आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
लेखक-सागर कळसाईत
कोलंबस भारताचा शोध घेण्यासाठी निघाला आणि अमेरिकेत जाऊन पोचला. पण समुद्रमार्गाने अमेरिकेत कसं जायचं हे त्याने सगळ्या जगाला त्यावेळी दाखवून दिलं. अशी किती तरी माणसं समुद्रप्रवास करून नव्या जगाचा शोध लावू पाहत होते; पण त्यातले बरेच भटकले, बरेच समुद्रातच विलीन झाले. बऱ्याच लोकांना समुद्री वादळाशी झुंज देणं जमलं नाही. पण कोलंबस मात्र त्या प्रवासात येणाऱ्या सर्व अडचणींना तोंड देऊन किनारा गाठू शकला. त्यामुळे त्याचं नाव आजही जगाला माहीत आहे.
आज अशाच एका झुंजारवादी व्यक्तीविषयी बोलावंस वाटतंय.
चपराक प्रकाशनचे संपादक- घनश्याम पाटील सर!
त्यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं एक जबरदस्त पुस्तक ‘दरवळ’ मिळालं. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुस्तक मिळण्यासाठी थोडा उशीर झाला पण जसं पुस्तक हातात घेतलं तसं सोडावसं वाटलं नाही.
कडू औषध आपण पटकन गिळून टाकतो आणि गोड चॉकलेट मात्र निवांत चघळत खातो. ‘दरवळ’ वाचताना मन अधिर होतं, सुरुवातीला खूप पटपट वाचून काढावं वाटलं. पण ‘दरवळ’मधील चौथाच लेख, ‘धोका प्रतिक्रियावाद्यांचा’ वाचला आणि थोडा थांबलो.
सरांनी यात म्हटलं आहे की, “अभिव्यक्तीच्या नावाखाली आपण फक्त प्रतिक्रियावादीच झालोय.” कोणतीही गोष्ट अर्धवट ऐकायची, वाचायची, पहायची आणि लगेच आपली मतं मांडायची यामुळे जो धोका निर्माण झाला आहे तो किती टोकाचा असू शकतो याची दखल सरांनी घेतली.
मत कोणतंही असो, चांगलं किंवा वाईट ते मांडण्याआधी त्यामागची आपली जबाबदारी आपल्याला समजायला हवी, आणि मग मात्र ‘दरवळ’ वाचनाची अधिरता थांबवून एक-एक लेख नीट वाचत गेलो, त्यावर चिंतन-मनन करत गेलो.
अगदी सहज आणि सोप्या, तितक्याच परखड भाषेत सरांनी बऱ्याच विषयांवर प्रकाश टाकला आहे. एकीकडे फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्तेविषयी बोललं जातं, निसर्गाला, सरकारला, पूर्ण यंत्रणेला दोष दिला जातो पण त्यासाठी उपाययोजनेवर कोणीच बोलत नाही. सरांनी ‘आजार रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला’ या लेखामधून तेच उपाय मांडले आहेत.
देशभक्ती म्हणजे खूप मोठे शब्द न वापरता ‘स्वतःच्या बायकोला ओळख देणं ही सुद्धा देशभक्तीच ठरावी!’ असं म्हटलं आहे. हे वाक्य सहज वाटत असलं तरी गांभीर्याने लक्ष दिलं तर त्यामागे स्त्रिचा आदर लपला आहे.
‘कशासाठी? भुकेसाठी?’ हा लेख अप्रतिम झाला आहे. भूक म्हणजे काय? यावरचा अभ्यास आणि त्याचं केलेलं स्पष्टीकरण वाचून माणूस विचारात पडल्याशिवाय राहात नाही.
कोरोना व्हायरसने घातलेलं थैमान बघून पुण्यातून जेव्हा कुरियरने पुस्तक घरी पोहोचलं तेव्हा त्यावर सैनिटायजरचा फवारा करण्यात आला होता. पण ‘दरवळ’ वाचून झाल्यावर वाटलं की माझ्या मनावर, विचारांवर काही विषाणू बसले असतील तर ते खऱ्याअर्थी सरांच्या लेखणीमुळे दूर झाले. दरवळमधील प्रत्येक लेख त्यावर चिंतन आणि मनन करण्यास भाग पाडतो.
‘उमलत्या अंकुरांना बळ द्या’ या विचारातून मला स्वतःला नव्याने काही लिहण्याची प्रेरणा मिळाली. एकीकडे समाजातील कोणत्याही व्यक्तीविषयी सडेतोडपणे लिहायला सर घाबरत नाहीत तसंच त्याच व्यक्तीच्या चांगल्या कामाबद्दल त्याचं कौतुक करण्यातही कमी पडत नाहीत. कोणतेही व्यक्तिगत द्वेष-मोह न ठेवता तठस्थपणे विचार मांडणारा व्यक्ती सापडणे दुर्मिळच!
गेली सहा-सात वर्षात सरांसोबत राहून जे काही शिकलो ते अतुलनीय आहे. सरांचा संघर्ष, त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर धाडसाने मात करण्याची जिद्द जवळून पाहिली आहे. तसा त्यांचा हा संघर्ष त्याही आधीपासूनचा! स्वभावात विनम्रता, विचारात व्यापकता-कार्यात तत्परता आणि सर्वांनाच जमेल तशी मदत करण्याची वृत्ती या माणसात पाहायला मिळते.
म्हणतात ना, गुरु तो जो अज्ञानाचा अंधकार दूर करतो, तो जो आपल्यातील सामर्थ्याची जाणीव करून देतो. तो जो ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखवतो आणि त्या मार्गावर वेळोवेळी साथही देतो.
आज ‘दरवळ’ वाचून मला खात्री झाली की साहित्य क्षेत्रातला मला माझा ‘गुरु’ मिळाला. इथून पुढचा माझ्या लेखणीतून निघालेला प्रत्येक शब्द सर्वप्रथम घनश्याम पाटील सरांना अर्पण असेल!
घनश्याम पाटील सर तुमच्या विचारांचा, कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळत राहो.
“दरवळ” लेखसंग्रह खालील लिंकवर उपलब्ध-
https://shop.chaprak.com/product/darval
(घनश्याम पाटील यांचा संपर्क क्रमांक- 7057292092)
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.