आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
इतिहासात हुकूमशहांची कमतरता नाही. रशियन झार राजे, जर्मनीचा हि*टल*र, इटलीचा मुसोलिनी, इराणचा अयातोल्ला खोमेनी, चीनचा माओ त्से तुंग अशा अनेक हुकूमशहांनी इतिहासाच्या पानांवर आपली काळी कृत्ये नोंदवली आहेत. ते मुळात शूर असतील, धोरणी असतील किंवा कुशल प्रशासक असतील तरी त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीने, आपले तेच खरे करण्याच्या स्वभावामुळे इतिहासात त्यांची नावे बदनामच आहेत. याच पंगतीतील एक नाव म्हणजे सालाझार.
कोण होता हा सालाझार?
ही कहाणी आहे जगातील एका असामान्य राजकीय व्यक्तीमत्वाची, ज्याने स्वतःचा स्पष्ट दिसणारा पराभव नाकारला आणि त्यासाठीच तो जागतिक इतिहासात प्रसिद्ध झाला.
अँटनिओ डी ऑलिव्हिरा सालाझार रूढी-परंपरावादी असला तरी त्याची कामगिरी खरोखरच ऐतिहासिक होती. त्याची पार्श्वभूमी अस्पष्ट असली तरी फक्त स्वबळावर त्याने अतुलनीय सामर्थ्य मिळवले. त्याच्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत पोर्तुगालची भूमिका जगाच्या नकाशावर उठून दिसत होती. त्याआधी पंधराव्या आणि सोळाव्या शतकात, म्हणजे शोधमोहिमांच्या काळातच पोर्तुगाल एक सामर्थ्यशाली राष्ट्र मानले जात होते.
सालाझारच्या मरणोत्तर पुन्हा कधीही पोर्तुगालला जागतिक राजकारणात पूर्वीची उंची गाठता आली नाही.
२८ एप्रिल १९२८ रोजी सालाझारनी अर्थमंत्री म्हणून प्रथमच उच्चपदाची सूत्रे स्वीकारली. त्यादिवशीचं त्याचं वक्तव्य होतं, “मला काय पाहिजे आहे आणि मी कोठे जात आहे हे मला चांगलेच माहित आहे, परंतु मी लगेचच लक्ष्य गाठायला हवे असा आग्रह धरू नका. अभ्यास, सूचना, आक्षेप आणि चर्चा या सर्वांचं स्वागत आहे, परंतु जेव्हा मी आदेश देईन तेव्हा ते पाळले जायलाच हवेत अशी माझी अपेक्षा असते”. हा त्याचा गर्व आयुष्यभर कायम राहीला.
आयुष्याच्या अगदी शेवटीही जेव्हा तो राजकारणाच्या पटावरून खरंतर अदृश्य झाला होता तेव्हाही तो पुन्हा पुन्हा म्हणत होता, “मी हे सगळं सोडून जाऊ शकत नाही, कारण हे सांभाळायला इथे इतर कोणीही नाही. ”
सालाझार कट्टर वसाहतवादी नेता होता. त्याच्या राज्यघटनेचा कुटुंबव्यवस्थेला पूर्ण पाठींबा होता, कारण त्याच्या मते, कुटुंबव्यवस्थेमुळे समाजातील रुढ आचारविचारांशी जुळवून न घेणाऱ्यांवर अंकुश राहतो. समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी अभिजन वर्ग आवश्यक आहे असा त्याचा दृढ विश्वास होता, म्हणून तो या वर्गाला उत्तेजन देत असे.
सरकारने उत्पन्नाची हमी देण्याऐवजी, लोकांनी उदरनिर्वाहासाठी स्वतः काम केले पाहिजे असे त्याचे स्पष्ट मत होते. कम्युनिस्ट तत्त्वप्रणालीचे वैशिष्ट्य असणारी आर्थिक असमानता, ही मानवतेच्या खोट्या संकल्पनेवर आधारित आहे यावरही त्यांचा विश्वास होता. पोर्तुगालचे उर्वरित जगाशी आणि विशेषत: महासत्तांशी असलेले नातेसंबंध ठरवण्यासाठी लागणारी निडरता त्याच्यात अनुवंशिक होती. त्याचा आत्मविश्वास, जागरूकता, चिकाटी, कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याचा चिवटपणा, हे गुण त्याला अनुभवातून नव्हे तर त्याच्या पालकांकडून आणि त्यांच्या संस्कारातून मिळाले होते.
प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ येणं महत्वाचं असतं. सालाझारचा उदय अशाच एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर झाला, जेव्हा पोर्तुगालला त्याच्यासारख्या पक्का निर्धार, दृढ विश्वास आणि संघटन कौशल्य असलेल्या नेत्याची नितांत गरज होती.
अवघ्या एका वर्षात त्याने देशात आर्थिक स्थैर्य आणलं. दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात युरोपमध्ये वणवा पेटलेला असताना देखील, सामर्थ्य, कावेबाजपणा आणि मुत्सद्दीपणा या गुणांच्या बळावर, पोर्तुगालला तटस्थ ठेवण्यात यश मिळवलं.
