आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
‘द जंगल बुक’ आणि त्यातील मोगलीची गोष्ट भारतातील प्रत्येक घरात वाचली, ऐकली आणि पाहिली जाते. जंगल बुक ही मोगली नावाच्या एका भारतीय मुलाची कथा आहे ज्याला जन्मानंतर जंगलात सोडलं जातं. हा मोगली लांडग्यांच्या मुलांसह लहानचा मोठा होतो. माणुस असलेला मोगली आणि शेरखान नावाच्या वाघाचा संघर्ष यात दाखवण्यात आला आहे. ‘जंगल बुक’ या पुस्तकाचं आतापर्यंत अनेक कार्टून, हॉलीवूडपटांमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. या पुस्तकाचा लेखक रुडयार्ड किपलिंगला देखील भारतात खूप प्रसिद्धी मिळालेली आहे.
किपलिंगचा जन्म भारतात झाला होता आणि त्याला प्रसिद्धी देखील भारतीय मुलाच्या कथेमुळं मिळाली. मात्र, तरीही तो नेहमीच ब्रिटिशांशी एकनिष्ठ होता. त्यानं ब्रिटिशांनी भारतात केलेल्या अनेक वादग्रस्त कृत्यांना पाठिंबा दिला होता. भारतीय इतिहासातील सर्वात अमानुष हिंसाचारांपैकी एक असलेल्या जालियनवाला बाग हिंसाचारासाठी आपण सर्व जनरल डायरला जबाबदार धरतो. मात्र, या हिंसाचारासाठी नोबेल पुरस्कार विजेता आणि भारतीयांचा लाडका लेखक रुडयार्ड किपलिंगदेखील जबाबदार होता, हे तुम्हाला माहिती आहे का?
बॉम्बे प्रेसिडेन्सी(आताची मुंबई)मधील मलबार हिल परिसरात रुडयार्ड किपलिंगचा जन्म झाला होता. ३० डिसेंबर १८६५ रोजी जन्मलेल्या रुडयार्डचं पूर्ण नाव जोसेफ रुडयार्ड किपलिंग असं होतं. द जंगल बुक (१८९४), किम (१९०१) या फिक्शन आणि ‘द मॅन हू वुड बी किंग’ (१८८८) यासारख्या अनेक लघुकथांमुळं रुडयार्डला लेखक म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्यानं मंडाले (१८९०), द गॉड्स ऑफ द कॉपीबुक हेडिंग्स (१९१९), द व्हाईट मॅन्स बर्डन: द युनायटेड स्टेट्स अँड द फिलीपीन आयलंड (१८९९) आणि ‘ईफ— ‘ (१९१०) सारखे कवितासंग्रह देखील लिहिले होते. लघुकथांचा इनोव्हेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याचं बालसाहित्य क्लासिक आहे. किपलिंग १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला युनायटेड किंगडममधील सर्वात लोकप्रिय लेखकांपैकी एक होता. १९०७ मध्ये, त्याला साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळालं. त्यावेळी नोबेल मिळवणारा तो सर्वात कमी वयाचा लेखक होता.
ज्या ठिकाणी रूडयार्ड किपलिंगनं आपलं बरंचसं साहित्य लिहिलं त्या आधुनिक भारतामध्ये त्याची प्रतिष्ठा वादग्रस्त राहिली आहे. विशेषत: आधुनिक राष्ट्रवादी लोक आणि वसाहतवादी टीकाकारांमध्ये तो कुप्रसिद्धच आहे.
रुडयार्ड किपलिंग हा, जालियनवाला बाग हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या जनरल रेजिनाल्ड डायरचा खंदा समर्थक होता. किपलिगनं डायरचा उल्लेख ‘the man who saved India’ असा केला होता.
जेव्हा जालियनवाला बाग हिंसाचारानंतर डायरला मायदेशी पाठवण्यात आलं तेव्हा त्याला पुरस्कारासाठी किपलिंगनं निधी देखील दिल्याचं सांगितलं जातं. याबाबत अनेक अभ्यासकांमध्ये दुमत आहे. सुभाष चोप्रा त्यांच्या ‘किपलिंग साहिब – द राज पॅट्रियट’ या पुस्तकात लिहितात की, डायरसाठीचा निधी किपलिंगनं नव्हे तर ‘द मॉर्निंग पोस्ट’ या वृत्तपत्रानं सुरू केला होता. किपलिंगनं डायर फंडात कोणतेही योगदान दिलं नव्हतं.
