आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मनगटात जिद्द असेल तर मोठ्या तला मोठा पहाडही आपण फोडू शकतो, अशी सकारात्मक आणि मानसिक उर्जा वाढवणारी वाक्ये आपण अनेक पुस्तकात वाचली असतील, प्रेरणादायी वक्त्यांच्या तोंडून ऐकली असतील. पण, खरेच एखादा पहाड तोडणे वाटते तितकी सोपी गोष्ट आहे का? डोंगरालाही भगदाड पाडू शकतो असे म्हणणे आणि खरोखरच डोंगराला भगदाड पाडणे यात किती अंतर आहे बरं.
पण, एक अवलिया बिहारमध्ये होऊन गेला ज्याच्या आयुष्याची कथा आपण मोठ्या पडद्यावरही पाहिली. अनेक कपोलकल्पित कथा दाखवून आपल्याला आवाक करणाऱ्या चित्रपटसृष्टीलाही दशरथ मांझी यांच्या जीवनाने भुरळ घातली.
दशरथ मांझी याचा हा जीवन प्रवास खरोखरच अत्यंत प्रेरणादायी आहे. मांझी – द माउंटन मॅन हा चित्रपट पाहिल्यानंतर आणि त्यातील डायलॉग एकल्यानंतर तर भारावून जायला होते.
‘भगवान के भरोसे मत बैठीए, का पता भगवान हमरे भरोसे बैठा हो,’ हा डायलॉग ऐकल्यानंतर तर फक्त वाह क्या बात है! जबरदस्त, एकदम भारी हीच वाक्ये आपल्या तोंडून निघतात.
दोन अडीच तासांच्या चित्रपटात दशरथ मांझी यांची संपूर्ण जीवन कथा सामावणे शक्य आहे का? चित्रपटासारखी कलाकृती मोठ्या माणसांना आपल्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न करते पण, नेहमीच तो प्रयत्न यशस्वी होतो असे नाही. पहाड खोडून रस्ता करणाऱ्या या व्यक्तीचे आयुष्याचा लेखाजोखा मांडणेही तसे पहाडा इतकेच मोठे काम. पण, त्यांच्या जीवनाचे जे पैलू चित्रपटातून उलगडू शकले नाहीत ते पैलू या लेखातून उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न.
बिहारच्या गया जिल्ह्यातील गहलौर हे एक अतिशय दुर्गम खेडे. या खेड्यातील लोकांची अवस्था अत्यंत दयनीय होती. हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही अशी अवस्था. एका मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाला या डोंगराचीच मोठी अडचण होती. कारण, कुठल्याही कामासाठी शहरात जायचे म्हटले तर एक तर हा पूर्ण डोंगर चढून जावे लागे किंवा पूर्ण डोंगराला वळसा घालावा लागे. त्यामुळे गाव सोडून शहरात जाऊन काम करण्याचा विचारही कोणाच्या मनाला शिवत नव्हता.
अशा गावात १९२९ साली दशरथ मांझी यांचा जन्म झाला. मांझी यांच्या पाचवीलाच दारिद्र्य पुजलेले. गावातील सगळ्याच लोकांची अवस्था थोड्या फार फरकाने सारखीच होती. कधीकधी तर अक्षरशः उंदीर मारून त्यावर गुजराण करण्याचीही वेळ येई. पण, गाव सोडून जाणार तरी कुठे आणि करणार तरी काय? म्हणून लोक नाईलाजाने दिवस ढकलत होते.
गावात ना वीज होती, ना पाणी, ना रस्ते. सगळ्या पायाभूत सोयीसुविधांची वानवाच. तो संपूर्ण पर्वत पालथा घालून पलिकडचे जग कसे आहे, हे पाहण्याचीही कुणी हिंमत करत नव्हते.
