आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
दिवाळी आणि तुळशीच्या लग्नानंतर साजरी केली जाते ती त्रिपुरारी पौर्णिमा. याच पौर्णिमेला शिखांचे पहिले गुरु ‘गुरु नानकदेव’ यांचाही जन्म झाला. त्यामुळे कार्तिक महिन्यातील या पौर्णिमेला उत्तर भारतात ‘गुरु पुरब’ किंवा ‘कट्टक पुर्णमांशी’ असेही म्हणतात. गुरु नानक देवांनी शीख पंथाची स्थापना केली आणि आशियातील काही भागांमध्ये ‘इक ओंकार’ { ੴ } म्हणजेच ‘ईश्वर एक आहे’ या संदेशाचा प्रचार प्रसार केला.
‘कर्तारपूर’ आणि शीख पंथामधील त्याचे अनन्यसाधारण महत्व:
इसवी सन १५०४ साली गुरु नानकदेव यांनी रावी नदीच्या उजव्या किनाऱ्यावर ‘कर्तारपूर’ची स्थापना केली. कर्तारपूर म्हणजे देवाचे किंवा या विश्वाच्या निर्मात्याचे, म्हणजेच ‘कर्त्याचे’ शहर’. कर्तारपूरचा गुरुद्वारा शीख धर्माचे संस्थापक, गुरु नानकदेव यांनी शीख समुदायाला स्थायिक आणि एकत्र केलेल्या ऐतिहासिक जागेवर बांधला आहे. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि सध्या पाकिस्तानात असलेल्या नानकाना साहिब गुरुद्वारा, म्हणजेच त्यांचे जन्मस्थान यांच्या समवेत कर्तारपूरचा गुरुद्वारा हे शीख पंथातील सर्वांत पवित्र स्थळांपैकी एक आहे.
हरिद्वार, मक्का-मदिना, लंका, बगदाद, कश्मीर आणि नेपाळ येथे प्रवास करून आल्यानंतर १५३९ पर्यंत सुमारे १८ वर्षे गुरु नानकदेव येथेच वास्तव्यास होते. येथे गुरु नानकदेवांनी ‘किरत करो, नाम जपो, वंद चको’ ही तीन तत्त्वे जगाला दिली आहेत. म्हणजे उपजीविकेसाठी कठोर परिश्रम करा, देवाचे स्मरण करत राहा आणि तुम्हाला मिळालेले जगाला वाटून घ्या. लाहोरस्थित इतिहासकार फकर सय्यद एजाजुद्दीन यांच्या मते, या मंदिरात मूळ गुरु ग्रंथ साहिबच्या शेवटच्या प्रती आहेत.
१५३९ साली, गुरु नानकदेवांच्या मृत्यूनंतर स्थानिक हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद झाला. मुस्लिमांनी पीर म्हणून त्यांना मान दिल्या कारणाने त्यांना नानकदेवांचा मृतदेह दफन करायचा होता, तर नानकांना त्यांच्या गुरूस्थानी मानणाऱ्या हिंदूंना त्यांच्या मृतदेहाला अग्नी द्यायचा होता. परंतु, आख्यायिकेनुसार, गुरु नानक यांच्या शरीराचे फुलांमध्ये रूपांतर झाले.
त्यानंतर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या काही लोकांनी कर्तारपूरवर आपला दावा केला आणि नानकदेवांच्या स्मरणार्थ एक समान भिंत बांधून दोन समाधी उभारल्या. अखेर रावी नदीच्या बदलत्या प्रवाहाने समाधी वाहून गेल्या. खुद्द गुरु नानकदेवांनी कर्तारपूर वसवले असल्याने आणि त्यांची समाधी तिथे असल्याने जगभरातील शीख पंथीयांसाठी ती ‘पंढरीच’ आहे आणि प्रत्येक गुरु पुरब किंवा कार्तिक पौर्णिमेला याठिकाणी नतमस्तक होण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक येतात.
