आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बौद्ध धर्म हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक मानला जातो. त्याची सुरुवात उत्तर भारतात साधारणतः ख्रिस्तपूर्व ५६३ ते ख्रिस्तपूर्व ४८३ दरम्यान झाली. सिद्धार्थ गौतमासह पुढील एक हजार वर्षांत बौद्ध परंपरेने आशिया खंडातील बहुतेक भागावर आणि संपूर्ण भारतात आपला प्रभाव दाखवून दिला. मानवी जीवन हे दु: ख आणि पुनर्जन्माचे चक्र आहे, परंतु जर एखाद्याने ‘निर्वाण’ (मुक्ती) प्राप्त केले तर या चक्रातून कायमचे सुटणे शक्य आहे. सिद्धार्थ गौतम हे त्या अवस्थेला पोहोचणारे पहिले व्यक्ती आहेत, म्हणून ते बुद्ध म्हणून ओळखले जातात.
बौद्ध धर्माच्या दोन मुख्य शाखा आहेत, महायान बौद्ध आणि थेरवडा बौद्ध. तिबेट, चीन, तैवान, जपान, कोरिया आणि मंगोलियामध्ये महायान बौद्ध धर्मातील पद्धतींचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. महायान पद्धतीमध्ये बोधिसत्वांच्या आदर्शांवर भर दिला जातो. तर श्रीलंका, कंबोडिया, थायलंड, लाओस आणि म्यानमारमध्ये थेरवडा बौद्ध धर्माच्या परंपरेचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. या पद्धतीमध्ये मुक्तीचा मार्ग म्हणून साधूसारखी जीवनशैली आणि ध्यान यांवर भर दिला जातो.
बौद्ध धर्माचे सर्वोच्च प्रमुख आणि कधीकाळी स्वतंत्र देश अस्तित्वात असलेल्या तिबेटच्या प्रमुखांना ‘दलाई लामा’ म्हणून संबोधले जाते. ऑक्टोबर १९५१ मध्ये विस्तारवादी विचारसरणी असलेल्या चीनने जवळजवळ निःशस्त्र तिबेटवर आपला दावा सांगितला, दलाई लामांचे अनेक शिष्य आणि अनुयायी मारले गेले किंवा युद्धकैदी म्हणून कैद करण्यात आले. स्थानिक लोक आणि चिनी सैन्य यांच्यात झालेल्या युद्धात २००० लोक मरण पावले. यानंतर चीनच्या काही अधिकाऱ्यांनी तिबेटचे राष्ट्रप्रमुख दलाई लामा यांना शांततेवर चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवलं, पण यात त्यांनी निःशस्त्र आणि कोणत्याही अंगरक्षक किंवा सैनिकाशिवाय येण्याची अट घातली होती.
दलाई लामांच्या निकटवर्तीयांनी त्यांना भारतात पलायन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १ मार्च १९५९ रोजी त्यांनी एखाद्या सैनिकाप्रमाणे वेष धारण केला आणि आपला तिबेटमधील मठ सोडला. त्यांच्याबरोबर तिबेटचे २० प्रशासकीय अधिकारी होते. हिमालयाच्या कठीण वाटांमधून आणि प्रचंड ब्रह्मपुत्रा नदी पार करून हा साधू ३० मार्च १९५९ रोजी भारताच्या आश्रयाला आला. सुरुवातीच्या काळात त्यांनी अरुणाचल प्रदेशातील तवांग मठामध्ये मुक्काम केला होता. एका महिन्यानंतर उत्तराखंड येथील मसुरीमध्ये त्यांनी पंतप्रधान नेहरूंची भेट घेतली.
१९६२ साली स्पेशल फ्रंटियर फोर्स नावाची एक तुकडी तयार करण्यात आली. ही तुकडी भारतीय सैन्यदलाचा भाग नाही. पण तिबेटच्या स्वातंत्र्याच्या हेतूने तयार केला गेलेला आणि भारताला सर्वतोपरी मदत करणारा हा ‘स्पेशल फोर्स ‘आहे. २०२० च्या भारत-चीन संघर्षात चीनला मागे सारण्यात भारतीय सैन्यदलाबरोबरच स्पेशल फ्रंटियर फोर्सचंही मोठं योगदान आहे.
जरी तिबेट आणि भारत बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र असले, तरी वर सांगितल्याप्रमाणे बौद्ध धर्माचा प्रसार आशियातील अनेक देशांमध्ये झाला आहे. दुःख आणि पुनर्जन्मापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक लोक प्रयत्नशील असतात. हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्मात याविषयीचा विचार येतो. त्यासाठी ध्यानाचा मार्ग मोठ्या प्रमाणात अवलंबलेला आपल्याला आढळून येईल.
