आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज जग एकविसाव्या शतकात पोहोचलं आहे. सगळ्याच संस्कृतींची सरमिसळ झालेली आज बघायला मिळते. भारतातही पाश्चिमात्य संस्कृतीने आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. परंतु असे असले तरीही आपल्याकडे पाश्चिमात्य विवाह संस्कृती अजूनही म्हणावी तितकी स्वीकारार्ह नाही.
लग्न म्हणजे दोन परिवाराचं मिलन असे आपल्याकडे मानतात त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार आपल्या देशात कायदेशीर असला तरीही समाजाने याला अजूनही स्वीकारले नाही. पण भारतात एक असं राज्य आहे तिथे लिव्ह इन रिलेशनशिप ही प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे.
राजस्थान!
जिथे स्त्री भ्रूणह*त्या आणि ऑनर किलिंग म्हणजे भाजी कापण्यासारखे आहे तिथेच गेल्या कित्येक पिढ्या नातं प्रथेचं पालन करताना दिसतात.
चला तर मग ही नातं प्रथा म्हणजे नेमकं काय आहे याबद्दल माहिती घेऊया.
राजस्थान या राज्यात प्रामुख्याने गुजर, राजपूत, जैन आणि ब्राम्हण हा समाज आहे. यापैकी फक्त गुजर हा एक समाज सोडला तर इतर समाजात या प्रथेला काहीही स्थान नाहीये. राजस्थान राज्यात गुजर समाजाला त्यांच्या संख्येमुळे राजकीयदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे. गुजर समाजसोबतच राजस्थानमध्ये असणाऱ्या अजून काही जाती आहेत ज्या या प्रथेचा स्वीकार करत ती प्रथा पुढे नेतायत.
तसं पाहायला गेलं तर ही प्रथा कधी सुरु झाली याचा इतिहासात काही पुरावा नाहीये. गुजर समाजसोबतच धाकड़, जोगी, बिश्नोई, बंजारा यांसारख्या समाजांनीसुद्धा ही प्रथा गेल्या कित्येक दशकांपासून चालत आणली आहे. याची सुरुवात नेमकी कोणी केली याचा त्यांनाही काही ठावठिकाणा नाहीये.
या प्रथेला लिव्ह इन रिलेशनशिपचं जुनं रूप म्हणून आपण पाहू शकतो. पण या प्रथेच्या मागे असणारा उद्देश म्हणजे विधवा महिलांना आपलं जीवन पुन्हा नव्याने जगता यावं हा आहे.
या प्रथेमध्ये महिला तिच्या पतीच्या मृत्युनंतर तिला आवडेल अशा एखाद्या पुरुषासोबत राहू शकत होती. अर्थातच, त्य पुरुषाला महिलेचा पूर्ण सांभाळ करणे आवश्यकच होते. जर हे नातं आयुष्यभर टिकलं तर ठीक जर त्या दोघांचं नाही जमलं तर महिलेला त्या पुरुषाला सोडून दुसरा शोधण्याचं स्वातंत्र्य होतं.
हे ऐकायला जरा विचित्र वाटेल पण आजच्या काळात समाजातील मानसिकता संकुचित झाली आहे. हेच कारण होते की बालविधवा झाल्यानंतरही स्त्रियांना त्यांचे संपूर्ण जीवन एकटेच घालवायचे नव्हते. त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर साथीदार निवडण्याचे त्यांना स्वातंत्र्य होते.
“राजस्थानातील आरक्षित समाज” हे डॉक्टर मोहनलाल गुप्ता यांचं हिंदी पुस्तक आहे. या पुस्तकात ते असं म्हणतात की, ओबीसी आणि एसटी एससी समाजात विशेषत: नातं प्रथा प्रचलित आहे. गुजर, कुंभार, लोहार, धाकड, जोगी या ३६ प्रकारच्या जातींमध्ये या प्रथेची टक्केवारी ७५ टक्क्यांपर्यंत आहे. तर ९० टक्के ही प्रथा सर्पमित्रांच्या समाजात प्रचलित आहे.
या लिव्ह इनच्या जोड्या काही अशाच तयार होत नाहीत तर त्यासाठी जसं कौटुंबिक न्यायालय असतं तशी विशिष्ट पंचायत आहे. यावरूनच या नातं प्रथेचं महत्व लक्षात येतं. विशेष म्हणजे केवळ अविवाहित महिला किंवा पुरुषच असं करू शकतात असं नाही तर समाजातील कोणालाही नातं प्रथेच्या अंतर्गत आपल्याला हवं त्या व्यक्तीसोबत राहण्याचं स्वातंत्र्य आहे. पण हे करताना त्यांना आधीच्या जोडीदाराला पोटगी देणे बंधनकारक आहे.