पण, दशरथ मांझी यांना अचानकच घर सोडून कुठे तरी निघून जावेसे वाटू लागले आणि त्यांनी सरळ डोंगराचा रस्ता धरला. फिरत फिरत ते धनबादला पोहोचले. आता पोटात भुकेने आगडोंब उसळला होता. या अनोळख्या ठिकाणी काम न करता तर कोणी खायला देणार नाही, हे त्यांनी ओळखले. वय लहान होते तरीही त्यांनी कोळशाच्या खाणीवर मजुरी केली. पण, काही दिवसांनी त्यांना पुन्हा आपल्या घरची आठवण सतावू लागली आणि ते घरी परत आले.
त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच गाव सोडण्याचा विचारही केला नाही. वयात आल्यावर फागुनीदेवीशी त्यांचे लग्न झाले. घर खर्च चालवण्यासाठी म्हणून ते दूर डोंगरात जाऊन लाकूड तोडण्याचे काम करत असत. पहाटे लवकर उठून त्यांना कामावर जावे लागे. मागाहून फागुनीदेवी त्यांचा डबा आणि पाणी घेऊन जात असत. नवऱ्यामुळे फागुनीदेवीलाही अख्खा डोंगर पालथा घालावा लागे. तिचे हे कष्ट मांझींना अजिबात बघवत नव्हते पण, पर्यायही नव्हता.
आपल्या इतक्या खडतर आयुष्यातही आपली पत्नी प्रामाणिकपणे आपल्याला साथ देते याचेच त्यांना किती अप्रूप होते. फागुनीची ही निष्ठा आणि प्रेमच तर त्यांना उर्जा देत होते. ज्या डोंगराने त्यांना त्यांचा चरितार्थ दिला होता त्याच डोंगराने त्यांच्या आयुष्यातील आनंदच हिरावून घेतला. ज्या डोंगराच्या सहाय्याने ते आपला संसार उभा करू पाहत होते त्याच डोंगराने त्यांच्या संसाराची माती केली.
असेच एके दिवशी नवऱ्यासाठी जेवणाचा डबा आणि पाणी घेऊन जात असताना, फागुनीदेवीचा पाय घसरला आणि ती डोंगरावरून एका छोट्या खड्ड्यात पडली. बराच उशीर झाला तरी बायको डबा घेऊन आली नाही म्हणून तिच्या काळजीने ते डोंगर उतरून घराकडे येऊ लागले, तर वाटेल फागुनीच्या डोक्यावरील घडा फुटून त्याचे तुकडे विखुरलेले दिसले.
त्यांच्या काळजात चर्र झालं! त्यांनी इकडेतिकडे शोधाशोध केली तेंव्हा बाजूच्या खड्ड्यात फागुनिदेवी बेशुद्ध होऊन पडल्याचे त्यांना दिसले. तिला तसेच खांद्यावर घेऊन ते दवाखान्याकडे निघाले. एकतर डोंगराची अवघड वाट आणि खांद्यावर बेशुद्ध झालेली पत्नी. एकट्या मांझींना दवाखान्यात पोहोचायला खूपच उशीर झाला होता. दवाखान्यात जाईपर्यंत फागुनीची ज्योत मालवली होती.
आता हा भला मोठा डोंगर त्यांना शत्रूसमान भासू लागला कारण, याच डोंगराने त्यांची पत्नी त्यांच्यापासून हिरावून घेतली.
बस्स झाले! आता आणखी अशा किती! फागुनी या डोंगरामुळे आपल्या जीवावर उदार होणार? या डोंगराचा काय तो एकदा साक्षमोक्ष लावलाच पाहिजे म्हणून दशरथ मांझी यांनी हा डोंगर फोडण्याचा निर्धार केला. रोज उठून ते मुकाट्याने डोंगराकडे जात आणि एकेक घाव घालून डोंगराला खिळखिळा करण्याचा प्रयत्न करत. एवढा मोठा डोंगर आणि त्याच्याशी भिडणारे एकटे दशरथ मांझी!
