आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
या जगात विविध सभ्यता अस्तिवात आल्या आणि काळाच्या पडद्याआड झाल्या. ह्या सभ्यतांमध्ये जे वाद व्हायचे ते सर्वांत आधी ते गुर आणि जनावरांवरून. नंतर जशी या सभ्यतांची प्रगती झाली मग युद्ध व्हायला लागली जमिनीवरून, मग काही काळानंतर सोन्यावरून , आणि आता थेट इंधनावरून. या जगात 3 गोष्टी अशा आहेत ज्यांचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच जाणार ते म्हणजे तेल, जमीन, आणि सोनं.
17व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली आणि या जगातली सगळी समीकरणे बदलू लागली. युरोपियन देशाने ज्या समुद्री सफरी केल्या त्याचं लक्ष हे नुसतं वसाहतवाद नव्हतं तर त्या त्या नवीन भागातील नैसर्गिक साधन संपत्तीवर आपला हक्क मिळवणं हे होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर तर सोन्याला आणि तेलाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं. आजही सगळ्या देशांच्या धोरणात त्या देशाचं ऊर्जा विषयक धोरण हे महत्त्वाचं असतं. कारण नवीन तंत्रज्ञान हे ऊर्जेवर अवलंबून आहे. एखाद्या राष्ट्राची भौतिक प्रगती ही त्याच्याकडे असलेल्या साधन संपत्ती, ऊर्जा स्रोतांवर अवलंबून आहे.
पण ही सगळी भौतिक प्रगती साधताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला. जागतिक तापमानात वाढ होऊ लागली, त्यामुळे निसर्गामध्ये भरपूर बदल झाले. ह्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे मानवाला त्सुनामी सारख्या आपत्तींना सामोरं जावं लागलं. पण शेवटी माणूस भानावर आला आणि त्याने पर्यावरण रक्षणासाठी योग्य पाऊलं उचलायला सुरुवात केली. मग ती रामसार परिषद असो, व्हिएन्ना परिषद असो, क्योटो प्रोटोकॉल, मॉंटरियल प्रोटोकॉल अशा बऱ्याच गोष्टी येतात.
पण काहीवेळा नुसतं औद्योगिकीकरणामुळे नाही तर माणसाच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. आता सध्या पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढले आहेत. ज्या देशात या पेट्रोल डिझेल चे स्रोत आहेत ते त्याचं उत्पादन करतात व ज्यांच्याकडे असे स्त्रोत नाहीत ते पेट्रोल-डिझेलची आयात करतात.
पण या तेल व्यवसायामुळे निर्माण झालेलं अजून एक संकट म्हणजे तेल गळती. तेल गळती म्हणजे समुद्र किंवा नदीच्या पृष्ठभागावर तेल सांडणे.
आता ही तेल गळती नेमकी होते तरी कशी?
कच्चं तेल हे एकतर तुम्हाला जमीनीखाली सापडतं नाहीतर समुद्रात सापडतं. तेलाच्या साठ्याचे खणन करताना मानवी चुकीमुळे तेलाची गळती समुद्रामध्ये होते, व हे तेल सागरी वातावरणात द्रव पेट्रोलियम हायड्रोकार्बनच्या रूपाने पसरले जाते. आता ही तेल गळती फक्त खणन करताना होते का ? तर नाही, जे कच्च तेल समुद्रातून काढलं जातं त्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्या तेलाला मालवाहू जहाजातुन पाठवलं जातं आणि त्यावेळी मानवी निष्काळजीमुळे तेल गळती होते. आणि ही तेल गळती काही साधीसुधी घटना नसते, लाखो लिटर बॅरल तेलाचा थर हा मैलोनमैल पसरतो आणि मग सुरू होते संकटांची न संपणारी मालिका.
आता ह्या तेल गळतीमुळे पर्यावरणातल्या सर्वच घटकांवर त्याचा परिणाम होतो. समुद्राजवळ राहणारे किंवा समुद्रावर ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे अशा काही स्थानिक समुदायांच्या आरोग्याला बाधा पोहोचते. तेल गळतीमुळे समुद्राच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा तवंग तयार होतो ज्यामुळे सूर्यप्रकाश समुद्राच्या पाण्यात नीट प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे समुद्री वनस्पतींची वाढ होत नाही. आणि ज्या भागात ही तेल गळती होते तेथील वनस्पती प्रदूषित होतात व अशा प्रदूषित वनस्पतींचे सेवन केल्याने अनेक जलचर मरण पावतात.
