आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“ह्या बाबतीत आपण काय करू शकतो?”
-“काहीच नाही.”
वर वर पाहिलं तर साधारण वाटणारं हे संभाषण होतं भारताचे आठवे चीफ ऑफ आर्मी स्टाफ सॅम मॅनेक्शॉ आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यातील आणि हे संभाषण चालू होतं १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील परिस्थितीबद्दल.
१९७१ साली पूर्व पाकिस्तानमधील परिस्थिती हाताबाहेर गेली होती. पाकिस्तानी सैन्य बंगाली विचारवंत आणि नेत्यांच्या हात धुऊन मागे लागले होते. पन्नास हजारांवर अधिक लोकं या न*रसं*हारात मारले गेले होते. या सगळ्याला घाबरून लाखो शरणार्थी भारतात पळून यायला लागले. अचानक आलेल्या एवढ्या प्रचंड जनसमुदयाने भारताच्या अर्थव्यवस्थेवर कमालीचा ताण आला होता. यातूनच बंगाल प्रांतात राजकीय अस्थैर्य वाढायला लागलं होतं जे भारताच्या एकात्मकतेसाठी खूप घातक ठरणारं होतं.
२५ मार्च १९७१ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीजी स्वतः परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बंगाल दौऱ्यावर गेल्या परिस्थिती खरंच हाताबाहेर चालली होती लवकर पावले उचलण्याची गरज होती. ही गरज लक्षात घेता दौऱ्यावरून परत आल्या आल्या त्यांनी तडक साउथ ब्लॉकममधील आर्मी ऑपरेशन रूममध्ये बैठक बोलावली .
पूर्व पाकिस्तान आणि भारतीय सीमेवरील वाढलेल्या तणावाचा आढावा दिल्यानंतर त्यांनी मॅनेक्शॉ यांच्याकडे वळून विचारलं, “अशा परिस्तिथीमध्ये भारतीय सैन्य काय करू शकतं?” मॅनेक्शॉ यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अत्यंत शांतपणे उत्तर दिलं “काहीच नाही.”
गांधींसोबत उपस्थित सर्वच लोकांना या अनपेक्षित उत्तराने धक्काच बसला. कारण अधिकारी असो अथवा कुठला नेता पंतप्रधानांना असं उत्तर देण्याची हिम्मत कोणीच करू शकत नव्हतं. पण असं वागण्याची जणू सवयच होती मॅनेक्शॉ यांना आणि त्या दोन शब्दांच्या उत्तरामागे खूप मोठा अभ्यास होता. त्याशिवाय का त्यांनी हे उत्तर एवढं बिनधास्तपणे दिलं होतं.
सॅम मॅनेक्शॉ उर्फ “सॅम बहादूर”,”बहादूर” हे नाव त्यांना असंच पडलं नव्हतं, तर ते त्यांनी कमावलं होतं. दुसऱ्या महायु*द्धात इंडोनेशियामध्ये जपानींशी दोन हात करताना ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तब्बल ९ गोळ्या लागल्या होत्या. एवढी भयानक स्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायला नकार दिला होता. कारण काय होईल ते सांगता येत नव्हतं. तेव्हा त्यांच्याच रेजिमेंटच्या गोरखाने त्या डॉक्टरवर रायफल रोखत सांगितलं होतं “इथे जो जखमी आहे तो आमचा साहेब आहे आणि साहेबाचा हुकूम आहे जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत माघार नाही म्हणून मुकाट्याने उपचार चालू कर नाहीतर तुझा श्वास चालू राहणार नाही.”
मॅनेक्शॉ यांना शुद्ध आल्यावर डॉक्टरने विचारलं तुम्हाला काय झालं होतं आणि नेहमीच्याच ढंगात मॅनेक्शॉ यांनी उत्तर दिले,”काही नाही, गाढवानी लाथ मारली होती.”
तर असे होते सॅम मॅनेक्शॉ – ” सॅम बहादूर”.
१९७१ साली “आपलं सैन्य तयार नाही” हे सांगूनसुद्धा पंतप्रधानांनी त्यांना तयारी करायला लावली आणि २ दिवसांनी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत योजनांची रूपरेषा मांडायला लावली. रूपरेषा तर आधीच स्पष्ट झाली होती त्यांच्या डोक्यात. २ दिवसांनी मंत्रिमंडळ बैठकीला त्यांनी हजेरी लावली. पुन्हा एकदा पंतप्रधानांनी तोच मुद्दा उचलला “सैन्याने लवकरात लवकर पूर्व पाकिस्तानवर ह*ल्ला करावा अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून पूर्व पाकिस्तानात मुजीबुर रहमान यांचे सरकार स्थापन होईल आणि लाखो निर्वासित पुन्हा त्यांच्या घरी जातील.”