शिखांच्या पंढरीवरील फाळणीचे घाव:
१९४६-४७, भारतात स्वातंत्र्याची सुवर्ण पहाट होत असतानाच देशभरात धर्मांध दंगली आणि हिं*साचाराने कळस गाठला होता. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा परिणाम म्हणून भारताला फाळणीचे काळे दिवस पाहावे लागले.
१९४७ साली ‘ब्रिटीश भारता’चे भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशांमध्ये विभाजन होत होते. गैर-मुस्लिम किंवा मुस्लिम बहुसंख्यांवर आधारित पंजाब, सिंध, आणि बंगाल या प्रांतांचे प्रामुख्याने विभाजन होणार होते. दुर्दैवाने फाळणीमध्ये ब्रिटिश इंडियन आर्मी, रॉयल इंडियन नेव्ही, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, रेल्वे आणि केंद्रीय तिजोरी यांसारख्या बहुमूल्य संसाधनांची देखील विभागणी झाली.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश कायदेशीररित्या अस्तित्वात आले. फाळणी हा संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक दुःखद आणि त्यापेक्षाही र*क्तरंजित अध्याय आहे. भारताच्या फाळणीच्या वेळी कर्तारपूरचा प्रदेशही भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला होता. ‘रॅडक्लिफ लाइन’ने रावी नदीच्या उजव्या तीरावरील शकरगड तालुका कर्तारपूरसह, पाकिस्तानला बहाल केला तर रावी नदीच्या डाव्या तीरावरील गुरुदासपूर तालुका भारताला बहाल केला.
१९४८ साली, शिरोमणी अकाली दलाने ‘ननकाना साहिब’ आणि कर्तारपूर येथील गुरुद्वारांची जमीन भारताने संपादित करावी अशी मागणी केली. सुमारे अकरा वर्षे, १९५९ पर्यंत या मागण्या कायम राहिल्या, पण तत्कालीन पंजाब राज्य सरकारने रॅडक्लिफ लाइनने निश्चित केलेल्या सीमारेषेत कोणताही बदल होणार नाही असे सांगितले.
देशांमध्ये सीमारेषा, पण भक्तीला सीमा नाही:
फाळणीनंतर अनेक वर्षे, रावी नदीवरील ‘जस्सर पूल’ ओलांडून भारतीय शीख अनौपचारिकपणे कर्तारपूरला भेट देऊ शकत होते, कारण १९६५ पर्यंत दोन्ही देशांमधील सीमा नियंत्रणाचे नियम काटेकोरपणे लागू करण्यात आले नव्हते. पण १९६५-६६च्या भारत-पाकिस्तान यु*द्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याने हा पूल भारतीय सैन्याच्या संभाव्य आक्र*मणाला रोखण्यासाठी नष्ट केला आणि त्यानंतर सीमेच्या दोन्ही बाजूंना सीमा नियंत्रणाचे नियम अधिक कडकपणे लागू करण्यात आले.
१९६९ साली गुरू नानक यांच्या ५००व्या जयंतीनिमित्त तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कर्तारपूर साहिब भारताचा भाग व्हावा यासाठी पाकिस्तान सरकारशी जमीन अदलाबदल करण्याबद्दल चर्चा करण्याचे आश्वासन दिले. पण हे प्रत्यक्षात आले नाही. सप्टेंबर १९७४ मध्ये, भारत आणि पाकिस्तानमध्ये धार्मिक तीर्थस्थळांच्या भेटीसाठी एका विशिष्ट प्रोटोकॉलवर सहमती झाली.
२००५ सालच्या आसपास भेटींची आणि साइट्सची संख्या वाढवून प्रोटोकॉल अपडेट करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे १९७४ साली झालेल्या परस्पर प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट केलेल्या स्थळांमध्ये कर्तारपूरचा समावेशच करण्यात आला नव्हता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार, भारताने कर्तारपूरचा समावेश करण्याची विनंती केली होती, परंतु पाकिस्तानने याला सहमती दिली नाही.
