आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात सोन्याचा धूर निघायचा, असं आपण नेहमी ऐकत असतो, अजूनही अशी मान्यता आहे की भारतात जितकं सोनं आहे तितकं जगाच्या पाठीवर कुठेच नाही.
भारतातील राजे राजवाडे, मोठ मोठे साम्राज्य हे इतके वैभवशाली आणि धनसंपन्न होते की आजही त्यांचा मोठा खजिना उत्खनन करताना पुरातत्व विभागाच्या हाती लागण्याच्या बातम्या सातत्याने येत असतात.
खरंतर भारतातील मोठी संपत्ती इंग्रज लुटून घेऊन गेले आहेत. तब्बल दोनशे वर्षांच्या राजवटीत ब्रिटिशांनी प्रचंड लूट केली आहे, त्याचा परिणाम म्हणून आज खजिण्याऐवजी फक्त भकास विराण, पडीक संस्कृतीक अवशेष आपल्याला दिसत आहेत. खजिना ही फक्त एक अफवा बनली आहे.
आज उत्खनन करताना लोकांना फक्त जुने औजार आणि भांडी सापडतात, धन संपत्ती कधीच हाती लागत नाही. पूर्वजांचा खजिना कधीच हाती लागत नाही. बऱ्याचदा या खजिन्याचा हव्यासापोटी अघोरी अंधश्रद्धा जन्माला येत असतात.
भारतात गुप्तधन, खजिण्या संबंधित अनेक दंतकथा प्रचलित आहेत. अशीच एक दंतकथा दुसऱ्या बाजीरावाचे पुत्र आणि १८५७ चे सेनानी नानासाहेब पेशवे यांच्या आयुष्याशी निगडित आहे.
नानासाहेब ज्याप्रकारे रहस्यमयरित्या गायब झाले त्याप्रमाणे त्यांची धनसंपत्ती देखील रहस्यमयरित्या अदृश्य झाली आहे. तो खजिना कुठे आहे, याचे उत्तर अजूनही इतिहासकार देऊ शकलेले नाहीत.
१८५७ च्या क्रांतीने इंग्रजांची झोप उडवल्यानंतर नानासाहेब अचानक कुठे गायब झाले याचे खात्रीलायक पुरावे आज उपलब्ध नाहीत. १८५७ च्या रणसंग्रामानंतर त्यांचा उल्लेखच इतिहासात आढळत नाही. हे अगदी तसेच रहस्य आहे जसे सुभाषचंद्र बोस यांच्या कथित मृत्यूचे आहे.
नानासाहेबांनी कानपूरमध्ये राहुन १८५७ च्या बंडाचे नेतृत्व केले होते. त्यांना मंगल पांडे यांची साथ लाभली होती. त्यांच्या बंडामुळे इंग्रजांना कानपूरमधून माघार घ्यावी लागली होती. इतिहासात नानासाहेब आणि इंग्रजांच्या संघर्षाला ‘सत्ती चोरा घाट नरसंहार’ म्हणून ओळखले जाते.
पहिल्यांदा इंग्रजांशी तह करायला गेलेल्या नानासाहेबांच्या सैनिकांनी अचानक ब्रिटिश छावणीवर हल्ला केला. मोठा नरसंहार त्या ठिकाणी झाला, ज्यात असंख्य लहान मुले व स्त्रिया मृत्युमुखी पडल्या होत्या.
इंग्रजांनी अखेरीस माघार घेत नानासाहेबांशी तह केला आणि अचानक एक दिवस बिठुरवर हल्ला चढवला, इंग्रजांच्या हल्ल्यातून नानासाहेब सुखरूप बचावले पण त्यांचे अनेक माणसं यात मृत्युमुखी पडले.
नाना मोठ्या शिताफीने निसटले. त्यानंतर नाना कुठे गेले याचा कोणाकडेही खात्रीलायक पुरावा नाही. अनेकांच्या मते नानासाहेब नेपाळला गेले होते आणि त्यांनी उर्वरित आयुष्य तिथेच व्यतित केलं.
