आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१९९९च्या कारगिल युद्धाचे नायक असलेल्या कॅप्टन विक्रम बत्रांची शौर्यगाथा सगळ्याच देशवासीयांना माहिती आहे. पण तुम्हाला माहितीये का देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीर जवानाचे बालपण कसे होते? मोठ्या पगाराची नोकरी नाकारून भारतीय सैन्य दलात जाण्याचा निर्णय त्याने का घेतला? तर मग चला त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ..
१९७४ साली पालमपुरच्या जी बात्रा यांच्या घरी ९ सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी कमलाकांता यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. दोघेही बालपणापासूनच कुशाग्र होते. त्यांची आई पेशाने शिक्षिका असल्याने त्यांनी घरातच मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. थोडे मोठे झाल्यावर त्यांना पालमपुरच्या सेंट्रल स्कुलमध्ये टाकण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विक्रमने आपल्या शिक्षकांचे मन जिंकले. ते बालपणापासूनच ऍक्टिव्ह होते. स्पोर्ट्स असो वा अभ्यास, प्रत्येकच बाबतीत विक्रम एक पाऊल पुढे होते. विक्रम एक अष्टपैलू होते. ते प्रत्येक स्पर्धेत आणि परीक्षेत सक्रियपणे सहभागी व्हायचे.
कॅप्टन विक्रमी बत्रा यांच्या शाळेजवळ सैन्याचा एक कॅम्प होता. त्या कॅम्पमध्ये जाता येता त्यांना सैनिक सराव करताना आढळून यायचे. सेनेची कवायत बघून ते यामुळे सैन्य दलाकडे आकर्षित करायचे. ते घरी जायचे त्यावेळी त्यांच्या वडिलांना सैन्य दलाच्या कवायतींची माहिती द्यायचे, इतकेच नाही, त्यांना सैन्यदलात समाविष्ट व्हायचे आहे, हे देखील अभिमानाने सांगायचे. त्यांच्या वडिलांना त्यांचे हे शौर्य बघून फार अभिमान वाटायचा. त्यांना सैन्यदलात एवढा रस आहे हे बघून त्यांचे वडील त्यांना अनेक किस्से सांगायचे.
पुढे ते चंदीगडला आले. तिथल्या डीएव्ही कॉलेजमध्ये त्यांनी विज्ञानाचे शिक्षण घेतले.
त्यांची एनसीसीचा सर्वश्रेष्ठ कॅन्डीडेट म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांना ‘रिपब्लिक डे’च्या परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
सर्वजण त्यांना सैन्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करत होते. पण त्यांना अजूनही त्यांचे ध्येय स्पष्ट नव्हते. यानंतर त्यांनी मर्चंट नेव्हीची परीक्षा दिली. यात ते पास झाले. काही दिवसात त्यांच्या हातात नियुक्ती पत्र आले. त्यांनी जाण्याची सर्व तयारी केली होती. ते पोलंडला जाण्यासाठी तयार होत असताना त्यांनी त्यांच्या आईला सांगितले की, त्यांना मर्चंट नेव्हीत जाण्याची इच्छा नाही. त्यांना सैन्य दलात जायचे आहे. त्यांनी त्याक्षणी मर्चंट नेव्हीमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला कारण मर्चंट नेव्हीमध्ये त्यांना तब्बल ८-१० लाख रुपये पगार होता. एवढ्या मोठ्या पगाराच्या नोकरीला सोडून ते सैन्य दलात जाणार होते. त्यांच्या या निर्णयावर ते ठाम होते व त्यांनी सैन्य दलासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून दिले होते.
१९९५ च्या आसपास पंजाब विद्यापीठात शिक्षण घेत असताना विक्रम यांची डिम्पल यांच्याशी गाठ पडली. त्या त्यांच्याबरोबर इंग्रजीचे शिक्षण घेत होत्या. लवकरच दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. वेळ आणि काळ जसा पुढे सरकत होता, तसा प्रेमाचा धागा मजबूत होत होता आणि गोष्ट लग्नापर्यंत येऊन पोहचली.