फाळणीनंतर पन्नास वर्षे कर्तारपूर साहिब गुरुद्वारा बंद?:
कर्तारपूर येथील गुरुद्वाराचे केअरटेकर गोविंद सिंग हे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हणतात, ‘गुरुद्वारा १९४७ ते २००० पर्यंत बंदच होता’. नियमित यात्रेकरू येत असूनही गुरुद्वारामध्ये कर्मचारी नव्हते आणि गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तान सरकारने सप्टेंबर २००० मध्ये गुरू नानक पुण्यतिथीपूर्वी या गुरुद्वाराची दुरुस्ती केली आणि सप्टेंबर २००४ साली ते औपचारिकपणे उघडले.
अकाली नेते कुलदीप सिंग वडाला यांच्या म्हणण्यानुसार, गुरुद्वारा २००३ पर्यंत ओसाड पडला होता. त्याचा उपयोग स्थानिक गावकरी “गुरांचा गोठा” म्हणून करत होते आणि त्या भागातील जमिनी जमीनदारांनी ताब्यात घेतल्या होत्या. २००३ पासून, पाकिस्तान सरकारने शीख धार्मिक देवस्थानांच्या देखभालीसाठी पुढाकार घेतला आहे.
कर्तारपूरला जोडण्याचे प्राथमिक प्रयत्न आणि उभय देशांतील ताणतणाव:
कर्तारपूर कॉरिडॉरच्या मिशनची सुरुवात ‘भाभीषण सिंग गोराया’ यांनी केली होती. त्यांनी सुमारे २४ वर्षे या कॉरिडॉरसाठी प्रयत्न केले. पण हे प्रयत्न फलित व्हायला १९९९ साल उजाडावे लागले. नवाझ शरीफ आणि अटलबिहारी वाजपेयी या पंतप्रधानांच्या कार्यकाळात १९९८ साली कर्तारपूर बॉर्डर क्रॉसिंग उघडण्यावर पहिल्यांदा चर्चा झाली होती.
दिल्ली-लाहोर बस डिप्लोमसीचा एक भाग म्हणून भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ यांनी १९९९ च्या सुरुवातीला कर्तारपूर कॉरिडॉरचा प्रस्ताव दिला. पाकिस्तानने कर्तारपूर साहिब गुरुद्वाराचे नूतनीकरण केले आणि ते भारतीय सीमेवरून पाहण्यासाठी एक उंच टॉवर उपलब्ध करवून दिला. पण यानंतर काहीच काळात कारगिल यु*द्धामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे भारत-पाकिस्तान संबंध नष्ट झाले होते.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात २००४ साली पंजाबमधील भाषणातही हा मुद्दा मांडला होता. २००४ साली सुरू झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील ‘संमिश्र संवाद प्रक्रिये’मध्ये अमृतसर-लाहोर-कर्तारपूर ही ठिकाणं रस्त्याद्वारे जोडण्यावरही चर्चा झाली. २००८ साली, भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्यासमवेत कर्तारपूरला “व्हिसा-मुक्त प्रवास” सुरु करण्याची कल्पना मांडली.
वरवर पाहता कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नव्हती, पण खाजगीरित्या पाकिस्तानने शीख समुदायाबरोबर बोलणी करण्यास सुरुवात केली. २० जून २००८ रोजी, डेरा बाबा नानक येथे अकाली दलाचे नेते कुलदीप सिंग वडाला यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, माजी अमेरिकन राजदूत आणि ‘इन्स्टिट्यूट फॉर मल्टी-ट्रॅक डिप्लोमसी’चे संस्थापक जॉन डब्ल्यू. मॅकडोनाल्ड यांनी सीमेच्या दोन्ही बाजूंना तीर्थक्षेत्रे असणारे कर्तारपूर कॉरिडॉर हे शांतता क्षेत्र असावे हे आवाहन केले.