सात्विकता, ध्यान आणि मनाची एकाग्रता या गोष्टी जो माणूस मिळवतो त्याला गुरुचे किंवा प्रतिष्ठेचे स्थान देण्यात येते. मग तो गुरु आपल्या अनुयायांना मुक्ती कशी मिळवावी याबद्दल मार्गदर्शन करतो. ‘तुका म्हणे आतां । उरलो उपकारापुरता’ तुकोबांच्या या वचनानुसार अनुयायांचे मार्गदर्शन इतकेच त्या गुरुच्या जीवनाचे ध्येय असते. ते ध्येय साध्य झाल्यानंतर तो जीवनाचा त्याग करतो. प्रत्येकाची जीवन-त्यागण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते.
२०१५ साली बुद्धाची एक चिनी मूर्ती सापडली आहे. या मूर्तीत एका साधूचे संपूर्ण मृत शरीर ठेवलेले आहे, मूर्तीच्या ध्यानस्थ आकारातच ते शरीर ठेवलेले दिसते. गेल्या वर्षी नेदरलँड्सच्या ड्रेन्ट्स म्युझियममध्ये प्रदर्शित झालेल्या बुद्धाच्या मूर्तीला एमर्सफोर्टमधील मींडर मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. मींडर मेडिकल सेंटरमध्ये या मूर्तीचे पूर्ण सिटी स्कॅन पार पडले. तसेच बौद्ध कला तज्ज्ञ एरीक ब्रुजीन यांच्या देखरेखीखाली एंडोस्कोपच्या साहाय्याने मूर्तीच्या आतील नमुने घेण्यात आले.
आतापर्यंत बुद्धमूर्तीच्या आत सापडलेले साधूचे हे मृत शरीर ही एक अद्वितीय गोष्ट आहे. हे शरीर चिनी मेडिटेशन विद्यालयाच्या लियुकान नावाच्या गुरुचे आहे. लियुकान यांचा मृत्यू इसवी सन ११००च्या आसपास झाला. सीटी स्कॅन आणि एन्डोस्कोपीच्या मदतीने लियुकॅनच्या केवळ मृत अवशेषच सापडले नाहीत तर त्यापेक्षा वेगळेही काहीतरी सापडले. छातीजवळील आणि उदरपोकळ्यांमधील साहित्याची आद्यपही ओळख पटली नाही. तसेच एकेकाळी अवयवांनी व्यापलेल्या मूर्तीतील जागेवर प्राचीन चिनी शब्द लिहिलेले कागदाचे कपटे सापडले.
तपास करणाऱ्या संघाच्या मते बुद्ध मूर्तीमध्ये असलेले हे साधूचे मृत शरीर म्हणजे “जिवंत बुद्ध” बनण्यासाठी स्वत:च्या ‘ममीकरणाचे’ उदाहरण असू शकते. ही एक अत्यंत कठोर प्रक्रिया आहे. यासाठी कठोर तपस्येची आवश्यकता असते. भारतीय संस्कृतीमध्ये समाधीचा जो विचार सांगितला जातो, तसाच हा विचार आहे. ममीकरण मृत्यू नाही, तर एक उच्च प्रगत आध्यात्मिक अवस्था आहे असा काही लोकांचा असा विश्वास होता आणि काहींच्या मते ही मुक्तीची स्थिती आहे.
जपानमध्ये ज्यांना अशा प्रकारे चिरविश्रांती घ्यायची आहे ते साधू/भिक्षु १००० दिवसांचा फक्त शेंगदाणे, पाणी, इत्यादींचा आहार सुरु करतात आणि त्यानंतर १००० दिवसांचा मूळभाज्यांचा, पाइन झाडाच्या सालीचा आणि चिनी लाखेपासून तयार केलेल्या चहाचा आहार सुरु करतात. चिनी लाखेपासून तयार केलेला चहा हा शुद्धतेसाठी वापरला जातो. यामुळे शरीरातील जंतू साफ होतात. मग त्यासाधूला एका दगडी थडग्यात बसवण्यात येते.
या प्रक्रियेनंतर हजार दिवसांनी दगडी थडगे उघडून पाहण्यात येते, जर साधू मृत असेल तर त्या थडग्याची मंदिरात स्थापना होते आणि जर साधू आद्यपही जिवंत असेल तर त्याला आदर दिला जातो.
लियुकान आणि ती बुद्धमूर्ती त्यानंतर ड्रेन्ट्स म्युझियममधून बाहेर काढले गेले आणि काही काळासाठी हंगेरियन नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये प्रदर्शित करण्यात आले.
संदर्भ
Chinese villagers go to court for Zhanggong Zushi statue | Daily Mail Online
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.