आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
सोमालिया तिसऱ्या जगातील आणि एडनच्या अखातीतील एक गरीब देश. इथल्या शासन व्यवस्थेत नेहमीच जगातील इतर महासत्तांचा/देशांचा हस्तक्षेप राहिला आहे. ब्रिटन, इटली, फ्रांस, इथिओपिया अशा वेगवेगळ्या देशाच्या ताब्यात सोमालिया अडकला होता. १ जुलै १९६० रोजी हा देश स्वतंत्र झाला. पण, त्यावर युनोची देखरेख राहील असे ठरवले गेले.
सोमालियामधील लोकांना आपल्या दैनंदिन गरजा भागवणेही शक्य नाही. युनोच्या अहवालानुसार इथली ७०% हून जास्त जनता दारिद्र्यरेषेखालील जीवन जगते. येथील लहान मुले कुपोषणाची बळी ठरतात. अशा देशांत परकीय सत्तांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती आणखीनच चिघळत जाते. सोमालियातील ही गरिबी आणि मागासलेपण यामुळे तिथले तरुण वाममार्गाला लागले नसते तरच नवल.
हिंद महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या या देशातील तरुणांचा एक कुख्यात व्यवसाय म्हणजे समुद्रातून ये-जा करणाऱ्या व्यापारी जहाजांचे अपहरण करणे. जहाजांच्या अपहरणाच्या बातम्या तुम्हीही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. समुद्रातील जहाजांचे अपहरण करण्यामागे सोमालियन चाचे जास्त सक्रीय असल्याचे दिसते. अरबी समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडणारे एडनचे आखात समुद्र मार्गाने व्यापार करण्यासाठी अत्यंत सुलभ असल्याचे मानले जाते. त्यामुळे या आखातातून नेहमीच अशा जहाजांची वर्दळ असते.
सोमालियासारख्या गरीब देशातील नागरिक स्वतःच्या मुलभूत गरजाही भागवू शकत नसतील तर त्यांना असले मार्ग स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायही दिसत नाहीत. सोमालियातील हे चाचे आजपर्यंत जहाज अपहरणात भरपूर तरबेज झालेत. विशेष म्हणजे चाचेगिरी करणाऱ्या या समूहात तरुणांची संख्या लक्षणीय असते. यात विशेषत्वाने येतात ते मच्छिमार, ज्यांना समुद्राची, त्यातील पाण्याची आणि भरती-ओहोटीची चांगली माहिती असते. या आखातातून जाणाऱ्या जहाजांवर मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा किमती माल असतो. त्यामुळे हा माल सोडवून घेण्यासाठी त्यांना हे चाचे मागतील ती किंमत मोजावीच लागते. कमी कालावधीमध्ये जस्तीत जास्त पैसा मिळवण्याचा हाच एक मार्ग त्यांना दिसतो.
सोमालियाच्या लष्करातून निवृत्त झालेले अधिकारीही या चाच्यांना सामील असतात. त्यांच्याकडून या चाच्यांना कुठले जहाज कधी येणार, त्यावरील कमर्चारी, माल, सुरक्षा रक्षक यासगळ्याची इत्थंभूत माहिती मिळते.
जहाजाचे अपहरण करण्याची यांची पद्धतही ठरलेली आहे. यासाठी हे चाचे छोट्या छोट्या नौका वापरतात. जहाज समुद्राच्या मध्यभागी येण्याची वाट पाहतात. ऐन मध्यात आणि खोल पाणी असलेल्या ठिकाणी जहाज आले की नेमके यांच्या टप्प्यात सापडते. छोट्या छोट्या नावेतून आलेले हे चाचे त्या जहाजाला चारही बाजूंनी घेरतात. जहाजाला लोखंडी भाला वगैरे लावून त्याचा वेग मंद केला जातो आणि मग हे चाचे त्या जहाजात प्रवेश करतात. जहाजात प्रवेश केल्यानंतर यांचा मुख्य उद्देश असतो जहाजावरील केबिन ताब्यात घेणे.
एकदा का जहाजाच्या केबिनचा ताबा मिळाला की जहाज ताब्यात आले असा याचा अर्थ होतो. पण, शेवटी हा सगळा खेळ जीवावर उदार होऊनच खेळावा लागतो. दूरवर उभ्या असलेल्या मुख्य बोटीतून या चाच्यांचे नियंत्रण केले जाते. या मुख्य बोटीला मदरशिप म्हटले जाते. जहाजाचे अपहरण केल्यानंतर त्या जहाजाशी संबधित कंपनीला फोन करून खंडणीची रक्कम मागितली जाते. हे खंडणी उकळणारे म्होरके मदरशिपमध्ये बसून सगळ्या योजनेची अंमलबजावणी निर्धोकपणे इतर तरुणांकडून करून घेतात.
