आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारत. भारत म्हटल्यावर उभा राहतो काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेला, वैविध्याने एकसंध असलेला एक देश. भारत म्हटलं की डोळ्यासमोर येतो त्याचा वैभवशाली इतिहास. भारत म्हटलं की डोळ्यासमोर येतात अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळं, मग त्यात हिंदूंची मंदिरं आहेत आणि मुसलमानांच्या मशिदीही आहेत.
असं म्हणतात इस्लाम भारतात आला तो त्या उत्तरेकडील खैबर खिंडीतून. पण इस्लाम भारतात आणण्यात आला आणि तो देखील अरबी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून. हे व्यापारी मसाल्यांचा व्यापार करायला हिंदुस्तानात यायचे हे तर आपल्याला माहितीच आहे. पण याचसोबत ते इस्लाम प्रसाराचं कामही करायचे. त्यांनी इथल्या एका राजावर आपल्या धर्माचा एवढा प्रभाव पाडला की त्यानं हिंदुस्थानातील पहिली मस्जिद उभारली.
कोण होता तो राजा? कशी उभारण्यात आली भारतातील पहिली मस्जिद? आज आपण तीच गोष्ट जाणून घेणार आहोत.
साधारण इसवीसन ६००चा काळ होता. भारताच्या दक्षिण टोकावर, म्हणजेच केरळमध्ये, चेरांचं राज्य होतं. केरळ तेव्हा त्यांच्या मसाल्यांसाठी फारच प्रसिद्ध होतं. कुठून कुठून लोक इथले मसाले घेत आणि आपापल्या भागात नेऊन विकत. त्याकाळी मसाल्यांना सोन्यासारखी किंमत होती.
आता भरपूर व्यापारी आले म्हणजे भरपूर सुबत्ता आलीच. पण या सुबत्तेसोबत त्यांच्या रितीभती आणि अर्थात धर्मही, आलाच. आणि चेरा राजांना फक्त सुबत्तेशी देणंघेणं होतं. बाकी, धर्मप्रसाराबाबतीत ते फारच मवाळ होते आणि म्हणूनच केरळमध्ये मोठ्या प्रमाणात इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म प्रसार सुरू झाला.
यातही एक चेरा राजा होता जो इस्लाम धर्म केरळमध्ये पसरवायला कारणीभूत ठरला. त्याचं नाव होतं- चेरामन पेरूमल.
असं म्हणतात की मोहम्मद पैगंबर यांनी एकदा चंद्राचे दोन तुकडे करून दाखवण्याचा चमत्कार घडवला होता. हा चमत्कार चेरामनने बघितला. त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं ही घटना आपल्या मंत्र्यांना सांगितली, राजज्योतिषांना सांगितली, पण कोणालाच काहीच कल्पना नव्हती.
मग एकदा मालदीवच्या राजाला भेटल्यावर त्यानं हा अजबगजब चमत्कार त्याला सांगितलं. तेव्हा तिथल्या अरबी व्यापाऱ्यांनी सांगितलं की हा तर मोहंमद पैगंबर यांचा चमत्कार आहे. हे ऐकून आपला राजा मो. पैगंबरांना भेटायला अरबांच्या भागात गेला. असं म्हणतात की त्या भेटीदरम्यान त्यानं इस्लाम धर्म स्वीकारला आणि तो भारतात परतला.
चेरामनने मोहम्मदांना असं वचन दिलं होतं की तो भारतात परतल्यावर, आपल्या राज्यात म्हणजे केरळमध्ये, जाऊन सगळ्यात आधी तिथं एक मस्जिद बांधेल. आणि त्यानं ते वचन पूर्ण केलं.
इसवीसन ६४५मध्ये थ्रिसूर गावात हिंदुस्थानातील पहिली मस्जिद, चेरामन जुम्मा मस्जिद, चेरामन पेरूमलने उभारली.
१५०४मध्ये पोर्तुगीजांनी या मशिदीची नासधूस करण्याचा प्रयत्न केला पण आज इतक्या वर्षांनीदेखील ही मस्जिद तिचा इतिहास सांगत उभी आहे. या मशिदीचं अनेकदा नूतनीकरण करण्यात आलं, पण मूळ ढाचा आजही कायम आहे. मंदिरांचा देश म्हणून ओळख असलेल्या भारतातील ही पहिली मस्जिद भारताच्या सर्वधर्मसमभावाचं प्रतीकच म्हणावं लागेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.