पूर्व पाकिस्तानात ९०.००० हून अधिक पाकिस्तानी सैन्य असल्याचं मॅनेक्शॉ यांनी स्पष्ट केलं. त्यांना मात देण्यासाठी भारताचे दोन सैन्यदल – बंगाल आणि ईशान्य भारत इथे हलविणे गरजेचं होतं आणि या हालचाली २ महिन्यापेक्षा आधी पूर्ण होणं अशक्य आहे हेसुद्धा मॅनेक्शॉ यांनी स्पष्ट केलं.
हे सर्व ऐकल्यावर पंतप्रधान शांत झाल्या कारण यात खूप धोका होता हे त्यांना जाणवलं. पण त्यांच्या मंत्र्यांना मात्र हा प्रस्ताव काही पटेना त्यांनी त्याला विरोध दर्शवायला सुरुवात केली. पण हा विरोधाचा आवाज कधीच मॅनेक्शॉ यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता.
भारतीय नेत्यांबद्दल बोलताना ते कायम म्हणायचे, “मला माहिती नाही आपल्या देशाचे नेते, ज्यांच्यावर भारताच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्यांना मोटर आणि मोर्टर, तोफ आणि बंदूक, गोरिला आणि गुरील्ला यांतील फरक तरी कळतो की नाही.”
त्यामुळे या विरोधाकडे दुर्लक्ष करत त्यांनी पुन्हा इंदिराजींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, “आपण जर घाई केली आणि जूनमध्ये माझं सैन्य तिथं उभं असलं तरी दोन कारणांसाठी आपण कुठलीही कारवाई करू शकणार नाही. पहिलं तिथला मान्सून जो जूनमध्ये सुरू होतो आणि त्याचा खूप त्रास होणार, दुसरं हिमालय पर्वतरांग त्या काळात पूर्ण खुली असेल. त्यामुळे उत्तरेतील सैन्य मी हटवू शकणार नाही. पूर्व पाकिस्तानी सीमेवर लढण्यासाठी मला उत्तर सीमेवरून सैन्य हटवून ते पूर्वेत उभे करावे लागेल. अशा परिस्थितीत भारताला एकाच वेळी दोन आघाड्यांवर यु*द्ध करावं लागू शकतं जे की आपण टाळलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीन पाकिस्तानला यात मदत करणार नाही ही आशा आपण करणे काही बरोबर नाही. कारण संधी मिळताच चीन आपल्यावर आक्र*मण करेल. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच आपण आपली मोहीम चालू करू शकतो.”
असं स्पष्ट मत समोर ठेवल्यानंतर इंदिराजींनीसुद्धा त्याला होकार दर्शविला. पण मंत्रीमंडळ तरीही शांत नव्हतं. त्यांच्यात मग कुजबुज सुरू झाली “हा आर्मी चीफ काही कामाचा नाही. यु*द्ध करण्याची भीती वाटते याला.” आर्मी चीफने “सैन्य लढाईसाठी तयार नाहीये “असं सांगितल्याची चर्चा पूर्ण भारतात सुरू झाली. प्रत्येक ठिकाणी त्यावर विनोद झाले.
बऱ्याचशा पत्रकारांनी तर लेख पण लिहिले. “BSF जर यु*द्ध करण्यास तयार नसेल तर त्यांनी मोकळ्या वेळेत पूर्व पाकिस्तान साफ करून घ्या.” या टीकेची झळ अक्षरशः मॅनेक्शॉ यांच्या मुलीपर्यंत पोहोचली होती. ती जिकडे जाईल तिकडे तिच्या मैत्रिणी तिची चेष्टा करू लागल्या.
पण हे सगळं बोलताना लोकांना हे कळत नव्हतं की ते अशा माणसाबद्दल बोलत आहेत ज्याने दुसऱ्या महायु*द्धात गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांना “मिलिटरी क्रॉस”ने भूषवण्यात आले होते. मशीनगनच्या गोळ्या त्यांच्या पोटात लागल्या होत्या आणि अशा माणसाला ते घाबरट म्हणत होते, जे गोळीबाराच्या फक्त आवाजानेही पळ काढायला कमी करणार नाहीत.
एवढी टीका होऊनसुद्धा मॅनेक्शॉ यांनी त्याकडे किंचितही लक्ष दिलं नाही. अशा बिनकामी गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे तेवढा वेळही नव्हता आणि अशा लोकांबद्दल “फिल्ड मार्शल सॅम बहाद्दूर” यांनी काही बोलावं एवढी त्या लोकांची योग्यताही नव्हती. उलट त्यांनी या वेळेत सैनिकी तळ पूर्वेकडे हलवायला सुरुवात केली. सैन्यासाठी लागणारे साहित्य, शस्त्रास्त्रे आणि इतर आवश्यक वस्तू यांची जमवाजमव सुरू केली. अधिकाऱ्यांना वास्तविक परस्थितीबद्दल माहिती गोळा करायला सांगितली. आर्मीच्या ईस्टर्न कमांडला त्यांनी निर्णय घेण्याची पूर्ण मोकळीक दिली होती.
