आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
देश स्वतंत्र झाल्यावर तत्कालीन भारत सरकार समोर धान्याची उपज वाढवण्याचे मोठे आव्हान होते. यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू सतत मेहनत घेत होते. त्यांनी आपल्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी असलेल्या बगिच्यात अन्नधान्याच्या पिकांची लागवड केली होती. यासाठी त्यांनी पंतप्रधान निवासाची बाग उखडून टाकत त्या ठिकाणी शेती करायला सुरुवात केली होती.
२० जुलै १९४९ रोजी नेहरूंनी आपल्या प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, “अन्नधान्याच्या अधिक उत्पन्नासाठी दिल्लीत यासाठी जेवढी जमीन अत्यावश्यक आहे, तितकी जमीन उपयोगात आणता आली पाहिजे. दिल्लीत असे अनेक कंपाउंड आहेत, जिथे शेती करणे सहज शक्य आहे. तुम्ही कृपया या कामासाठी इस्टेट विभागाशी चर्चा करून यावर लवकरात लवकर कार्यवाही करायला सांगा. दिल्लीत फुल उगवले नाहीत तरी हरकत नाही, पण कुठल्याही परिस्थितीत दिल्लीत खाद्यान्न उगवायला हवं.
हे जाहीर आहे की यासाठी सद्यस्थिती बघता उपलब्ध संसाधनांचा विचार करावा लागेल. गव्हर्नर जनरल यांनी आधी गव्हर्नमेंट हाऊसच्या माध्यमातून एक चांगलं उदाहरण समोर ठेवलं आहे. सर्व मंत्री आणि सरकारी अधिकारी यांनी देखील असंच उदाहरण प्रस्तुत करायला हवं.
ज्याप्रमाणे महात्मा गांधी यांनी भारतातील जनतेला खादी आणि अहिं*सेचा मंत्र देऊन सत्याग्रहाचा मार्ग दाखवला होता, त्याचप्रमाणे नेहरू भारतीय जनतेला स्वतः पिकवा आणि स्वतः खा, अशी शिकवण देत होते. पण त्यांनी केवळ शिकवणच दिली नाही तर, आपल्या तीन मूर्ती भवन या निवासस्थानी असलेला बगिचा नांगरण्यासाठी ट्रॅक्टर मागवले. आता तिथे फुलांच्या जागी धान्य पिकायला लागले. डॉ. राजेंद्रप्रसाद आणि राज्य संपदा विभागाने यावर हरकत घेतली तेव्हा नेहरुंनी त्यांना फटकारले व राष्ट्रपतींना देखील जमिनीची नांगरणी करत शेती करण्याचा सल्ला दिला.
नेहरूंनी संपदा विभागाला पत्र लिहिले त्यात ते म्हणाले, “मला राजेंद्रप्रसाद यांनी सांगितले की मी माझ्या निवासस्थानातील जमिनीचा ज्या पध्दतीने वापर करू इच्छित आहे, यावर इस्टेट विभागाला आपत्ती आहे व असं नको व्हायला, अशी त्यांची मागणी आहे. मला एक गोष्ट लक्षात येत नाही की सरकारने जर जमिनीचा तुकडा तुकडा खाद्यान्न पिकवण्यासाठी वापरण्याचे धोरण अवलंबले असताना इस्टेट विभागाचे दायित्व आहे की त्यांनी दिल्लीतील रिकामी जमीन या कामासाठी वापरली पाहिजे. ही जमीन खाजगी इमारतींमध्ये असली तरी याने विशेष काही फरक पडत नाही. गरज पडल्यास ट्रॅक्टरच्या मदतीने ही जमीन नांगरली जाऊ शकते. कृषिमंत्र्यांना काही हलके फर्ग्युसन ट्रॅक्टर्स मिळाले आहेत, ते या कामासाठी वापरले जाऊ शकतात. ते स्वखुशीने ते ट्रॅक्टर्स तुम्हाला वापरायला देतील. मी माझ्या बगीच्याचा भाग याच ट्रॅक्टर्सच्या मदतीने नांगरणार आहे.”
तीन मूर्ती भवनात नांगरणी करण्यात आली, राष्ट्रपती भवनात देखील शेती सुरू करण्यात आली, देशात ट्रॅक्टर्सची निर्मिती सुरू करण्यात आली. जगातील काही उच्चस्तरीय खाद्यान्न प्रबंधन तज्ज्ञांचे सल्ले घेण्यात आले. एवढं करून देखील १९५१ च्या शेवटापर्यंत विदेशातून येणारी खाद्यान्न आयात बंद करावी लागेल, अशी स्थिती निर्माण झाली नव्हती. यामुळे नेहरूंना मोठा धक्का बसला होता पण ते निराश झाले नाही.
