आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
हरिद्वार येथे २०२० साली झालेल्या कुंभमेळ्यात हजारो साधू, महंत आणि भाविक सहभागी झाल्यावरून कोविडमुळे सर्व स्तरावरून होत असलेल्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
दर तीन वर्षांनी एकदा असे बारा वर्षात चार वेळा प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरतात. या कुंभमेळ्यात भारतभरातून लाखो भाविक, साधुसंत शाही स्नानासाठी सामील होतात. या शाही स्नानाला विशेष महत्त्व असते.
कुंभमेळ्यातील शाही स्नानात वेगवेगळ्या आखाड्यातील साधूसंतांना अग्रक्रम दिला जातो हे आपण ऐकले असेलच. आता हे आखाडे काय, कोणते? असे प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडत असतील. त्यासाठीच हा लेखप्रपंच.
आपल्या देशात शैव, वैष्णव आणि उदासी संप्रदाय मिळून असे एकूण १३ आखाडे आहेत. आता, आखाडा म्हणजे जिथे शरीर कमावलं जातं ती जागा हा साधारण अर्थ होतो. साधूसंतांच्या बाबतीत ज्या ठिकाणी ते राहतात किंवा त्यांचा मठ असतो त्याला आखाडा म्हणतात. असं म्हणतात की, मुघलांच्या आक्र*मणांपासून हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांचं संरक्षण करता यावं यासाठी या आखाड्यांची सुरुवात करण्यात आली होती. या मठांमध्ये नागा साधुंसाठी शारीरिक व्यायाम करण्यासाठी आधुनिक सुविधाही करण्यात आल्या आहेत. इथं व्यायामासोबतच हे साधू शस्त्रास्त्रांचा अभ्यास देखील करतात.
हे आखाडे साधुंसाठी एखाद्या लॉजिंग, बोर्डिंग, ट्रेनिंग सेंटरसारखे असतात. इथं त्यांच्या राहण्याची सगळी व्यवस्था केलेली असते. इथं आजही गुरुशिष्य परंपरेचं पालन करण्यात येतं. गुरूला देवाचा दर्जा दिला जातो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक साधू इथे अध्यात्माचा अभ्यास करतात. आपल्या गुरूचा शब्द शिष्यांसाठी आजही अंतिम मानला जातो.
भारतात सुरुवातीला फक्त चारच आखाडे होते. काही कालावधीनंतर हे मुख्य आखाडे छोट्या आखाड्यांमधे विभागले गेले.
असं म्हणतात की, आपापसातील मतभेद विकोपाला गेल्याने आखाड्यांचे विभाजन होऊन आज १३ आखाडे तयार झाले आहे. २०१९ साली प्रयागराज इथं झालेल्या कुंभमेळ्यात या तेराही आखाड्यांचे साधू उपस्थित राहिल्याचे आपण बघितलंच होतं.
आखाड्यांच्या कामकाजात एकसूत्रता आणण्यासाठी म्हणून अखिल भारतीय आखाडा परिषद स्थापन करण्यात आली ज्यात प्रत्येक आखाड्यातून २ व्यक्ती त्या आखाड्याचं प्रतिनिधित्व करतात. आत्तापर्यंत झालेल्या आणि पुढे होणाऱ्या सगळ्या कुंभमेळ्यांचं आयोजन आणि इतर बाबी ही आखाडा परिषदच ठरवते.
या १३ आखाड्यांपैकी ७ मुख्य आखाड्यांची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली असं मानतात. हे सात आखाडे म्हणजे महानिर्वाणी, निरंजनी, जुना, अटल, अवाहन, अग्नी आणि आनंद आखाडा. या सर्व आखाड्यांना ४ श्रेणीत विभाजित करण्यात आलं आहे.
संन्यासी आखाडा
या आखाड्याचे शिष्य शैव असतात, म्हणजे भगवान शंकराची पूजा करणारे. यात खालील आखाड्यांचा समावेश होतो.
- निरंजनी आखाडा आणि त्यांचे सहयोगी आनंद आखाडा
- जुना आखाडा आणि त्यासोबतच आवाहन व अग्नी आखाडा
- परी आखाडा – हा आखाडा खास साध्वींसाठी स्थापन करण्यात आला आहे. यांना सर्वप्रथम २०१९ साली झालेल्या कुंभमेळ्यात सहभागी करण्यात आलं.
- किन्नर आखाडा
वैरागी आखाडा
वैरागी आखाड्याचे शिष्य भगवान विष्णूचे अनुयायी असतात, ज्यात खालील आखाड्यांचा समावेश होतो.
- महानिर्वाण आखाडा (निर्वाणी) आणि त्याचे सहयोगी अटल आखाडा
- निर्मोही आखाडा आणि दिगंबर आखाडा (खालसा आखाडा)
उदासी आखाडा
हा आखाडा निर्मल आखाडा म्हणूनही ओळखला जातो. यात शीख धर्माचं पालन करणाऱ्या शिष्यांचा समावेश होतो.
कल्पवासी आखाडा
चौथा आखाडा म्हणजे कल्पवासी आखाडा, हे शिष्य ब्रह्मदेवाचे अनुयायी असतात. तुम्ही कधी कुंभमेळ्यात गेला असाल तर तिथे तपश्चर्येत मग्न असे काही साधू दिसले असतील, ते या कल्पवासी आखाड्याचेच.
कुंभमेळ्यात या आखाड्यातील साधूसंतांना सर्वप्रथम शाही स्नानाची संधी असते. त्यातही क्रम असतो. तो असा-
- महानिर्वाणी आखाडा आणि त्यांच्यासोबत अटल आखाडा
- निरंजनी आखाडा, सोबत आनंद आखाडा
- जुना आखाड्यासोबत आवाहन आणि अग्नी आखाडा
- निर्वाणी आखाडा
- दिगंबर आखाडा
- निर्मोही आखाडा
- नवीन उदासीन आखाडा
- मोठा उदासीन आखाडा
- निर्मल आखाडा
हा होता भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या विविध आखाड्यांचा इतिहासात. तुम्ही कुंभमेळ्यात कधी गेला असाल आणि या आखाड्यांतील साधूंचा काही खास अनुभव तुम्हाला आला असेल तर तो आम्हाला नक्की सांगा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.