नानासाहेबांसोबत झाशीच्या राणी लक्ष्मीबाईची भाची आणि बेलूरचे जमीनदार नारायणराव यांची मुलगी महाराणी तपस्विनीने देखील पलायन केले होते. या महाराणीने लक्ष्मीबाई आणि नानासाहेब यांना १८५७ ला मदत केली होती.
१८५७ चे बंड फसल्यानंतर महाराणी तपस्विनीला इंग्रजानी तिरुचिरापल्लीच्या तुरुंगात अनेक वर्ष ठेवले होते. असं म्हटलं जातं की नानासाहेब तिला घेऊन नेपाळला गेले असल्याचा सुगावा इंग्रजांना लागला, याकरीता तिला नानासाहेबांनी बंगालला परत पाठवले आणि तिला त्याठिकाणी अटक करण्यात आली.
नेपाळवर ब्रिटिश अधिपत्य नसल्याने त्याठिकाणी नानासाहेब गेले, असे सांगितले जाते. नेपाळचा राजा १८५७ च्या क्रांतीचा गुप्त हस्तक होता, अशी देखील वर्णने आहेत. पुढे नानासाहेब नेपाळमध्ये दगावले की अजून कुठे गेले, याची ऐतिहासिक नोंद नाही.
महाराणी तेजस्विनी या १९०९ साली गेल्या, त्यांनी टिळकांच्या प्रेरणेने बंगाल विभाजनाच्या विरोधात मोठा लढा दिला होता. त्यांच्या माहितीनुसार नानासाहेब नेपाळमध्ये असल्याचा दावा केला जातो.
बिठुरचा किल्ला ज्याठिकाणी नानासाहेब निवासाला होते त्याठिकाणी असलेलं मोठं धन, जवळजवळ हजार टन सोनं हे धन नानासाहेबांनी लपवलं असल्याचे म्हटले जाते, कारण ब्रिटिश शासनाने बिठुर हस्तगत केले तेव्हा त्यांनी उत्खनन करून मोठी दौलत ताब्यात घेतली होती, तरी ती पर्याप्त नव्हती.
असं म्हणतात पेशवाईत इतकी दौलत होती की दहा पिढ्या काही न करता केवळ उधळपट्टी करून जगू शकल्या असत्या, मग इतकं धन इंगजाना मिळालं नाही की त्यांनी फक्त ८ लाख असं कागदोपत्री लिहून बाकी इंग्लंडला रवाना केलं, असे अनेक प्रश्न आहेत.
अनेकांच्या मते दौढीयागडीचा राजा राम्बक्ष हा नानासाहेबांचा खास होता, जो बिठुर पासून फार जवळच्या अंतरावर होता, नानासाहेबांनी आपला खजिना त्याच्या महालात लपवल्याचा दावा देखील केला जातो.
२०१३ साली राम्बक्षच्या एका वंशजाने किल्ल्यात खजिना असण्याचा दावा केला होता. तिथे उत्खनन करण्यात आले पण हाती काहीच लागले नाही. इतिहासकार म्हणतात की राम्बक्ष आणि नानासाहेब यांच्यात शेवटी वाद झाला होता, त्यामुळे ब्रिटिशानी आक्रमण केल्यावर देखील राम्बक्ष नाना साहेबांच्या मदतीला गेला नव्हता, त्याने आपला सरदार दवियार सिंहला पाठवून नाना साहेबांना वाचवलं असा दावा देखील अनेक इतिहासकार करतात.
पण सध्यातरी नानासाहेबांचा तो तथाकथित खजिना ना पुण्यात सापडला, ना बिठुरला ना दौडीयागडीला, त्यामुळे तो खजिना ब्रिटिश घेऊन गेले असावेत अशी एक शक्यता आहे, नाहीतर तसा कुठलाचा खजिना अस्तित्वात नाही अशी दुसरी शक्यता आहे. दोन्ही शक्यतापैकी दुसरी शक्यता अधिक वास्तववादी भासते कारण महाराणी तपस्विनी हयात असेपर्यंत त्यांनी ना याची वाच्यता केली ना उल्लेख त्यामुळे हा खजिना नाही, असं मानायला हरकत नाही
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.