१९ फेब्रुवारी १९५२ रोजी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या खाद्यान्न मंत्र्यांच्या संमेलनात नेहरू म्हणाले, “आपण खाद्यान्नाचा प्रश्न इतक्या बेजबाबदारपणे हाताळू शकत नाही, आपण जनतेला अशाप्रकारे भुकेने मरू देऊ शकत नाही.
तीन वर्षांपूर्वी मी म्हणालो होतो की १९५२ पर्यंत आपण स्वतःला खाण्यापिण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर करणार आहोत. आपण असं करण्यात असमर्थ ठरलो असलो तरी नियोजन आयोगाने या क्षेत्रात आपल्याला आत्मनिर्भर करण्याचा मुद्दा सोडलेला नाही.
आयोगाचे मत आहे की अन्नाच्या बाबतीत आपण इतक्या लवकर आत्मनिर्भर होऊ शकत नाही. पण आत्मनिर्भर होण्यासाठी एक तारीख निश्चित करावी लागणार आहे. मी एकटा हे काम करणार नाही, आपण एकत्र बसून ती तारीख ठरवणार आहोत. परंतु नियोजन आयोगच याप्रसंगी एखादी व्यावहारिक तारीख देऊ शकतो.”
एखादी मोठी योजना अपयशी ठरल्यानंतर बहुतांश वेळा नेते त्या योजनेचा उल्लेख देखील करायला कचरतात. ते नवीन योजना आणून जुन्या चुकांवर पांघरूण घालायचे काम करतात पण नेहरूंनी असे केले नाही.
नेहरू म्हणाले, “मी स्वीकार करतो की मला एक जबरदस्त धक्का बसला आहे, आपण निश्चित केलेल्या कालावधीत आत्मनिर्भर बनण्यात अपयशी ठरलो आहोत. सरकारच नाही, मी स्वतः देखील तारखेवर जोर देत राहिलो पण मुळात मी माझे वचन पूर्ण करू शकलो नाही. मी जनतेला दिलेल्या वचनाला भंग केले आहे.”
यामागचे स्पष्टीकरण देताना नेहरूंनी सांगितले की, “आपल्याला माहिती आहे की आपण एक तारीख निश्चित केली होती, पण आपल्या मार्गात असंख्य संकटे आली, आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागला. यामुळे आपले प्रस्तावित लक्ष साध्य करण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत.”
१५ ऑगस्ट १९५२ रोजी लाल किल्ल्यावरून भाषण देताना नेहरू म्हणाले होते की, “आजच्या काळात आपल्या देशावर अनेक संकटे कोसळली. यावर्षी पाऊस पडला नाही, दुष्काळ पडला, भूकंप आले. काय काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. काही ठिकाणी आम्ही ही बाजी पलटवू शकलो. आम्ही योग्यप्रकारे स्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आणि आता इतर वर्षांपेक्षा यावेळी आपली परिस्थिती चांगली आहे.
यंदा पाऊस चांगला आहे, तसा इथे खाण्याचा प्रश्न देखील पेटता आहे, कपड्यांचा प्रश्न देखील आहे. एवढा मोठा देश आहे, त्यामुळे या मोठ्या देशातील कुठल्या न कुठल्या भागात परिस्थिती बिकट असतेच, संकटे येत राहतात. आज देशभरात चांगला पाऊस होतोय, इथे सर्वत्र चांगले उत्पन्न होते आहे. खाद्यान्नाचे उत्पादन चांगले झाले आहे.
परंतु उत्तर प्रदेशच्या गोरखपूर, अझमगड, देवरिया आणि बस्ती येथे, बिहारच्या काही भागात, बंगालच्या काही भागात, सुंदरबनच्या भागात, मद्रासच्या रायलसीमा परिसरात, म्हैसूरचा काही जिल्ह्यात, राजस्थानच्या काही व सौराष्ट्रच्या काही भागात अजूनही परिस्थिती बिकट आहे, अजूनही भुकमरी आहे, गरिबी आहे, खाण्यापिण्याची टंचाई आहे.”
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून अनंत अडचणी होत्या, एका खंडित व गरीब देशाचा कारभार हाताळताना त्यांनी अतिशय धीराने व जाणीवपूर्वकपणे कारभार करून आधुनिक भारताची मुहूर्तमेढ रोवली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.