आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कोरियन आणि भारतीय या दोन गोष्टी एकमेकांशी संलग्न असु शकतात यावर विश्वास ठेवणे तसे अवघडच. भारतीय द्वीपसमुहापासुन प्रत्येक बाबतीत वेगळ्या असणाऱ्या कोरियाचा भारताशी संबंध असण्याचे श्रेय जाते ते संयुक्त राष्ट्र या जागतिक संघटनेला.
१९५० साली झालेल्या याच कोरियन युध्दाबद्दल आणि भारतीय सेनेच्या जवानांनी केलेल्या अतुल्य कामगिरीचा आढावा आज आपण घेणार आहोत.
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये विभाजनानंतर राजकीय वर्चस्वावरुन युध्द झाले. या युध्दाचा परिणाम आशिया खंडातील राजकीय घडामोडींवर होणार असा विश्वास त्यावेळी भारतीय तज्ञांना होताच. त्यावेळी संयुक्त राष्ट्राने जगातील विविध देशांना आपली सेना पाठवण्यास सांगितले. अशावेळी संयुक्त राष्ट्राच्या हाकेला उत्तर दिले तर, जगात अनेक मोठ्या राष्ट्र भारताकडे आदराने बघतील अशीही एक धारणा त्यावेळी भारताच्या राजकीय नेत्यांची होती. यामुळे स्वातंत्र्य मिळवून केवळ तीनच वर्षे झालेली असतानाही भारताने आपल्या वैद्यकीय तुकडीला दक्षिण कोरियामध्ये सेवेसाठी पाठवले.
भारताने पाठवलेली ३४६ जणांची पैरा ६० नावाची तुकडी वैद्यकीय सहाय्य करण्यासाठी पाठवली गेली. या तुकडीचे नेतृत्व केले होते लेफ्टनंट कर्नल ए. जी. अंगराज यांनी. या तुकडीत ४ युध्द वैद्य, २ भूल तज्ञ आणि १ दंतवैज्ञ यांचा समावेश होता.
लेफ्टनंट कर्नल रंगराज स्वत: एक नावाजलेले अधिकारी होते. ते जपानच्या विरोधात १९४४ मध्ये लढले होते आणि बुर्माच्या युध्दात सुध्दा ते सहभागी होते. तसेच पैराशुटमधुन उडी मारणाऱ्या पहिल्या भारतीय चमूमध्ये त्यांचा समावेश होता.
भारतीय सैन्याला युध्दात सहभागी व्हावे लागले नसले तरीही त्यांच्यासमोर असलेली आव्हाने काही कमी नव्हती. सहा महिने पुरेल एवढी वैद्यकीय मदत घेऊन तुकडी पोहचली तेव्हा ते साहित्य योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे कसलीही वाहतूक यंत्रणा नव्हती हे त्यांना कळाले.
अशावेळी स्वत:चे साहित्य तिथेच ठेवण्यावाचुन त्यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. त्यावेळी त्यांना एक वाफेवर चालणारी आगगाडी सापडली. या आगगाडीत, पाणी वाहुन नेण्यासाठी त्यांनी एक साखळी बनवली. या साखळीतुन पाणी वाहुन नेत त्यांनी वाफ तयार केली आणि ती आगगाडी सुरु केली. दोन सैनिकांनी ती आगगाडी सुरु करुन तुकडीला इच्छित ठिकाणी पोहचवले, ते ही ती आगगाडी स्फोटात उध्वस्त होण्याच्या आत.
मार्च १९५१ मध्ये अमेरिकन सैन्याने ‘ऑपरेशन टॉमहॉक’ लागू केल्यानंतर जखमी सैनिकांची संख्या वाढणार होती. परंतु भारतीय तुकडी यासाठी तयार होती. भारतीय सेनेने प्रत्येक जखमी सैनिकाची काळजी घेतली, जखम कमी असो किंवा जास्त. भारतीय तुकडीने त्यावेळी १०३ शस्त्रकिया केल्या.
एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या मते, “भारतीय जवानांच्या कार्यक्षमतेने मी अचंबित झालो. एवढ्या छोट्या तुकडीने १०३ शस्त्रक्रिया करणे ही बाब त्यावेळी अतिशय आश्चर्यकारक आहे. त्यापैकी कमीत कमी ५० लोकांचा जीव तरी या तुकडीने वाचवला.”
त्यावर्षी सप्टेंबरमध्ये या तुकडीने १५० सैनिकांना सोडवले तर ४४८ जखमींना उपचार दिले. हे सगळं फक्त ६ दिवसात. त्या काळाच्या मानाने ही गोष्ट फारच आश्चर्यजनक होती.
भारताने फक्त युध्दभुमीवरच नाही तर राजकीय पटलावरही या युध्दात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यातील पहिली बाब म्हणजे युध्द वाढू न देण्यात भारताने हातभार लावला. भारतीय सरकारने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने परिस्थिती पुर्ववत करण्यासाठी ठरवलेल्या नियमनास समर्थन दिले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमन क्र. ३७६ ज्यानुसार उत्तर आणि दक्षिण कोरिया एकत्र आणण्याचे प्रयत्न केले जात होते, त्याला भारताने कडाडुन विरोध केला. युध्द परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न न करता असे पाऊल उचलणे चुक आहे असे भारताने त्यावेळी सांगितले.
सतत चालू असणाऱ्या या युध्दात शेवटची संधी घडवून आणण्यात भारतीय जनरल के. एस. थिमया यांचा मोठा हात होता. त्यांच्याच सहभागाने शेवटी २७ जुलै, १९५३ रोजी युध्दाचा शेवट झाला.
युध्द संपल्यावर अजुन मोठा प्रश्न होता तो म्हणजे युध्दकैद्यांचा. युध्दकैद्यांना आपल्या आवडीच्या देशात जाऊ द्यावे असे संयुक्त राष्ट्राने सांगितले, तर कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांनी सैनिकांना त्यांच्याच देशात घेऊन जावे असे सांगितले. अशावेळी पाच देशांची मिळून एक समिती बनवली गेली ज्यात भारताचाही समावेश होता. यामध्ये भारताने दिलेल्या योगदानासाठी भारताची सर्व जगात स्तुती केली गेली.
ली म्युंग बक, दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती यांच्या मते, कोरियाचे नशीब चांगले होते की त्यांना भारतासारखा प्राचीन इतिहास आणि संस्कृती लाभलेला देश मित्र म्हणुन मिळाला. ए. जी. रंगराजन यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या वैद्यकीय तुकडीने जखमी सैनिकांची खुप नम्रतेने सेवा केली. त्याच सेवेतुन त्यांच्या शूरपणाचेही दर्शन झाले. या विशेष मदतीसाठी दक्षिण कोरियन सरकारने भारतीय सेनेला सन्मानित केले आहे. भारतीय सेनेच्या त्याग आणि एकजूटीशिवाय आज कोरिया सद्यपरिस्थित नसता असे ते म्हणतात.
भारतीय सरकारनेही या तुकडीचा यथोचित सन्मान केला होता. लेफ्टनंट कर्नल अंगराज यांच्याबरोबर अजुन एकाला महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित केले. सहा अधिकाऱ्यांना वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर २५ जवानांच्या शौर्याची कहानी युध्द अहवालात कायमस्वरुपी मांडण्यात आली. तसेच अमेरिकेकडुनही या तुकडीस कांस्य पदक देण्यात आले.
याच शूर कार्याला अभिवादन करण्यासाठी दिल्लीमध्ये एक स्मृतीस्थळ बनवण्यात येत आहे. भारत आणि दक्षिण कोरिया दोघांच्या सहकार्याने हे कार्य हाती घेतले जाणार आहे. हे स्मृतीस्थळ म्हणजे काहीसा उशीर का असेना पण कोरियन युध्दात असामान्य शौर्य दाखवलेल्या जवानांना आज दोन्ही देशांच्या जनतेने त्यांच्या कार्याला ठोकलेला सलामच.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.