आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ब्रिटिशांनी भारतावरील एकछत्री अंमल सोडताना तो ज्याप्रमाणे संस्थानांमध्ये विभागून होता, त्याप्रमाणेच सोडला. यामुळे भारतामध्ये पुन्हा ५०० हून अधिक संस्थाने तयार झाली. स्वातंत्र्यापश्चात संपूर्ण भारताच्या एकीकरणाचे कार्य हाती घेऊन ते सुफळ पुर्णत्वास नेणारा नेता म्हणजे ‘सरदार वल्लभभाई पटेल’.
त्यांच्या कणखर व्यक्तिमत्व, जिद्द व निर्भयतेमुळे गांधीजींनी त्यांना ‘लोहपुरुष’ ही पदवी प्रदान केली. अशा या लोहपुरुषाबद्दल आपण शाळेत शिकलो आहे, त्यांचे आचार-विचार, स्वतंत्र भारत घडवण्यात त्यांचे अमूल्य योगदान या सगळ्यांबद्दल आपण परिचित आहोतच. पण अशा थोर व्यक्तिमत्त्वाचे असेही काही पैलू आहेत ज्यावर प्रकाश टाकणे महत्वाचे आहे.
पटेलांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी, गुजरात येथील नडियाद येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील, झवेर भाई हे राणी लक्ष्मीबाई यांच्या स्वातंत्र्य संग्रामात सैनिक म्हणून कार्यरत होते. निर्भयता ही पटेलांना त्यांच्या वडिलांकडून वारशात मिळाली होती.
उत्तम नेतृत्व व ओघवती वक्तृत्वशैली त्यांना अगदी बालवयापासूनच अवगत होती. नडियाद गावात ज्या शाळेत पटेल शिकत होते, तिथले एक शिक्षक पुस्तकविक्रीचा व्यवसाय करीत. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळून पुस्तके विकत घेणे अपरिहार्य होते. यामुळे काही आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांस पुस्तके विकत घेण्यास अपार कष्ट पडत व पटेलांना हे मंजुर नव्हते.
त्यांनी मुलांच्या मनात बंडाची ठिणगी पाडली व सगळी मुले पेटून उठली. शाळेत आंदोलन सुरु झाले व शाळा १०-१२ दिवस बंद ठेवण्यात आली. अखेरीस शिक्षकांना झुकावे लागले, व मुलांच्या मागण्या मंजुर झाल्या.
पटेलांना लहानपणापासूनच बॅरीस्टर व्हायचे होते. पण काही घरगुती कारणास्तव पटेलांनी आपला इंग्लंडला जाण्याचा बेत रद्द केला व त्यांचा भाऊ विठ्ठलभाईला बॅरीस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवले. पुढे, वयाच्या ३६व्या वर्षी इंग्लंडला जाऊन, ३६ महिन्यांचा अभ्यासक्रम केवळ ३० महिन्यात पूर्ण करून त्यांनी आपले बॅरीस्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
माणसाने किती कर्तव्यदक्ष व संयमी आसवे याची जाणीव आपल्याला पटेलांनी करून दिली.
झालं असं की, त्यांच्या पत्नीचे निधन झाले त्यावेळी पटेल न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीत व्यस्त होते. खटला ऐन महत्वाच्या टप्प्यावर असताना, त्यांना ही दुःखद वार्ता मिळाली. त्यांनी शांतपणे तो कागद खिशात घडी करून ठेवला व ते पुन्हा आपल्या कामाकडे वळले. सुनावणी संपल्यानंतर पटेलांनी आपल्या सहकर्मचाऱ्यांना ती बातमी सांगितली. मनावर वीज कोसळलेली असतानादेखील वैयक्तिक व व्यावसायिक जीवन नेहमीच वेगळे ठेवावे, त्यांची गल्लत करू नये हे त्यांच्या कडून जरूर शिकावे.
सरदार पटेलांनी आयुष्यात तीन वेळेला मृत्यूला हुलकावणी दिली होती.
प्लेग, गांधीजींच्या म्रुत्यु पाश्च्यात आलेला ह्रदय विकाराचा झटका, व १९४९ साली विमानातील तांत्रिक अडचणी, या तिन्ही दुर्घटनांमधून ते सुखरूप बचावले.
पटेलांना सत्तेची कधीही लालसा झाली नाही. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून बऱ्याच कॉंंग्रेसच्या नेत्यांची पहिली पसंती ही पटेलांनाच होते. पण ‘कोणाच्याच अधिपत्याखाली काम करणार नाही’ असे म्हणत नेहरूंनी पक्षविभाजनाचा प्रस्ताव मांडला. पक्ष अखंडित रहावा याकरिता, पटेलांनी पंतप्रधानपदी नेहरूंची नेमणूक करा अशी इच्छा व्यक्त केली, समोरून चालत आलेल्या सुवर्ण संधीचा देखील त्याग केला.
नेहरू आणि पटेलांमध्ये किती ही वैचारिक मतभेद असले तरी ही दोघे एकमेकांचा आदर- सन्मान करीत. गांधीजींच्या मृत्यूनंतर जनतेने व काही राजकारणी व्यक्तींनी दबाव आणून पटेलांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास प्रवृत्त केले. त्यावेळी नेहरूंनी पटेलांच्या राजीनाम्याचा अस्वीकार करत त्यांना गृहमंत्री पद सोडण्यापासून परावृत्त केले.
त्यानंतर १९५० साली जेव्हा नेहरूंच्या मताविरुद्ध पुरूषोत्तम दास टंडन यांचे उत्त्यान AICC च्या सर्वोच्च पदावर झाले तेव्हा नेहरूंना पंतप्रधान पदाचा त्याग करण्यापासून पटेलांनी परावृले. अशी अतूट मैत्री पंडित नेहरू व पटेलांमधे होती.
सरदार पटेलांबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्या उलट ते नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुरस्कर्ते होते. संघावरील बंदी संपुष्टात आली त्यावेळी शुभेच्छा देत ते म्हणाले होते की,
‘माझ्या अत्यंत जवळील व्यक्तींनाच कल्पना आहे की संघावरील बंदी उठल्याचा मला किती आनंद झाला आहे’.
निर्वासितांचे कैवारी असलेल्या पटेलांनी दिल्लीतील निर्वासित मुसलमानांची देखील काळजी पोटच्या गोळ्याप्रमाणे घेतली. नागरिकांची काळजी घेण्यापासून, भारताचे संविधान घडवण्यात योगदान देणे, देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी लष्करी योजना आखणे, अशा विविध भूमिका पटेलांनी चोख बजावल्या. भारताच्या इतिहासात असा लोहपुरुष पुन्हा होणे नाही.
अशा या तडफदार व्यक्तीमत्वाला शतशः नमन!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.