आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक महिलांनी आपले योगदान दिले आहे, हे आपण जाणतोच. पण, त्या सर्वांचेच कार्य आपल्यापर्यंत पोहोचत नाही. काही नावे इतिहासाच्या पानांतच कैद होऊन राहतात. यात काही महिला अशाही होत्या ज्या जन्माने भारतीय नव्हत्या तरीही त्यांनी भारतीयांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्रयत्न केले. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान दिले इतकेच नाही तर भारतीय स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास देखील सोसला.
अॅनी बेझंट, भगिनी निवेदिता याच स्त्रियांच्या यादीतील आणखी एक आदरणीय नाव म्हणजे नेली सेनगुप्ता.
नेली सेनगुप्ता जन्माने ब्रिटीश होत्या. त्यांच्या जन्म इंग्लंडमध्ये झाला, त्यांचे शिक्षणही तिथेच झाले. त्या भारतीय नव्हत्या तरी भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी कारावास भोगला. अशा व्यक्तीबद्दल आणि तिच्या कार्याबद्दल अनभिज्ञता बाळगणे कृतघ्नपणाचे ठरेल.
जन्माने ब्रिटीश असूनही आजन्म भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेलीचे खरे नाव होते, एडिथ एलेन ग्रे. कॉलेजात शिकत असताना एडिथची ओळख भारतातून वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या जतींद्र मोहन सेनगुप्ता या बंगाली तरुणाशी झाली. जतींद्र यांचे वडील मोहन सेनगुप्ता हे बंगालमधील एक प्रतिष्ठित वकील आणि बंगाल विधान परिषदेचे सदस्य होते.
एडिथ आणि जतींद्र दोघांचीही कौटुंबिक, संस्कुतिक, राष्ट्रीय, राजकीय पार्श्वभूमी अगदी भिन्न होती. परंतु, एडिथला जितेंद्र यांच्यावर पूर्ण विश्वास होता. एडिथच्या आई-वडीलांनी मात्र तिच्या या निर्णयाला विरोध केला. आई-वडिलांच्या विरोध डावलून तिने १९०९ साली जतींद्र यांच्याशी विवाह केला आणि जतींद्र यांच्या एकत्र भारतीय कुटुंबात एडिथने प्रवेश केला.
परदेशात वकिलीचे शिक्षण घेतलेले जतींद्र एक यशस्वी वकील होते. १९११ साली पार पडलेल्या बंगाल प्रांतीय परिषदेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते.
१९२१ साली जेव्हा देशात असहकाराचे वारे सुरु झाले तेव्हा या दांपत्याचे जीवन पुरते बदलून गेले. गांधीजींनी असहकाराचे आवाहन केल्यानंतर तरुण जतींद्र यांनी वकिलाची ऐषोआरामाची नोकरी सोडली आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला.
एक सहधर्मचारिणी बनून नेलीने जतींद्र यांच्या या निर्णयाला फक्त पाठींबाच नाही तर कृतीशील सहभाग घेत प्रोत्साहन दिले. जतींद्र हे महात्मा गांधींचे अत्यंत जवळचे अनुयायी होते. आसाम-बंगाल रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलानात सहभाग घेतल्याबद्दल इंग्रजांनी जतींद्र यांना अटक केली. जतींद्र रेल्वे कामगार संघटनेचे आणि बर्मन ऑईल कंपनीचे अध्यक्ष होते. जतींद्र यांना अटक झाल्यानंतर नेलीने स्वतः पोलिसांविरोधात आंदोलन सुरु केले.
आपल्या पतीला अटक केल्याबद्दल तिने ब्रिटीश पोलिसांचा निषेध नोंदवला आणि ठिकठिकाणी सभांचे आयोजन केले. परंतु जिल्हा अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या सभा भरवण्यास बंदी घातली होती. नेली यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या रोषाला बळी पडली.
