आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आनंदाची अनुभूती आणि आनंदाचे जीवन केवळ ज्ञानाच्या आधारे शक्य आहे.
हे सांगून भारतातील एका थोर प्राध्यापकाने खऱ्या अर्थाने जीवनभर विद्यार्थ्यांना कोणत्याही भेदभावाशिवाय “ज्ञानमयो भव ।” हा आशीर्वाद दिला. शैक्षणिक तत्वांचे प्रतीक असलेले डॉक्टर राधाकृष्णन एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ, राजकारणी तसेच उत्तम प्राध्यापक होते. विसाव्या शतकातील महान विचारवंतांमध्ये त्यांची गणती केली जाते. थोर प्राध्यापकाच्या नावे आज देशभर शिक्षकदिन साजरा केला जात आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाचा हा धावता आढावा. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
तत्कालीन मद्रास प्रांतातील तिरुथानी येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात ०५ सप्टेंबर १८८८ रोजी जन्मलेल्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांची कलकत्ता विद्यापीठातील किंग जॉर्ज पंचम चेअर ऑफ मेंटल अँड नैतिक विज्ञानावर विराजमान होण्यासाठी प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली. या विद्यापीठात त्यांनी १९२१ ते १९३२ दरम्यान काम केले. या विद्यापीठातील आपल्या कारकिर्दीत त्यांनी दोन मोठ्या महासभांमध्ये कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे.
‘काँग्रेस ऑफ युनिव्हर्सिटीज ऑफ ब्रिटिश एम्पायर’ या आंतरराष्ट्रीय महासभेत त्यांनी जून १९२६ मध्ये कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर सप्टेंबर १९२६ मध्ये अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात झालेल्या ‘इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ फिलोसोफी’ या आंतरराष्ट्रीय महासभेतसुद्धा त्यांनी कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.
यानंतर राधाकृष्णन यांची नियुक्ती ऑक्सफर्ड विद्यापीठात करण्यात आली. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांना पूर्वेकडील धर्म आणि नैतिकतेचे स्पॉल्डिंग प्राध्यापक हे पद बहाल करण्यात आलं होतं. हे पद विशेषतः फक्त राधाकृष्णन यांच्यासाठी एच.एन. स्पॉल्डिंग यांनी १९३६ साली तयार केलं होत. एच.एन. स्पॉल्डिंग हे राधाकृष्णन यांच्या एका भाषणामुळे अत्यंत प्रभावित झाले होते. राधाकृष्णन यांच्या व्यक्तिमत्वाचंही त्यांना कौतुक वाटत.
भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी तब्बल १६ वेळा नामांकन झाले होते आणि शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी तब्बल ११ वेळा त्यांचे नामांकन झाले. त्यांचा हिंदू धर्मातील अद्वैत तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता. याच तत्वज्ञानाच्या परंपरेत आदी शंकराचार्य. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद यांच्यासारखे थोर विचारवंत आणि ज्ञानाच्या परंपरेचे पाईक येतात. तर भगवद्गीता, ब्रम्हसुत्र आणि ज्ञानेश्वरी हे तत्वज्ञानाचे शिरोमणी समजले जाणारे ग्रंथही याच परंपरेचं विवेचन करतात.
राधाकृष्णन यांनी तत्वज्ञानाचं विवेचन करणाऱ्या ग्रंथांबरोबरच अनेक ग्रंथ रचले आहेत. यामध्ये द परसुइट ऑफ ट्रुथ, रिलिजन अँड कल्चर, द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, सर्च फॉर ट्रुथ, फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर, इंडियन फिलॉसॉफी व्हॉल्युम १, इंडियन फिलॉसॉफी व्हॉल्युम २ असे अनेक ग्रंथ आहेत.
एक उत्तम शिक्षक असल्याने आणि अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आदर होता. सन १९२१ मध्ये जेव्हा ते मैसूर विद्यापीठातून मैसूर रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले, तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी फुलांनी सजवलेल्या गाडीची व्यवस्था केली आणि ती गाडी स्वतः विद्यार्थ्यांनी ओढली आणि राधाकृष्णन यांना स्थानकावर पोहोचवले. ब्रिटिशांच्या सत्तेमुळे आणि त्यांच्या नित्कृष्ट शिक्षणपद्धतीमुळे गुरु-शिष्य हे नातं जवळ जवळ संपत चाललंय असं दिसत असतानाच डॉक्टर राधाकृष्णन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ही परंपरा जपली.
