग्लंडने १९७८ साली तामिळनाडू येथून चोरीस गेलेल्या राम, लक्ष्मण आणि सीता या तीन प्राचीन मूर्ती परत केल्या.
२०१८ मध्ये न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट याने आठव्या शतकातील दुर्गा मुर्तीचे दगडी शिल्प परत करण्याचा निर्णय जाहीर केला. अलीकडेच ऑस्ट्रेलियन सरकारने तामिळनाडूमधील १५ व्या शतकातील दोन दरवाजा रक्षक आणि मध्यप्रदेश किंवा राजस्थान यापैकी एक नागराजाचे शिल्प परत करण्याचा निर्णय घेतला.
त्याच वेळी, कोहिनूर आणि अमरावती संगमरवरसारख्या वस्तू परत मिळाव्यात या मागणीलाही नकार दिला गेला आहे.
२०१३ मध्ये, ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन जेव्हा भारत दौर्यावर गेले होते तेव्हा त्यांना कोहिनूर परत पाठवण्याविषयी विचारले असता त्यांनी उत्तर दिले की ते ‘परतावा’चे समर्थन करत नाहीत कारण त्याने ब्रिटिश संग्रहालये रिकामी होतील.
वसाहतीच्या काळात पाठविलेल्या वस्तू परत करणे अधिक अवघड का आहे याबद्दल बोलताना एएसआयमधील पुरातन वास्तू संचालक डी. एम. दिमरी म्हणतात, “त्यावेळी भारत ब्रिटीश साम्राज्याचा एक भाग होता. म्हणून येथून काढून वस्तू लंडनला पाठविले गेल्या, ते केवळ स्थानांतरण होते. त्यामुळे त्यांना अवैध निर्यात मानले जाऊ शकत नाही.”
जेव्हा वसाहतवादी शक्तींनी १०० किंवा २०० वर्षांपूर्वी घेतलेल्या वस्तूंचा विचार केला जातो तेव्हा आपण त्यास चोरी म्हणावे की नाही हे समजू शकत नाही. परंतु संबंधित संस्था किंवा देशाच्या वास्तू परताव्याच्या धोरणावर बरेच काही अवलंबून आहे. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियन संग्रहालयाचे हे स्पष्ट धोरण आहे की सामाजिक किंवा धार्मिक महत्त्व असलेली कोणतीही गोष्ट दुसर्या देशातून आणली गेली असेल आणि ती परत मागितली गेली तर ती परत मिळेल.
गेल्या काही वर्षांमध्ये, चोरीच्या वस्तू परत करण्यासाठी वाढती सार्वजनिक मागणी निर्माण झाली आहे. २०१४ साली सिंगापूरमधील दोन भारतीय कलाप्रेमी एस. विजय कुमार आणि अनुराग सक्सेना यांनी ‘इंडिया प्राइड प्रोजेक्ट’ सुरू केला जो समाजमाध्यमांचा वापर विदेशातील भारतीय सांस्कृतिक कला ओळखण्यासाठी व त्या परतीचा प्रारंभ करण्यासाठी काम करत आहे. श्रीपूरनाथन नटराज भारतात परत यावेत यासाठी हा समूह अतिशय सक्रियपणे काम करत होता.
देशाच्या इतिहासाच्या पाउलखुणा जपणाऱ्या या वस्तू देशात परत आणण्यासाठी भरपुर प्रयत्नांची गरज आहे. विशिष्ट विभागाची स्थापना करुन इतर देशातील संग्रहालयात असणाऱ्या भारतीय वास्तुंची नोंद आणि त्या वास्तू परत मिळवण्यासाठी गरजेची असणारी प्रबळ इच्छाशक्ती आज गरजेची आहे एवढं नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.