खादीच्या विक्रीवर ब्रिटिशांनी बंदी घातली असतानादेखील नेली स्वतः घरोघरी जाऊन खादीची विक्री करत असे. नेली आणि तिच्यासारख्याच धाडसी महिलांच्या कामाने ब्रिटीश सरकार हादरून गेले होते.
त्यांनी १९३१ साली नेलीला अटक केली. नेलीने जेलमधील आपले भयानक अनुभव सांगताना जेल हे एक गलिच्छ ठिकाण असल्याचे म्हटले. कैद्यांच्या वंशावरून त्यांना भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचे पाहून तिला प्रचंड खेद वाटला. फक्त पतीला अटक झाली म्हणून तिने स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला असे नाही तर, तिच्यात चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याची क्षमता होती.
जेलमधले आपले अनुभव लिहिताना नेली म्हणते, “एकदा मी आजारी पडले. माझी प्रकृती तपासण्यासाठी डॉक्टर माझ्या बेडरूममध्ये आले तेव्हा सिनियर जेलर तिथेच उभा राहून माझ्याकडे टक लावून पाहत होता. त्याच्या या वागण्याने मी खजील झाले होते.”
रांचीच्या जेलमध्ये असतानाचा १९३३ साली जतींद्र यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर नेली स्वातंत्र्य संग्रामातील आपला सहभाग कमी करेल अशी कल्पना अनेकांनी केली असेल पण, नेलीने आपला लढा तितक्याच जोरकसपणे सुरु ठेवला.
स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी ब्रिटीशांचे हरेक प्रयत्न सुरु असताना, त्यांच्याच देशातील एक स्त्री मात्र स्वदेशी चळवळीचा जोरात प्रचार आणि प्रसार करत होती. खादीच्या खरेदी विक्रीला प्रोत्साहन देत होती. लोकांनी ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार टाकावा आणि स्वदेशी वस्तू स्वीकाराव्यात म्हणून नेली स्वतः पुढाकार घेऊन घरोघरी अशा वस्तू पोहोच करत असे.
मिठाच्या सत्याग्रहावेळी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय यांना देखील अटक झाली होती. अशावेळी कलकत्ता येथील कॉंग्रेस परिषदेचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा या जबाबदारीसाठी नेली स्वतःहून पुढे झाली. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या ४७व्या अधिवेशनासाठीचे अध्यक्षपदासाठी नेलीची निवड करण्यात आली. १९३३ साली ही परिषद कलकत्त्याला पार पडली. सन १९४० आणि १९४६ मध्ये ती बंगाल विधानसभेची देखील सदस्य होती.
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि सोबत फाळणीही. फाळणीच्या वेळी नेलीने आपल्या पतीच्याच गावी चटगावला राहणे पसंद केले. बंगालचा हा भाग त्यावेळी पूर्व पाकिस्तानमध्ये मोडत होता. तिथेही त्यांनी आपले समाजकार्य सुरुच ठेवले. अल्पसंख्याक बोर्डाच्या सदस्य या नात्याने तिने अल्पसंख्याक लोकांसाठी काम करणे सुरू ठेवले.
१९७२ साली म्हणजे स्वातंत्र्याच्या तब्बल दोन दशकानंतर भारतात आली तेव्हा एका अपघातात तिच्या हाडांना दुखापत झाली होती. त्यावेळी इंदिरा गांधीनी तिला बोलावून घेऊन तिच्या उपचारांची व्यवस्था केली होती. नेली भारतात आली तेव्हा तिचे जंगी स्वागत करण्यात आले होते. १९७३ साली भारत सरकारने तिला पद्म विभूषण देऊन तिचा गौरव केला.
नेलीचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हे योगदान अविस्मरणीय आहे. तिच्या लढाऊ आणि सत्यप्रिय, न्यायप्रिय बाण्यामुळे ती सदैव आपल्यासमोर एक प्रेरणास्त्रोत बनून राहील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.