गावकऱ्यांना वाटे बायकोच्या दु:खाने मांझीला वेडे बनवले आहे म्हणून तो डोंगराशी वैर धरून बसला आहे. लोकांनी त्यांना वेड्यात काढले तरी, मांझींना काही वाटले नाही. कारण, काही वाटून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता.
काही झाले तरी हा डोंगर फोडून यातून रस्ता बनवायचाच हे त्यांच्या मनात पक्के रुजले होते. जणू रोज उठून त्या डोंगराशी दोन हात करणे एवढाच त्यांच्या आयुष्याचा उद्देश होता. पण, न चुकता त्यांचे डोंगराशी असलेले हे यु*द्ध सुरूच राहिले. एक दिवस दोन दिवस, एक वर्ष दोन वर्षे नव्हे तर तब्बल बावीस वर्षे! बावीस वर्षे अखंडपणे त्या डोंगराशी झुंज देऊन त्यांनी डोंगरालाही नमते घेण्यास भाग पाडले.
या दरम्यान ते फक्त लोकांना डोंगर पार करण्यात मदत करत. त्यांच्या या मदतीच्या बदल्यात कधीकधी लोकं त्यांना पैसे देत. काहीही झाले तरी मांझींनी डोंगराशी आपली झुंज सुरुच ठेवली आणि याच चिवट झुंजीतून अखेर त्यांच्यासाठीच नव्हे तर गावकऱ्यांसाठी, गावातील येणाऱ्या पिढ्यानपिढ्यासाठी रस्ता तयार झाला.
३६० फुट लांब, २५ फुट रुंद आणि ३० फुट उंचीच्या डोंगराला त्यांनी अखेर भगदाड पाडलेच. एका किरकोळ शरीरयष्टीच्या “वेड्या” माणसाने शेवटी हे अशक्य काम शक्य करून दाखवले.
गावकऱ्यांनी तर मांझींना बाबा म्हणूनच हाक मारण्यास सुरुवात केली. कारण, मांझींनी तर ते करून दाखवले होते जे निव्वळ अशक्य होते. हे काम कुणा सामान्य माणसातून हातून होणे शक्य नव्हतेच. मांझी म्हणजे कुणी चमत्कारी बाबा असावा असेच गावकऱ्यांना वाटू लागले. म्हणून गावकरी त्यांना बाबा म्हणूनच हाक मारू लागले. कालपर्यंत वेडा म्हणून अवहेलना झेलणारे मांझी आज गावकऱ्यांच्या आदराचे आणि सन्मानाचे मानकरी झाले.
मांझी बाबांचे म्हणणे होते की मनात विश्वास असेल तर सामान्य माणूसही चमत्कार घडवू शकतो. असेल हरी तर देईल खाटल्यावरी या वृत्तीने काही होत नाही. कधीकधी परमेश्वरही काही गोष्टी माणसांवरच सोपवून देतो. मांझी बाबा म्हणजे असेच परमेश्वराने नेमलेला माणूस होते की काय असेच वाटते.
डोंगर तर पोखरला होता पण, अजूनही मांझींची लढाई संपली नव्हती. त्यांनी एकट्याने अवाढव्य डोंगराला नमवले होते पण, आता त्यांची लढाई होती सरकारी दप्तरातील फाईलींच्या डोंगराशी. कारण, डोंगरातून पक्का रस्ता तयार व्हावा हे त्यांचे स्वप्न होते.
मग त्यांनी सरकारी कार्यालयात हेलपाटे घालणे सुरु केले. गावापर्यंत रस्ता व्हावा म्हणून त्यांनी दिल्लीपर्यंत धडक मारली. त्यांना गावात शाळा आणि दवाखाना व्हावा असेही वाटत होते. सरकार आपल्या मागण्याकडे लक्ष देत नाही हे पाहून त्यांनी आपल्या गावापासून ते दिल्लीपर्यंतचे अंतर पायी सर केले. अशाने सरकारचे आपल्याकडे लक्ष वेधले जाईल आणि आपल्या मागण्या मान्य होतील अशी त्यांना आशा होती.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दरबारमध्येही त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा यथोचित आदर सत्कार करून त्यांच्या मागण्या मान्य होतील असे आश्वासनही दिले.
