आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दर विजयादशमीला पथसंचलनाचे व शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विजयादशमीच्या दिवशी १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरच्या मोहिते वाड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती.
दरवर्षी संघाच्या सर्वच शाखांमधे मोठ्या उत्साहात विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी शस्त्रपूजन, संचलन तसेच बौद्धिक कार्यक्रम आयोजित कऱण्यात येतात.
नागपूरात रेशीमबाग मैदानात हा उत्सव पार पडतो. या उत्सवाला संघांचे सरसंघचालक आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. सैनिक संघटनांमध्ये क्षत्रिय परंपरेनुसार विजयादशमीला शस्त्रपूजन करण्यात येते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत कठोर उपवास आणि व्रतवैकल्य केल्यानंतर विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजनाने विजयासाठी नवदुर्गांना विजयासाठी साकडे घालण्याची परंपरा आहे.
विजयादशमीच्या दिवशी दुर्गा व काली मातेच्या पूजनाची परंपरा हिंदू धर्मात प्राचीन काळापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारखे यो*द्धे विजयादशमीच्या दिवशी कुलदैवत असलेल्या आई जगदंबा भवानीला शस्त्रपूजन करून साकडे घालत. आई तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना विजयादशमीच्या दिवशीच तलवार भेट केल्याची एक आख्यायिका आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षी अत्यंत चैतन्यपूर्ण व धार्मिक वातावरणात शस्त्रपूजन करण्यात येते. या कार्यक्रमादरम्यान संघाकडून शस्त्र धारण करणे का गरजेचे आहे, यासंबंधित जनजागृती करण्यात येते.
राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांच्या नाशासाठी व स्वसंरक्षणासाठी शस्त्र जवळ बाळगणे, गरजेचे असल्याचे संघाचे मत आहे. शस्त्रधारी देवी देवतांच्या उपमा देत शस्त्र धारण करणे व बाळगणे हे प्रत्येक हिंदूंचे परमकर्तव्य असल्याचा सल्ला संघाकडून देण्यात येतो. संघाच्या शस्त्रपूजन कार्यक्रमादरम्यान भारतमातेच्या फोटोसमोर शस्त्रास्ते ठेवण्यात येतात.
एक एक करून संघ स्वयंसेवक व संघाचे वरिष्ठ पदाधिकारी या शस्त्रांना पुष्प अर्पण करतात व शस्त्रांपुढे नतमस्तक होऊन विजयाची व मातृभूमीच्या मांगल्याची कामना करतात.
शस्त्रपूजनाच्या वेळी शस्त्रांवर पवित्र गंगाजल शिंपडण्यात येते. महाकालीच्या स्तोत्रांचे पठण करण्यात येते. कुंकू, हळद अर्पण करून पूजन करण्यात येते. धूप, दीप जाळून सुगंधी वातावरणात मिष्ठान्नाचा भोग चढवण्यात येतो. शस्त्रपूजनानंतर संघाचे स्वयंसेवक त्या शस्त्रांचे प्रात्यक्षिक दाखवतात. शस्त्रपूजनाचा कार्यक्रम संपूर्ण दिवस चालतो.
जगद्जननी आई भवानीच्या दोन बहिणी जया विजया यांच्या नावावर विजयादशमी साजरी करण्यात येते. हा सण राष्ट्राच्या सुरक्षेसाठी व कायद्याच्या रक्षणासाठी शस्त्रांचा तसेच बुद्धीचा वापर करणाऱ्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. स्वरक्षणासाठी व समाजरक्षणासाठी शस्त्रपूजन करण्यात येते. विजया देवीचा शस्त्रांमध्ये वास असल्याची भावना बाळगून शस्त्रांना पुजले जाते.
नागपूरच्या रेशीमबागेत दरवर्षी पार पडणाऱ्या विजयादशमी उत्सवाला अनेक मान्यवर उपस्थित असतात. गेल्या काही वर्षांत रतन टाटा, कैलास सत्यार्थी आणि माजी राष्ट्रपती स्वर्गीय प्रणब मुखर्जी यांनी संघाच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपली उपस्थिती नोंदवली आहे.
संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी करण्यात आली. डॉ. केशव बळीराम हेडगेवार या काँग्रेसच्या कार्यकर्त्याने राष्ट्रभक्त नागरिकांची फौज उभी करण्यासाठी संघाची स्थापना केली होती. एक राष्ट्रप्रेमी समाज घडवणे संघाचे परम ध्येय आहे, असे सांगण्यात येते.
जेव्हा संघाची स्थापना केली त्यावेळी १७ लोक उपस्थित होते. संघाच्या स्थापनेनंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यता चळवळीत विशेष योगदान दिले नसले तरी स्वतंत्र भारतातील अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
१९७५ साली इंदिरा गांधीनी आणीबाणी लावल्यानंतर संघावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर संघाने इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे केले होते. १९७५ नंतर संघ वाढत गेला, आज संघाचे देशभरात १० कोटी कार्यकर्ते आहेत, जे त्यांच्या विविध उप संघटनांमध्ये कार्यरत आहेत. भारताचे पंतप्रधान देखील संघाचे स्वयंसेवक आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.