नातं प्रथा या प्रकारासाठी पाच गावांच्या पंचायत स्थापन केल्या आहेत. यामध्ये पहिल्या लग्नापासून मुले, मालमत्ता इत्यादींबाबत निर्माण झालेल्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते आणि परस्पर संमतीने निर्णय घेण्यात येतो. जेणेकरून भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये नये. याचा असा एक फायदा होतो की लोकांना घटस्पोट घेण्यासाठी कोर्ट कचेरीच्या वाऱ्या कराव्या लागत नाहीत.
या सर्वातली विशेष गोष्ट अशी आहे की जर पहिल्या पत्नीला किंवा पतीला दुसऱ्या व्यक्तीबरोबर जोडीदाराच्या नात्यावर काही आक्षेप नसेल तर तो वेगळं न होतासुद्धा ही प्रथा सोडून देऊ शकतो. राजस्थानच्या प्रथांवर लिहिलेल्या बर्याच शोधनिबंधांमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की महिलांना बळ देण्यासाठी नातं प्रथेचा प्रयत्न पूर्णपणे सुरू झाला होता, व यातून त्यांना आर्थिक मदत आणि सुरक्षा मिळायची.
तसेच नातं प्रथेला समाजाने स्वीकारलं होतं, त्यामुळे सामाजिक सन्मानाचे सुद्धा काही नुकसान होत नव्हते. या प्रथेत एखाद्या नातेसंबंधादरम्यान एखाद्या मुलाचा जन्म झाला असेल तर त्याला बेकायदेशीर म्हटले जात नाही. बिकानेरमध्ये तर त्यास टॅक्सचा दर्जा देण्यात आला आहे.
येथे अनेक दंतकथा आणि ऐतिहासिक कथा ‘बॅकबोन टॅक्स’ संदर्भित करतात. याचा अर्थ असा की बाईच्या नात्यानंतर तो माणूस तिच्या कुटुंबास ठराविक रक्कम देत असे ती यासाठी की जेणेकरून ती तिचे आयुष्य जगू शकेल.
आता आपण साध्या या प्रथेमुळे होणारे तोटे फायदे किंवा ही प्रथा किती उपयोगी आहे ते पाहूया.
राजस्थानात गेल्या काही दशकांत या प्रथेचा त्रास सहन करावा लागला आहे. विशेषत: जेव्हा राजस्थानमध्ये लिंग गुणोत्तर प्रमाणात खूप फरक आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार राजस्थान राज्यात एक हजार पुरुषांवर ९२६ महिला आहेत. तर खेड्यांमध्ये हे प्रमाण आणखी कमी आहे. १ हजार येथे ८७४ महिला आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार गंगानगर, धौलपूर, जैसलमेरसह डझनहून अधिक जिल्हा व आसपासच्या गावांमधील आकडेवारी अधिकच भयानक आहे. इथे १ हजार पुरुषांमागे ८५० पेक्षा कमी महिला आहेत.
घटत्या लिंग प्रमाणानुसार नातं प्रथा परंपरेवर गंभीर परिणाम झाला आहे. महिलांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांचे हक्कही कमी झाले. पुरुषांचा प्रभाव जास्त आहे. याचा परिणाम म्हणजे पुरुषांच्या बाजूनेच यात जास्त नियम झाले आहेत. पंचायतीत महिलांचे स्थानही खूप कमी आहे.
कालपर्यंत स्त्रिया त्यांच्या आवडीनिवडीने करीत असलेले संबंध आता पुरुषांच्या निवडीवर आधारित झाले आहेत. इतकेच नव्हे तर या प्रथेअंतर्गत पैशांच्या व्यवहाराचा प्रश्नच नव्हता. पण आता परिस्थिती अशी आहे की पैसे देऊन कुणाच्याही पत्नीला प्रथेच्या नावाखाली दत्तक घेता येत आहे जे की भयानक आहे.
पूर्वी काही नाही पण नंतर या प्रथेच्या नावाखाली देहविक्रीसारखे व्यवसाय होऊ लागले. मग आता राजस्थान सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी या प्रथेचे देहविक्री व्यापारात रूपांतर करण्याच्या विरोधात कडक नियम आणून दोषींना शिक्षा देण्यास सुरवात केली आहे.
राजस्थानात बालविवाह हा देखील तिथल्या नातं प्रथेप्रमाणेच आहे. त्यामुळे बालविधवांची संख्याही जास्त आहे. आतापर्यंत बाल विधवांना आयुष्यभर जगण्यासाठी एकच आधार होता. पण आता प्रथेच्या नावाखाली होत असलेल्या चुकीच्या घटनांच्या विरोधात ‘लाडो’ नामक स्वयंसेवी संस्था लढा देत आहे.
एकंदरीत या प्रथेच्या नावाखाली होत असलेल्या गैरकृत्यांमुळे ही प्रथा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.