त्यांनी भारतातील आणि जगभरातील विविध विद्यापीठांमध्ये ज्ञानदानाचं काम केलं आहे. मद्रास प्रेसिडेंसि महाविद्यालयात १९०९ ते १९१८ दरम्यान तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. मैसूरच्या विद्यापीठाच्या महाराजा महाविद्यालयात १९१८ ते १९२० दरम्यान तत्वज्ञानाचे शिक्षण देत असतानाच त्यांनी काही प्रतिष्ठित नियतकालिकांसाठी अनेक लेख लिहिले. या नियतकालिकांमध्ये द क्वेस्ट, जर्नल ऑफ फिलॉसॉफी आणि इंटरनॅशनल जर्नल ऑफ एथिक्स यांचा समावेश आहे.
याच काळात त्यांनी आपलं पहिलं पुस्तक द फिलॉसॉफी ऑफ रबिन्द्रनाथ टागोर हे लिहून पूर्ण केलं. त्यांच्या मते रवींद्रनाथ टागोरांचे तत्वज्ञान भारतीय भावनेचे खरे प्रकटीकरण आहे. त्यांचं दुसरं पुस्तक द रीन ऑफ रिलिजन इन काँटेम्पोररी फिलॉसॉफी १९२० मध्ये प्रसिद्ध झालं. १९२१ मध्ये किंग जॉर्ज पंचम चेअर ऑफ मेंटल अँड नैतिक विज्ञानावर विराजमान होण्यासाठी त्यांची तत्त्वज्ञानामध्ये प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. वर सांगितल्याप्रमाणे आपल्या या कारकिर्दीत त्यांनी दोन मोठ्या महासभांमध्ये कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९२९ मध्ये राधाकृष्णन यांना मँचेस्टर कॉलेजमध्ये प्राचार्य जे. एस्टलिन कार्पेन्टर यांनी त्यांचं रिक्त केलेलं पद बहाल करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. यामुळे त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना तुलनात्मक धर्मावर व्याख्यानं देण्याची संधी मिळाली.
याच कालावधीत घडलेली आणखी एक महत्त्वाची शैक्षणिक घटना म्हणजे सन १९३२ मध्ये ऑक्सफर्डच्या मॅन्चेस्टर कॉलेज येथे जीवनातील आदर्शांवर हिबर्ट व्याख्यान देण्याचे आमंत्रण त्यांना मिळालं आणि नंतर ते व्याख्यान पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालं, ते पुस्तक म्हणजे द आयडीयलीस्टीक व्ह्यू ऑफ लाइफ.
त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे १९३१ साली त्यांना ब्रिटनचा राजा जॉर्ज पंचम द्वारे ‘नाइटशिप’ हा उच्च सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. भारताच्या गव्हर्नर जनरलने औपचारिकरित्या हा सन्मान त्यांच्याकडे ठेवला, पण भारतीय स्वातंत्र्यानंतर तो काढून घेऊन त्यांना ‘डॉक्टर’ ही पदवी बहाल करण्यात आली.
१९३१ ते १९३६ दरम्यान त्यांनी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषवले. त्यांच्या पहिल्या दीक्षांत समारंभाच्या भाषणात आपल्या मातृभूमीच्या आणि मातृभाषेचा आदर करीत ते बोलतात,
“आम्ही, आंध्र, सुदैवाने काही बाबतीत अत्यंत स्थिर स्वभावाचे आहोत. माझा ठाम विश्वास आहे की जर भारताचा कोणताही भाग प्रभावी एकतेची भावना विकसित करण्यास सक्षम असेल तर तो आंध्रमध्ये आहे. इथे पुराणमतवादाची पकड मजबूत नाही. आमची उदारता आणि मनाचा मोकळेपणा सर्वश्रुत आहे. आमची सामाजिक प्रवृत्ती आणि वैचारिक क्षमता अजूनही सक्रिय आहे. आमची नैतिक जाणीव आणि सहानुभूतीची कल्पनाशक्ती मुर्खपणामुळे फारशी विकृत नाही. आमच्या स्त्रिया तुलनेने अधिक मोकळ्या आहेत. मातृभाषेवरील प्रेम आपल्या सर्वांना बांधून ठेवते.”