१९१९ मध्ये भारत स्वातंत्र्यलढ्यात अडकला होता. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीसह, भारताला ब्रिटनकडून स्वातंत्र्याची अपेक्षा होती. कारण भारतानं पहिल्या महायुद्धासाठी ब्रिटनला आर्थिक आणि सैन्याची मदत केली होती. मात्र, ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिलं नाही. परिणामी भारतीयांमध्ये पुन्हा असंतोष खदखदू लागला. काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी १८५७ सारख्या उठावाची शक्यता व्यक्त केली. त्यामुळं भारतातील आंदोलनं नियंत्रणात ठेवण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला होता. ब्रिटीश राजवटीविरोधात निषेध मोर्चे काढणे हा पंजाबमधील दैनंदिन जीवनाचा एक भाग झालं होतं. पंजाबमधील महत्त्वाचं शहर असलेल्या अमृतसरमध्ये मुलांना शिकवणाऱ्या एका इंग्रजी महिलेला काही नागरिकांनी मारहाण केली होती. मात्र, स्थानिक भारतीय लोकांनीच तिचा जीव देखील वाचवला होता. जेव्हा जनरल डायरपर्यंत ही बातमी पोहचली तेव्हा त्यानं मात्र, परिसरातील प्रत्येक नागरिकाचे प्रचंड हाल सुरू केले.
१३ एप्रिल १९१९ रोजी शीख नागरिकांचा बैसाखी हा महत्त्वाचा सण होता. अमृतसरमध्ये अनेक शीख या धार्मिक उत्सवासाठी जमले होते. सण साजरा करून काहीजण जालियनवाला बाग मैदानाकडे गेले. जनरल डायरला याची माहिती होती. त्यानं परिस्थिती हाताळण्यासाठी गुरखा रेजिमेंट घेऊन जालियनवाला बाग गाठली. डायरच्या सैन्यानं मैदानाबाहेर जाण्याचा एकमेव मार्ग अडवला आणि गोळीबार सुरू केला.
डायरनं नागरिकांना कोणतीही चेतावणी न देता गोळीबार आणि तोफगोळ्याचा मारा सुरू केला होता. यामुळे गोंधळ होऊन मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी देखील झाली. अनेकांनी बागेत असलेल्या विहिरीत उड्या मारल्या. या हिंसाचाराचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ब्रिटिशांनी दिलेला ‘नाइटहुड’ किताब परत दिला.
या क्रूर हत्याकांडामुळं डायरच्या अडचणींमध्ये वाढ झाली. या प्रकरणाची अधिकृत चौकशी करण्यात आली. मात्र, त्यात फक्त ६०० लोक मरण पावल्याचं दाखवण्यात आलं. परंतु इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्वतंत्र तपासात मृतांची संख्या १ हजार ५०० असल्याचं समोर आलं. ब्रिटिश इंडियन मिलिटरीनं या घटनेवर कोर्ट-मार्शल करण्यास नकार दिला होता. ब्रिटनमधील हाऊस ऑफ कॉमन्सच्या अनेक सदस्यांनी डायरच्या कृत्याचं समर्थन केले होतं. मात्र, त्याला बहुमत नसल्यानं डायरच्या विरोधात ठराव पास झाला. त्यानंतर डायरला त्यांच्या पदावरून मुक्त करून आणि इंग्लंडला परत पाठवलं. डायरला परत पाठवल्यामुळं भारतातील ब्रिटिश अधिकारी संतापले. डायरने पंजाबमधील ब्रिटिश नागरिकांना वाचवलं, असं त्यांचं म्हणणं होतं.
जेव्हा डायर ब्रिटनला परतला तेव्हा त्याला एखाद्या हिरोप्रमाणं वागणुक मिळाली. त्याला त्याचं उर्वरित आयुष्य व्यवस्थित जगता यावं यासाठी निधी देखील गोळा करण्यात आला. निधी देणाऱ्यांमध्ये रुडयार्ड किपलिंग या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाचा देखील समावेश होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.