तेल गळतीमुळे समुद्राच्या पाण्यात असलेल्या ऑक्सिजनची पातळी कमी होते ज्यामुळे जलचर मरण पावतात. तेल गळतीमुळे समुद्रातले सस्तन प्राणी हायपोथर्मियामुळे मरण पावतात. एकंदरीत तेल गळतीमुळे जलचर अधिवासातील(Aquatic Habitat)मधील प्रजनन दर कमी होऊन सृष्टीचे संतुलन बिघडते.
आता या तेलगळतीचा परिणाम मानवी जीवनावर ही होतो. समुद्रालगत असलेले जे देश ज्यांची अर्थव्यवस्था मुख्यतः सागरी पर्यटन व व्यावसायिक मासेमारीवर चालते अशा लोकांना या तेल गळतीचा मोठा फटका बसतो.
आता ही तेल गळतीची पहिली घटना आहे का? तर नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही तुम्हाला तेल गळतीबद्दल एवढं का सांगतोय?
याचं कारण असं की नुकतीच पेरू या देशात तेल गळती झाली, व ही तेल गळती एवढी भीषण होती की पेरू देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पर्यावरण आणीबाणी घोषित करावी लागली. आणि या तेल गळतीमुळे सर्वात जास्त धोका निर्माण झाला आहे तो म्हणजे हम्बोल्ट पेंगविन या पेंगविनच्या प्रजातीला.
आता पेंगविन म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते दक्षिण ध्रुवावर राहणारे काळे पक्षी. पण पेरू तर दक्षिण अमेरिकेतील देश मग तिथे हे पेंगविन कसे ? तर हम्बोल्ट पेंगविन हे मध्यम आकाराचे असतात. ते पॅसिफिक महासागराच्या चिली व पेरू या देशांच्या किनारपट्टीवर आढळून येतात. पॅसिफिक महासागरात वाहणारा हम्बोल्ट करंट नावाचा समुद्री प्रवाहाच्या सोबत हे पेंगविन येतात त्यामुळे त्यांना हम्बोल्ट पेंगविन असे म्हणतात. इतर पेंगविनना वास्तव्य करण्यासाठी थंड हवामान लागतं पण हे हम्बोल्ट पेंगविन गरम व दमट प्रदेशात राहू शकतात. हम्बोल्ट पेंगविन चा प्रजनन काळ हा मार्च एप्रिल व सप्टेंबर ऑक्टोबर हा असतो.
आता ही तेल गळती थांबवता येऊ शकते का? तर हो! जैवोपचार पद्धतीने तेल गळती थांबतवता येऊ शकते. अजून एक पद्धत आहे ती म्हणजे स्किमर वापरून. स्किमर हे एक प्रकारचे लोखंडी गुऱ्हाळ असते. या गुऱ्हाळात विशिष्ट प्रकारच्या अल्युमिनियमचा उपयोग केला जातो. तेल पाण्यापासून वेगळे होऊन या अल्युमिनियमला चिकटते व विशिष्ट वाहिनीद्वारे एका टाकीत साठवले जाते व नंतर नष्ट केले जाते.
तेल गळतीमुळे मानवाच्या व प्राणिमात्रांच्या जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसतो. भौतिक प्रगती ही गरजेची आहे पण ती प्रगती साधण्यासाठी जी धोरणं अमलात आणली जातात ती जर पर्यावरणपूरक असतील तर कुठे हा निसर्ग व त्याचा विविधतेचे रक्षण होईल. तेल गळती नंतरच्या उपाययोजना करण्यापेक्षा तेलाचा साठा मुबलक असल्याने तेल वाया जाऊ नये या दृष्टिकोनातून नैसर्गिक आणि मानवनिर्मित अपघात टाळता येण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे जास्त शहाणपणाचं ठरेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.