त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून सरकारने त्यांना जमीन बक्षीस म्हणून दिली. पण, त्यांनी तीच जमीन गावात दवाखाना व्हावा म्हणून सरकारला परत दिली. बिहार सरकारने त्यांच्यासाठी पद्मश्रीची देखील मागणी केली होती.
ज्या गावाने त्यांना वेड्यात काढले त्याच गावासाठी त्यांची केवढी ही धडपड? डोंगराला शरण आणणाऱ्या माणसाचे मनही डोंगरापेक्षाही मोठे आणि कणखर होते, हेच यातून दिसते.
पायाभूत सुविधेशिवाय गावकऱ्यांचे जे हाल होत होते ते त्यांना अजिबात बघवत नव्हते. म्हणूनच गावाच्या एकंदर उद्धारासाठी फक्त रस्ताच नाही तर सर्वच पायाभूत सोयी आवश्यक आहेत आणि त्या गावकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत याबाबत ते आग्रही होते.
१७ ऑगस्ट २००७ रोजी कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डोंगराला हरवणारा माणूस कॅन्सरला मात्र हरवू शकला नाही.
परंतु, त्यांच्या कामानेच त्यांना कालजयी ठरवले. आज मांझी हयात नसतीलही पण त्यांच्या कामाच्या रुपात ते अजूनही या गावात आणि गावकऱ्यांच्या मनात वास करतायत, आजही अनेकांना प्रेरणा देतात.
मांझी यांच्या या भारावलेल्या जीवनपटाने चित्रपट सृष्टीला खुणावले नसते तर आश्चर्यच. चित्रपटाच्या माध्यमातून दशरथ मांझी यांचा हा जीवनपट देशातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला. २०१५ साली त्याच्या जीवनावर आधारित “मांझी-द माउंटन मॅन” हा चित्रपट आला.
नवाजुद्दीन सिद्दिकीने आपल्या अभिनयाने या पत्राला न्यायही दिला. त्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. या चित्रपटातील प्रेरणादायी डायलॉग्सनेही प्रेक्षकांच्या मनात घर केले. या चित्रपटातून मांझींच्या जीवनावर थोडाफार प्रकाश पडला.
या चित्रपटाआधी २०१२ साली आलेल्या “द मॅन हू मुव्ह्ड द माउंटन” या डॉक्युमेंटरीमधूनही मांझींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. सरकारच्या चित्रपट विभागाकडूनच हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला होता.
प्रादेशिक सिनेमांना देखील मांझींच्या आयुष्याला पडद्यावर उतरवण्याचा मोह अनावर झाला. २०११ साली ‘अलेव मनदारा’ नावाचा एक कन्नड चित्रपट येऊन गेला. हा चित्रपट मांझींच्या जीवनावर बेतलेला नसला तरी, यात मांझींचे पात्र दाखवण्यात आले होते.
“मनात विश्वास असेल तर डोंगरालाही फोडू शकतो”, हे वाक्य निव्वळ एक प्रेरणादायी वाक्य न राहता मांझी बाबाच्या जीवनाचा अर्क या एका वाक्यात उतरला आहे. सातत्य, जिद्द आणि चिकाटी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचवू शकते हेच मांझी बाबांच्या जीवनाकडून शिकायला मिळते.
आपल्या आयुष्यातील अडचणी तरी निश्चितच या डोंगरा एवढ्या मोठ्या नसतील. गरज आहे ती चिकाटीने, आपल्या अडचणींना फिडण्याची, त्यांचे खरे स्वरूप एकदा का आपल्याला कळाले की त्या अडचणींचा भुगा करण्यात फारसा वेळ लागत नाही. मांझी बाबाचा हा धडा जर आपण कायम लक्षात ठेवला तर आपणही आपले ध्येय निश्चितच गाठू शकतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.