गोष्टी पुढे सरकत होती आणि त्यांच्या प्रेमकथेने आयुष्यात एक असा टर्न घेतला, ज्याचा डिंपल यांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. १९९६ मध्ये विक्रम यांची सैन्य दलात निवड करण्यात आली आणि डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. विक्रम यांनी आपल्या सैन्य दलातील नोकरीसाठी डिंपल यांच्यापासून काही काळासाठी लांब जाण्याचा निर्णय घेतला. पण यानंतर त्यांची पुन्हा भेट होणार नव्हती, याची दोघांना देखील पुसटशी कल्पना नव्हती.
ट्रेनिंगनंतर ६ डिसेंबर १९९७ साली त्यांची जम्मू काश्मीरच्या सोपोर नावाच्या ठिकाणी १३ जम्मू काश्मीर रायफल्समध्ये लेफ्टनंट म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
१८ महिने नोकरी केल्यानंतर १९९९ मध्ये त्यांना कारगिल युद्धासाठी जावे लागले. त्या युद्धात त्यांनी मोठा पराक्रम गाजवला आणि हम्प व राकी नाबी या दोन महत्वपूर्ण शिखरांवर घुसखोरांना बाजूला सरकवत तिरंगा फडकवला. त्यांच्या या कामगिरीनंतर त्यांना कॅप्टनपद बहाल करण्यात आले.
यानंतर त्यांनी श्रीनगर-लेह मार्गावर असलेल्या ५१४० या उंच शिखराला पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त करण्याचे मिशन सुरु केले. त्यांच्यासाठी हे एक मोठे आव्हान होते. पण “दिल मांगे मोअर” म्हणत त्यांनी आपले अभियान सुरु केले. त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने त्या उंच शिखराला मुक्त केले.
विजयाची ही मालिका इथेच थांबली नाही. ४८७५ या शिखरावर पुढे जाऊन त्यांनी शत्रूला आव्हान दिले. त्यांच्यासोबत त्यावेळी लेफ्टनंट अनुज नायर होते. त्यांच्यावर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यांनी पाहिलं की ते डेंजर झोनमध्ये आहेत. तरीही त्यांनी पाकिस्तानी सैन्याचा बिमोड करत कित्येकांना यमसदनी पोहोचवले.
मिशन पूर्ण होणार इतक्यात विक्रमची नजर त्यांच्या ज्युनिअर अधिकाऱ्यावर पडली. बॉम्बस्फोटामुळे तो गंभीर जखमी झाला होता. विक्रम यांनी त्या जखमी साथीदाराला खांद्यावर घेऊन मेडिकल कॅम्पच्या दिशेने पळण्यास सुरुवात केली.
इतक्यात शत्रूच्या गोळीने त्यांच्या शरीराचा वेध घेतला आणि विक्रम जागेवरच कोसळले. पण त्यांनी हार मानली नव्हती. त्यांनी त्यांच्या साथीदाराचा देह सुरक्षित ठिकाणी पोहोचवला आणि पाकिस्तानी सैनिकांशी झुंज देत राहिले. शेवटचा श्वास घेईपर्यंत त्यांनी त्या शिखरावर तिरंगा लावला होता.
विक्रम कारगिलहुन परतल्यावर डिंपल यांच्याशी लग्न करू इच्छित होते पण ते परतून आले नाहीत. त्यांनी आपले प्राण भारत मातेसाठी अर्पण केले होते. त्यांची चार वर्षांची प्रेमकाहाणी अमर झाली होती. आज विक्रम नसले तरी डिंपल यांच्या आठवणीत अजूनही आहेत. त्यांना अजूनही त्यांच्या पुनर्मिलनाची आशा आहे. त्यांचं हे नातं प्रेमाचा नवा अर्थ सांगून जातं. कारगिलमधील अपरिमित शौर्यासाठी कॅप्टन बत्रा यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीसाठी लढलेल्या या शूर योध्यास विनम्र अभिवादन!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.