आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कुन्नूर, तामिळनाडू.
नीलगिरी पर्वतरांगेच्या कड्यांच्या शेजारी वसलेलं एक छोटं हिल स्टेशन. आजूबाजूला केवळ चहाचे मळे आणि सोबतीला फक्त जंगलातून नागमोडी वळणं घेत जाणारी नीलगिरी माऊंटन रेल्वे. अत्यंत दुर्गम भाग. या भागात गाडी तर सोडाच, पण सायकलही आणणंही महाकठीण काम.
नाही म्हणायला इथे वनवासी आणि चहाच्या मळ्यांत मजुरी करणाऱ्या लोकांची विरळ वस्ती आहे. पण तेवढंच. ना आलिशान बंगले ना मोठे रस्ते आणि ना त्यावरून चालणाऱ्या ब्रँडेड गाड्या. चहाच्या मळ्यातून येईल तेवढंच उत्पन्न. अशा ठिकाणी कोणाची बदली झाली तर एक आठवडाही टिकणार नाही अशी अवस्था.
आता जिथे राहण्याचे आणि खाण्यापिण्याचेच वांधे आहेत तिथे संपर्काची साधनं कुठून उपलब्ध असणार. बाहेरगावच्या कोणाशी संपर्क साधायचा म्हणजे एकच मार्ग. पत्राचा. पण, इतक्या दुर्गम भागात पत्र पोहोचवणं हे कल्पनेपलीकडचं काम. जवळजवळ अशक्यच.
तर, अशा या वस्तीत रोज एक सावळा, अर्धवट पांढरी दाढी वाढलेला माणूस यायचा. त्यांचा पोस्टमन. तोच तिथल्या स्थानिकांचा बाहेरगावच्या लोकांशी संपर्क साधण्याचा मार्ग. त्याचं नाव आहे डी. सिवन.
हिलग्रोव्ह पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पत्र घ्यायची. रोज 15 किलोमीटर पहाड चढून, पुढं नीलगिरी रेल्वे ट्रॅकवरून पायपीट करून ती पत्र पोहोचवायची. हा याचा नित्यक्रम.
मग, वाटेत कधी हत्ती मागं लागायचे, तर कधी अस्वलं. वाटेत लागणारा बोगदा अंधारात पार करून, प्रत्येक पावलावर जंगली प्राण्यांपासून संरक्षण करत घसरड्या आणि वाटेत लागणाऱ्या कित्येक झऱ्यांतून वाट काढायची आणि बुरिलियारजवळच्या सिंगार एस्टेटवरील आणि जंगलात राहणाऱ्या बागान मजुरांपर्यंत पत्र पोहचवायची.
दर आठवड्याला तो सरासरी 3 पत्र बुरीलीयार आणि मराप्पलम या भागातील वस्त्यांमध्ये पोहोचवायचा.
बर हे असं एक-दोन दिवस, एक-दोन वर्षं नाही, तर तब्बल 30 वर्ष.
आपली ही 30 वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून वयाच्या 65व्या वर्षी डी. सिवन मागच्याच आठवड्यात निवृत्त झालेत. निवृत्त होताना त्यांना पगार किती होता? तर फक्त, 12 हजार रुपये महिना. पण त्यांची नीलगिरी पर्वतरांगेशी दोस्ती अशी की या 30 वर्षांच्या सेवेत ना कधी कमी पगाराची तक्रार, ना कधी बदलीसाठी अर्ज.
पण गेल्या काही वर्षांपासून येणाऱ्या पत्रांची संख्या घटली आहे. अनेक लोकांनी या जंगलातून स्थलांतर करण्याची वाट काढलीये. जवळच्या कुन्नूर, मेट्टूपालयाममध्ये राहत आहेत.
काही दिवसांपूर्वी असाच एक माणूस इथून कोईम्बतूरला स्थलांतरित झाला होता. डी. सिवन दर महिन्याला त्यांना पेन्शन घरी पोच करत. एक दिवस तो माणूस खूप आजारी पडला, आणि त्याला पैशांची उणीव भासू लागली. हे समजल्यावर सिवन यांनी त्या माणसाला स्वतःच्या पदर खर्चानं शहरात हॉस्पिटलमध्ये जाऊन शोधून काढलं, आणि पेन्शन सुपूर्त केली.
आता सेवा संपल्यावर रिटायर होण्याबद्दल त्यांना विचारल्यावर ते सांगतात, “हे काम माझ्या आवडीचं होतं. या कामातून मला आनंद मिळायचा आणि शेवटपर्यंत मी हे काम करतच राहणार आहे.”
सगळ्या सुखसुविधा असणाऱ्या, गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या, खोटी सिक लीव घेणाऱ्या कोणाला कामात आनंद मिळत नसेल किंवा आपल्या कामात समर्पण नसेल, तर ते समर्पण आणि कामातला आनंद विकत जर विकत घेता आला, तर नक्की घ्यावा. कुन्नूर जवळच्या नीलगिरीच्या दऱ्याखोऱ्यांतून, फक्त 12 हजार रुपयांत.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.