आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवून देणारे दोनच व्यक्तित्व आपल्याकडे झाले आहेत. एक आहेत महात्मा गांधी तर दुसरे आहेत रवींद्रनाथ टागोर, गांधींनी आपल्या अहिंसा व सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांनी जगभरातील तमाम नेत्यांना प्रभावित केले होते तर रवींद्रनाथ टागोरांनी आधुनिक विचार, कविता व राष्ट्रवादाची नवीन दृष्टी जगाला दिली. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोरांचे विचार कधी एकमेकांच्या विरोधात जायचे तर कधी एकमेकांना पूरक असायचे. टागोरांच्या राष्ट्रवादी विचारांची अजूनही भारतीय जनमानसावर पकड आहे. कवी, कथाकार, गीतकार, संगीतकार, निबंधकार, नाटककार आणि चित्रकार अशा असंख्य आयमानी टागोरांचे व्यक्तिमत्त्व आकारास आले होते.
रवींद्रनाथ टागोरांचा जन्म कोलकाता शहरातील जोडासांको ठाकूरवाडी या भागात झाला. त्यांना ‘गुरुदेव’ म्हणून देखील ओळखले जाते. टागोरांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे एक थोर समाजसुधारक होते. त्यांची इच्छा होती की रवींद्रनाथानी बॅरिस्टर व्हावे. टागोरांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिक्षण घेतले. लंडनमला जाऊन कायद्याचे शिक्षण घेतले, पण यशस्वीपणे आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आणि त्यामुळे ते डिग्री न घेता भारतात परतले.
बालपणापासूनच रवींद्रनाथ टागोरांना कविता आणि कथा लिहण्याची आवड होती. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांनी आपली पहिली कविता लिहली होती. १८७७ मध्ये १६ वर्षांच्या वयात टागोरांची पहिली लघुकथा प्रकाशित करण्यात आली. त्यांच्या ‘गीतंजली’ या कादंबरीला १९१३ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.
टागोरांना ब्रिटिश राजघराण्याने ‘नाईटहुड’ बहाल केले होते, पण जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांनी हा किताब परत केला.
१९२१ साली टागोरांनी ‘शांति निकेतन’ची स्थापना केली, आज याला ‘विश्व भारती’ युनिव्हर्सिटी म्हणून ओळखले जाते.
टागोर यांनी लिहलेली दोन गीते दोन राष्ट्रांनी अधिकृत राष्ट्रगीते म्हणून स्वीकारली आहेत. भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि बांग्लादेशचे राष्ट्रगीत ‘आमार सोनार बांग्ला’ दोन्ही रवींद्रनाथ टागोरांच्या रचना आहेत. इतकंच नाही श्रीलंकेचे राष्ट्रगीत ‘श्रीलंका माथा’ देखील टागोरांच्या कवितेची प्रेरणा घेऊन लिहिण्यात आले आहे.
श्रीलंकेचे राष्ट्रगीत लिहिणारे समरकून शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोरांसोबत वास्तव्यास होते. ते टागोरांच्या काव्य शैलीने प्रभावित झाले होते.
टागोर यांच्या रचनांना बांग्लादेशाच्या पुस्तकातून हटवण्याचा प्रकार घडला आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी बांग्लादेशने आपल्या पाठयक्रमात बदल केला तेव्हा त्यांनी टागोरांच्या मातृभूमीच्या सुंदरतेचे वर्णन करणाऱ्या ‘बांग्लादेशर हृदय’ या कवितेला पुस्तकातून हद्दपार केले होते.
बांग्लादेशने असं का केलं याचं उत्तर अजूनही मिळालेलं नसलं तरी याचा रवींद्रनाथ टागोरांच्या लोकप्रियतेवर तसूभर देखील परिणाम झालेला नाही. टागोरांची साहित्याकृती अभिजात होती, आहे आणि राहणार आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.