पण त्यानंतर परिवर्तनाचे वादळी वारे आले, त्यांना ओळखण्यात आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल करण्यात सालाझार अपयशी ठरला. सालाझारचा वसाहतवादी आणि वर्णद्वेषी दृष्टिकोन कधीच बदलला नाही. हा हुकूमशहा पोर्तुगाल आणि पोर्तुगालच्या आफ्रिकन आणि आशियाई वसाहतींच्या पलीकडे असलेल्या जगाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
गोवा, या भारतातील पोर्तुगीज वसाहतीबद्दल देखील त्याचे असेच गैरसमज होते. बहुसंख्य गोवेकर युरोपिअन वंशाचे आहेत अशी त्याला खात्री होती. १९५० च्या सुमारास गोव्यातील नागरिकांचा पोर्तुगीज वसाहत म्हणून रहाण्यास विरोध आहे, असे स्पष्ट इशारे मिळायला सुरुवात झाली होती. गोव्याबाहेरील, स्वतंत्र भारतातील, तब्बल २ लाख गोवेकर आणि प्रत्यक्ष गोव्यातील त्याच्या जवळ जवळ दुप्पट जनता, अशा दोन्ही बाजूंना गोव्याच्या स्वातंत्र्याचे वेध लागले होते.
गोव्याचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण, सहजपणे पॉन्डिचेरी पद्धतीने मतदान करून, शांततेत होऊ शकले असते. कारण एका गुप्त अहवालानुसार सालाझारला आधीच कळविण्यात आले होते की, पोर्तुगालच्या सर्व वसाहतींच्या तुलनेत गोवा सर्वात कमी “पोर्तुगीज” आहे. गोवा आणि पोर्तुगाल सतत एकमेकांकडे संशयाने बघतात. येथील लोकांना पोर्तुगीज भाषेबद्दल जराही आस्था नाही आणि पोर्तुगालशी संबंधित सर्वच बाबतीत ते उदासीन आहेत. पोर्तुगीजांचा गोवेकरांवर अतिशय मर्यादीत प्रभाव आहे. गोव्याबद्दल आपला खूपच भ्रमनिरास झाला आहे. परंतू पोर्तुगीज हुकूमशहाला हे समजण्यासारखे नव्हते.
त्याच्या म्हणण्यानुसार, “गोवा हा पुर्वेकडील भूमींवर पोर्तुगालचा प्रतिनिधी आहे आणि गोवेकरांना पोर्तुगीज सार्वभौमत्वापासून मुक्त होण्याची इच्छा नाही.”
भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळजवळ दशकभराने, नवी दिल्ली आता गोव्याच्या मुक्तीसाठी कठोर झाली होती. भारतीय राष्ट्रीय संरक्षण दलात अनेक गोवेकर अधिकारी होते, आणि ते आता प्रत्यक्ष कारवाईसाठी अधीर झाले होते. गोव्यामध्ये अहिं*सक मार्गाने केलेला विरोध बळ वापरून निष्ठुरपणे मोडला गेला, यामुळे स्थानिक लोक वसाहतीच्या कारभाराविरूद्ध आणखीनच ठाम उभे राहीले.
सालाझार अक्षरशः हास्यास्पद बनला. परंतु तरीही हा हट्टी, वृद्ध हुकूमशहा स्वतःबद्दलच्या गोड गैरसमजातून बाहेर पडायला तयार नव्हता.
जेव्हा भारतीय सैन्याने यु*द्धाची तयारी करण्यास सुरवात केली तेव्हा सालाझारला त्याच्या मंत्र्यांनी सांगितले की, आपण प्रतिकार करणे म्हणजे आत्मघात असेल आणि आपण यशस्वी होऊ शकणार नाही. पण त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि गोव्याच्या राज्यपालांना विमानतळ व पूल उ*द्ध्वस्त करण्याची सूचना केली. याशिवाय पणजीमधील ५०० वर्ष जुना राजवाडा, जो पोर्तुगीजांचे मुख्यालय म्हणून वापरात होता, तो नष्ट करावा आणि सेंट फ्रान्सिस झेवियरचे अवशेष लिस्बनला पाठवावेत असेही आदेश दिले.
गोव्याच्या राज्यपालांनी स्वतःचा विवेक वापरुन त्यापैकी काहीही केले नाही, परंतु त्याबद्दल त्यांना, पोर्तुगालला परत गेल्यावर वर्षानुवर्षे मानहानीला सामोरे जावे लागले. कारण सालाझारच्या संदेशानुसार पोर्तुगीज सैनिक एकतर विजयी ठरतील किंवा मृत्यू पत्करतील, परंतु शरणागती हा पर्याय त्यांना उपलब्ध नसेल.
अखेरीस १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यात भारतीय सैन्याला यश आले, आणि सालाझारचा भारताशी असलेला संबंध संपला. परंतु स्वतःचा स्पष्ट दिसणारा पराभव नाकारुन तो कायमचा हटवादी नेत्यांच्या ओळीत जाऊन बसला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.