आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
ब्लूमबर्ग बिलेनियार इंडेक्स या संस्थेद्वारे दरवर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली जाते. ब्लूमबर्गच्या २०२१च्या सर्वेक्षाणानुसार भारतातील उद्योजक गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत २६वे स्थान पटकावले आहे. दरवर्षी ही जी यादी प्रसिद्ध केली जाते त्यातील नावे तीच असली तरी बऱ्यापैकी त्यात कमी अधिक व्यक्तींची भर पडत असतेच.
पण, मध्ययुगीन काळात जेंव्हा राजेशाही होती तेव्हा जगातील सर्वात श्रीमंत राजेशाही कुठली किंवा जगातील सर्वात श्रीमंत राजे कोणते याचे सर्वेक्षण केले गेले असेल का? अर्थातच राजापेक्षा इतर कुणी श्रीमंत असणे तर शक्यच नव्हते.
जगाच्या एकूण संपत्तीतील २५% संपत्ती ही मुघल शासकांजवळ होती. मुघलांनी वस्तूकला, चित्रकला, साहित्य, संगीत, विणकाम अशा अनेक कलांना आणि कलाकारांना प्रोत्साहन दिले. ऐषोआरामी जीवनशैली ही त्यांची खास ओळख होती.
पण त्याकाळी सर्वात श्रीमंत समजले जाणाऱ्या या साम्राज्याकडे नेमकी किती संपत्ती होती?
युरोप साम्राज्यापेक्षाही यांच्याकडील संपत्ती कित्येक पटीने जास्त होती. यांच्या खजिन्यात बहुमुल्य रत्ने, मोती, माणिक होते.
मुघल साम्राज्याचा पाया रचणारा बाबर हा मुघालातील सर्वात क्रूर शासकांपैकी एक. संपूर्ण भारतावर राज्य करण्याच्या लालसेने त्याने भारतातील गोरगरीब जनतेची अतोनात लुट केली. त्यांना गुलाम बनवले. भारतीय संपत्तीची लुट करूनच त्यांनी आपल्या शाही खजिन्याची भर केली.
त्याच्यासोबत स्पर्धा करणाऱ्या इतर सत्ताधीशांना त्यांनी कुटनीतीने संपवले. भारतीय राजांना आपसात लढण्यास भाग पाडले. त्यांच्यातील बेकीचा फायदा घेऊन त्यांच्या खजिन्याची लुट केली.
भारतात बाबरने मुघल साम्राज्याचा पाया घातला. मुळचा उझबेकिस्तानचा शासक असलेल्या बाबरने आपल्या साम्राज्याचा विस्तारासाठी आजुबाजूच्या प्रदेशावर हल्ले करण्यास सुरुवात. त्याने केलेल्या प्रत्येक हल्ल्यात त्यालाच पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या युद्धात तर त्याला स्वतःचेच राज्य सोडून परांगदा होण्याची वेळ आली. बाबरचा पूर्वज असलेल्या तैमुर लंगने समरकंदच्या राजधानीची निर्मिती केली होती. त्याला या समरकंदवरही सत्ता मिळवायची होती. पण, त्याचे हे लक्ष्य पूर्ण झाले नाही म्हणून तो अफगानिस्तानकडे वळला. तिथे प्रचंड लुटालूट करून संपत्ती आणि सैन्य वाढवले.
भारतातही अमाप संपत्ती आहे याची त्याला खबर लागली होती. आणि भारतातील याच संपत्तीवर डोळा ठेवून त्याने भारतात हल्ले करून, लुटालूट करण्याची योजना आखली. भारतातील सत्ता आपण हस्तगत करू आणि भारतावर राज्य करू असा तर त्याचा मनसुबा नव्हता. पण, भारतात आल्यावर त्याला इथल्या संपत्तीची, इथल्या वातावरणाची, अशी काही भुरळ पडली की त्याने भारतातून आपले बस्तान हलवलेच नाही. आणि मुघल भारताचे सम्राट बनले.
बाबरने भारतात प्रवेश करण्यासाठी आजूबाजूच्या छोट्या परगण्यांवर हल्ला केला आणि तिथे आपली सत्ता स्थापन केली. पुढे पानिपतच्या मैदानात त्याची गाठ पडली नाकर्त्या इब्राहीम लोदीशी. या युद्धात त्याला विजय तर मिळालाच पण त्यासोबत प्रचंड मोठ्या प्रदेशाची सत्ता, संपत्ती, सैन्यदलही मिळाले. त्याने सर्वत्र प्रचंड लुट माजवली होती.
पूर्वीही त्याने अनेक प्रदेशांत अशीच लुटालूट केली होती मात्र यावेळी त्याच्या हाती जी संपत्ती लागली तितकी संपत्ती त्याला इतरत्र कुठेही मिळाली नसती.