२००५ मध्ये अशाच सोमालियन चाच्यांनी हॉन्गकॉन्गच्या एमव्ही फिएस्टी जहाजाचे अपहरण केले होते. एलपीजी गॅसची वाहतूक करण्याऱ्या या जहाजाला सोडण्यासाठी चाच्यांनी ३,१५,००० डॉलर इतकी रक्कम मागितली होती. जहाज सोडवण्यासाठी कंपनीला ही रक्कम द्यावीच लागली.
जहाजावर जर सुरक्षा रक्षक नेमले असतील तर या चाच्यांचे त्यांच्यापुढे काही चालत नाही. कधीकधी या सुरक्षा रक्षकांनाही गुंगारा देण्यात हे चाचे यशस्वी होतात.
एकदा इंग्लंडच्या जहाजावरील दोन सुरक्षा रक्षकांनी या चाच्यांना चांगलाच धडा शिकवला होता. राणी (दुसऱ्या) एलिझाबेथने या सुरक्षा रक्षकांच्या बहाद्दुरीसाठी त्यांचा सन्मान केला आणि बक्षीसही दिले होते.
अरब अमिराती, अमेरिका, केनिया या देशांची कित्येक जहाजे या चाच्यांनी आजवर लुटली आहेत. भारताचे ‘एमव्ही साफिला अल-बरसरात’ या व्यापारी जहाजाचेही या चाच्यांनी अपहरण केले होते. या जहाजावर एकूण १६ क्रू सदस्य होते. परंतु सुरक्षा रक्षकांनी बंदूक काढताच हे चाचे शरण आले होते. यांच्यावर खटला देखील चालवला गेला आणि या चाच्यांना सात वर्षांची कठोर शिक्षा सुनावण्यात आली होती.
जहाजाचे अपहरण करण्यासाठी चाच्यांना अनेक लोकांचा पाठींबा असतो. चाच्यांचा समूह मोठा असेल तर काम निश्चितपणे यशस्वी होते. या सगळ्या लोकांना अपहरण करून मिळवलेली रक्कम वाटून द्यावी लागते. शिवाय, जीवाची जोखीम तर आहेच. पकडले गेलो तर तुरुंगवासाची भीती. या कारणामुळे हे सगळे चाचे मिळालेली रक्कम आपसात वाटून घेतात. यातील काही रक्कम ते आधुनिक प्रकारची शस्त्रास्त्रे, बोटी विकत घेण्यासाठी वापरतात.
कुणाचे लग्न असेल, कुणाचा आणखी काही व्यवसाय असेल त्यासाठी भांडवल लागणार असेल तर, मुलांचा खर्च, दवाखान्याचा खर्च अशा कामासाठी हाच पैसा वापरला जातो. थोडक्यात याच कामाईतून ते आपला सगळा खर्च भागवू शकतात. मिळणारा पैसा मोठा असला तरी जीवाला धोकाही तितकाच मोठा आहे.
सोमालियन चाच्यांच्या या अपहरणामुळे इतर देशांतील या मोठमोठ्या कंपन्यांना चांगलाच आर्थिक फटका बसतो. त्यामुळे त्या-त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो. जहाज कंपन्यांना आपल्या जहाजांची सुरक्षा वाढवण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. इतके करूनही जहाज सुरक्षित राहील याची शाश्वती नाही. जहाजाचे विमा संरक्षण करून घ्यावे लागते. कधीकधी या चाच्यांपासून वाचण्यासाठी दूरच्या मार्गाने प्रवास करावा लागतो. या सगळ्यात इंधनाचा खर्चही खूप वाढतो.
या सोमालियन चाच्यांवर अनेक चित्रपटही निघाले आहेत. सोमालियन चाच्यांच्या या साहसी कामामुळे अनेक चित्रपटांना दमदार कथा मिळाली आहे. तुम्हीही चित्रपटातून सोमालिया चाचे कशाप्रकारे जोखीम घेऊन हे अपहरणाचे काम करतात हे पाहिले असेलच.
थोडक्यात काय तर एडन आखाताच्या परिसरातून प्रवास करणे म्हणजे या व्यापारी जहाजांसाठी एक आव्हानच आहे!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.