१९३६ साली राधाकृष्णन यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठात पूर्व भागातील धर्म आणि नैतिकतेचे स्पॅल्डिंग प्रोफेसर म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि ऑल सोल्स कॉलेजचे फेलो म्हणून ते निवडले गेले. याच वर्षी त्यांचं साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलं. १९३९ ते १९४८ दरम्यान मदन मोहन मालवीयांच्या विनंतीनंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरूपद भूषविले.
राधाकृष्णन यांनी त्यांच्या यशस्वी शैक्षणिक कारकीर्दीनंतर राजकीय आयुष्याची “उशीरा” सुरुवात केली. १९२८ मध्ये ते आंध्र महासभेत सहभागी झाले होते. या महासभेत अन्य काही दिग्गजांबरोबर त्यांनी मद्रास प्रांतातील सीडेड डिस्ट्रिक्ट डिव्हिजनचे नामांतर करून ‘रायलसीमा’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
१९३१ मध्ये त्यांना ‘लीग ऑफ नेशन्स कमिटी फॉर इंटलेक्चुअल कोऑपरेशन” मध्ये नामांकित करण्यात आलं. पाश्चिमात्यांच्या नजरेत ते भारतीय विचारधारेवरील मान्यताप्राप्त हिंदू अधिकारी तर होतेच पण समकालीन समाजातील पूर्वेकडील धर्म-संस्थांच्या भूमिकेचे एक दुभाषी होते.
१९४७ साली स्वातंत्र्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन यांनी युनेस्कोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनतर १९४९ ते १९५२ दरम्यान डॉक्टर राधाकृष्णन यांनी तत्कालीन सोविएत रशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून कामकाज पहिले. संविधान समितीवरही डॉक्टर राधाकृष्णन यांची निवड झाली होती. १९५२ मध्ये डॉक्टर राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाली. तर १९६२ ते १९६७ दरम्यान ते भारताचे राष्ट्रपती होते.
भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या कार्यकाळात जेव्हा संसदेत वादाची स्थिती उभी राहत असे, किंवा गदारोळ होत असे, तेव्हा ते सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना शांत करण्यासाठी गीता आणि बायबलमधील श्लोक त्यांना ऐकवत!
ब्रिटिश इतिहासकार डोनाल्ड मॅकेझीन ब्राऊन म्हणत, “त्यांनी नेहमीच अपुरं ज्ञान असलेल्या पाश्चिमात्य टीकेविरूद्ध हिंदू संस्कृतीचे रक्षण केले होते आणि त्यांच्या स्वतःच्या बौद्धिक परंपरेतील भारतीयांच्या अभिमानाचे ते प्रतीक होते”
राधाकृष्णन यांची काँग्रेस पक्षात कोणतीही पार्श्वभूमी नव्हती किंवा ते ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या लढ्यातही सक्रिय नव्हते. हिंदु संस्कृतीचा अभिमान आणि अर्धवट ज्ञान पाजळलेल्या पाश्चिमात्य संस्कृतीपासून हिंदू संस्कृतीचे रक्षण ही त्यांची मूळ प्रेरणा होती. त्यांनी आपल्या ज्ञान सामर्थ्याने पाश्चिमात्य संस्कृतींनी भारतीय आणि विशेषतः हिंदू संस्कृतींवर केलेले आरोप फेटाळले.
जेव्हा भारतरत्न डॉक्टर राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली. यावर त्यांनी उत्तर दिले, “माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर ते मला अधिक अभिमानास्पद ठरेल.” तेव्हापासूनच ५ सप्टेंबर हा देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
अशा या महान व्यक्तित्वाचा १९७५ साली तामिळनाडू येथे मृत्यू झाला. त्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानवानेव सुखवान् । ज्ञानवानेव जीवति | ज्ञानवानेव बलवान् तस्मात् ज्ञानमयो भव || हा श्लोक मात्र सार्थ करून दाखवला.
संदर्भ:
Nomination Archive (nobelprize.org)
Nomination archive – NobelPrize.org
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.