त्याच वेळेत त्यांनी पूर्वेकडे सैन्यासाठी लागणारे आवश्यक प्रशासकीय आणि दळणवळणाच्या गोष्टींची पूर्तता करून घेतली. हा मोकळा मिळालेला वेळ त्यांनी अजून एका ठिकाणी सत्कारणी लावला ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. पूर्व पाकिस्तानातून पळून आलेल्या निर्वासितांना त्यांनी गनिमीकावा आणि शस्त्रास्त्रांबद्दल प्रशिक्षण दिले जेणेकरून त्यांचाही यु*द्धात वापर करून घेता येईल.
ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर कमी झाल्यावर पुन्हा एकदा भारतीय मीडियाने सैन्याची गळचेपी करण्यास सुरुवात केली. पण उशिरा सुरू झालेल्या मान्सूनने पुन्हा एकदा मॅनेक्शॉ यांना अजून वेळ दिला. याच वेळेत पूर्व पाकिस्तानात बंगाली स्वातंत्र्यसैनिकांच्या आंदोलनांनी कमालीचा वेग पकडला होता. त्या आंदोलकांनी पूर्व पाकिस्तानातील ग्रामीण भागात वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली होती आणि पाकिस्तानी सैन्याला ढाक्यापासून बाहेर लोटायला सुरुवात केली होती. पाकिस्तानी सैन्याचं मनोबल आता अतिशय खच्ची झालं होतं.
दुसरीकडे भारतीय सैन्याने केलेल्या अचूक नियोजनामुळे त्यांची तयारी अतिशय चांगली झाली होती. योग्य तयारीमुळेच ३ डिसेंबर १९७१ रोजी जेव्हा पाकिस्तानने भारतीय सैन्यावर हवाई ह*ल्ला सुरू केला तेव्हा पूर्व बंगालच्या आजूबाजूला दबा धरून बसलेल्या भारतीय सैन्याने अतिशय जोराने पाकिस्तानी सैन्यावर ह*ल्ला चढवला आणि अवघ्या १३ दिवसांतच पाकिस्तानी सैन्याला नेस्तनाबूत केले. ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रे टाकून शरणागती पत्करली.
इतिहासात दूरगामी परिणाम करणाऱ्या दोन गोष्टीमंध्ये वेळ आणि स्थान सोडल्यास कमालीचं साधर्म्य आढळतं. पहिली घटना १८८० साली रशियन सैन्याचा सरसेनापती मार्शल कुतुझोव्ह यांची आणि दुसरी १९७१ साली सॅम मॅनेक्शॉ यांची. दोन्ही घटनांमध्ये दिवसेंदिवस सरकारी दबाव वाढत होता. पहिल्याने बचाव करण्यासाठी नकार दिला तर दुसऱ्याने ह*ल्ला करण्यास नकार दिला. कुतुझोव्हने नेपोलियनविरुद्ध मॉस्कोचा बचाव करण्यास नकार देऊन रशियन सैन्याचा बचाव केला आणि शेवटी रशियाचा. तर मॅनेक्शॉ यांनी मे जूनमध्ये पूर्व पाकिस्तानावर ह*ल्ला करण्यास नकार देऊन अनेक गोष्टी साध्य केल्या.
या विजयाचे खरे शिल्पकार होते ते “सॅम होर्मूसजी फ्रेमजी जमशेजदजी मॅनेक्शॉ” उर्फ “सॅम बहादूर”. या विजयातूनच उदय झाला होता बांग्लादेशचा.
यु*द्ध संपल्यावर सॅम मॅनेक्शॉ जखमी सैनिकांना भेटायला गेले होते. एका जखमी सैनिकाची विचारपूस करताना ते त्याला म्हणाले होते, “तुला ३ गोळ्या लागल्या आहेत. जेव्हा मी तुझ्या वयाचा होतो मला ९ गोळ्या लागल्या होत्या आणि आज मी आर्मी चीफ आहे.” तर असे होते सॅम मॅनेक्शॉ.
फिल्ड मार्शल सॅम बहाद्दूर यांच्यामुळे मिळालेल्या सैनिकी यशानंतर भारताची कमकुवत बाजू जगासमोर आली. ९० हजारहून अधिक सैन्य भारताच्या ताब्यात असतानाही पाक-व्याप्त काश्मीरचा प्रश्न सोडवता आला नाही, याचा अर्थ असा होतो की भारत तेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात राजकीय आणि मुत्सद्दीदृष्ट्या कमकुवत होता, पण तत्कालीन राजकारणी फिल्ड मार्शल सॅम बहाद्दूर यांनाच हिणवत असत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.