त्याने लुटलेल्या खजिन्यात अनेक रत्ने, माणिक, मोती, गोमेद, हिरा, पन्ना, फिरोज, पुष्कराज, अशा सगळ्या मूल्यवान वस्तू होत्या. बाबरने आपले नातेवाईक, त्याच्या बहिणी, बेगम, मुले, सरदार इतकेच काय त्याच्या दास-दासींमध्ये या खजिन्यातील संपत्ती वाटली होती.
हुमायुनचा मुलगा राजा अकबर याच्याकडे जगातील एक चतुर्थांश संपत्ती होती. अकबरने मुघल साम्राज्याचा विस्तार केला. भारताचा खूप मोठा भूभाग त्याच्या अधिपत्याखाली होता. त्याच्या काळात भारतातील एकूण घरगुती उत्पादन हे युरोपच्या साम्राज्यइतकेच होते. इतिहासाचा आर्थिक दृष्टीने अभ्यास करणारे मॅडिसनच्या मते मुघल काळात भारतातील दरडोई उत्पन्न हे त्या काळातील इंग्लंड आणि फ्रांसमधील दरडोई उत्पन्नाच्या बरोबरीचे होते.
मुघलांचे राहणीमान अत्यंत उच्च दर्जाचे होते. मुघलांची जीवन शैली ही युरोपियन राजघराण्यातील लोकांपेक्षाही महागडी होती. मुघलांच्या शाही आणि ऐषोआरामी राहणीमानाच्या युरोपचे शाहीघराणे बरेच मागे होते.
युरोपचे व्यापारी जेव्हा भारत दौऱ्यावर आले तेव्हा मुघलांचे राजवाडे, महाल, त्यांची दौलत पाहून त्यांचे डोळे दिपून गेले.
आर्थिक इतिहासतज्ञ मॅडिसनच्या मते, मुघलांच्या दरबारातील भिंती, महाल, बागबगीचे, त्यातील कारंजे, साहित्य आणि चित्रकला या सर्वांचा दर्जा अनोखा होता. ही सगळी कलाकौशल्ये खूपच प्रगत आणि प्रभावी होती. अकबरच्या काळापासून ते शहाजहानच्या काळापर्यंत मुघल दरबार हा जगातील सर्वात मोठा आणि अलिशान दरबार होता. शिवाय, अकबर आणि शहाजहानच्या काळातील मुघलसाम्राज्यात सर्वधर्मसमभावाचाही अनुभव येत होता.
साहित्य आणि चित्रकलेची भरपूर प्रगती झाली होती. आग्रा, दिल्ली, फतेहपूर सिक्री, लाहोर अशा ठिकाणी भव्यदिव्य महाल आणि मशिदी बांधल्या गेल्या होत्या. या वस्तूंच्या भिंती निरनिराळ्या रंगांनी सजवण्यात आल्या होत्या. बगीचेही विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी समृद्ध होते. त्यात आकर्षक कारंजे होते. शाही घराण्यात नोकर-चाकारांचा बराच मोठा राबता होता.
मुघल शासक रेशीम आणि सुती धाग्यापासून बनवलेले वस्त्र वापरत. त्यांची कपडे देखील बारीक कलाकुसर केलेली असे. या कपड्यांवरूनही त्यांची श्रीमंती झळकत असे.
इसवी सन १००० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था मजबूत होती. जागतिक स्तरावरील एकूण घरगुती उत्पादनात भारताचा वाटा २८.०९% इतका होता. हा काळ भारताच्या आर्थिक भरभराटीचा आणि समृद्धीचा काळ होता.
१८व्या शतकात भारताची अर्थव्यवस्था चीनपेक्षाही पुढे होती. स्वतः एंगस मॅडिसनने आपल्या पुस्तकात याचा उल्लेख केलेला आहे.
शहाजहानने आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मृती जपण्यासाठी जो ताजमहाल बांधला त्यासाठी त्याकाळी ५० लाख रुपये इतका खर्च आला होता. शहाजहानचा पूर्वज जहांगीरने आपल्या राजघराण्यात भरपूर संपत्ती जमा करून ठेवली होती म्हणूनच शहाजहान अशा महागड्या वस्तू उभारू शकला.
शहाजहानच्या काळातील रुपयाची किंमत आजच्या रुपयापेक्षा ५०० पटीने अधिक होती. याची नोंद बँक ऑफ इंग्लंडकडे आढळते.
जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा जो आज ब्रिटनच्या महाराणीच्या मुकुटात विराजमान आहे तो कधीकाळी मुघालांच्या मयूर सिंहासनाचा भाग होता. हे सिंहासनदेखील मुघल काळातील एक सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. या सिंहासनासाठी त्याकाळात एक कोटी रुपये खर्च झाले होते. ज्याची किंमत आज अब्जावधी रुपयापेक्षा जास्त आहे.
भारतातील या भरघोस संपत्तीनेच ब्रिटीशांच्याही तोंडाला पाणी सुटले त्यांनी संपूर्ण भारताला आपला गुलाम केले आणि या संपत्तीची लुट करत राहिले. हळूहळू ही समृद्धी ओसरत गेली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.