यालाच प्रतिसाद म्हणून २८ जून २००८ रोजी, तत्कालीन भारतीय परराष्ट्र मंत्री, प्रणव मुखर्जी, म्हणाले, ‘भारत सरकार शांतता कॉरिडॉरसाठी विविध मुद्द्यांचा अभ्यास करीत आहे.’ पण यामध्ये पाकिस्तानने पुन्हा आडवं घातलं आणि २६/११च्या दह*शत*वादी ह*ल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आणि कर्तारपूर कॉरिडॉरबद्दलचा पुढाकार पुन्हा कमी झाला.
ऑगस्ट २०१० मध्ये, “कर्तारपूर मार्ग” नावाचा अहवाल ‘वॉशिंग्टन डीसी’स्थित ‘सुरिंदर सिंग आणि संस्थे’ने प्रसिद्ध केला. अहवालानुसार, कॉरिडॉरचा खर्च १.७ करोड डॉलर्स असला असता. हा संपूर्ण खर्च शीख पंथ पेलायला तयार होता. नोव्हेंबर २०१० मध्ये पंजाब राज्य विधानसभेने एकमताने दोन तीर्थक्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय मार्ग बांधण्याचा ठराव मंजूर केला आणि १ ऑक्टोबर २०१० रोजी तो केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला.
प्रयत्नांती परमेश्वर: कर्तारपूर कॉरिडॉर प्रोजेक्टला मान्यता आणि बांधकाम:
ऑगस्ट २०१८ मध्ये, पंजाबचे तत्कालीन पर्यटन मंत्री नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथग्रहण समारंभाला उपस्थित होते. याचवेळी त्यांनी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवाने गुरू नानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त डेरा बाबा नानक ते कर्तारपूर कॉरिडॉर उघडण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.
ऑगस्ट २०१८ मध्ये, भारतीय पंजाब विधानसभेत कॉरिडॉरशी संबंधित आणखी एक ठराव मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मांडला होता. तो एकमताने मंजूर करण्यात आला. यानंतर पंजाब सरकारने कॉरिडॉर उघडण्यासंदर्भात भारताच्या पंतप्रधानांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला.
३० ऑक्टोबर २०१८ रोजी, अमेरिकन शीख लोकांच्या एका गटाने कॉरिडॉर उघडण्यासाठी भारतीय पंतप्रधानांची मदत मागितली. नोव्हेंबर २०१८ मध्ये, भारतीय मंत्रिमंडळाने कॉरिडॉर उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आणि पाकिस्तानला देखील तसे करण्याचे आवाहन केले. ऑगस्ट २०१९ मध्ये, भारत आणि पाकिस्तानने भारतीय नागरिकांना कर्तारपूरला व्हिसा-मुक्त प्रवासाची परवानगी देण्याचे मान्य केले.
२४ ऑक्टोबर २०१९ रोजी, केंद्रीय गृह मंत्रालयातील अंतर्गत सुरक्षा विभागाचे तत्कालीन संयुक्त सचिव एस.सी.एल. दास आणि भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे तत्कालीन महासंचालक मोहम्मद फैसल यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी गुरुदासपूरच्या सीमावर्ती शहरातील डेरा बाबा नानकजवळील झिरो पॉइंटवर भेट घेतली.
या करारावर स्वाक्षरी केल्याने दररोज ५ हजार भारतीय यात्रेकरूंना व्हिसाशिवाय गुरुद्वाराला भेट देण्याचा मार्ग मोकळा झाला. करारानुसार, यात्रेकरू सकाळी येतील आणि गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देऊन संध्याकाळी परततील. या मार्गावरून प्रवासासाठी यात्रेकरूंना भाडे आकारले जाणार होते.
मात्र, भारताने पाकिस्तानला यात्रेकरूंचे शुल्क माफ करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, १ नोव्हेंबर २०१९ रोजी, ‘ भारतातून कर्तारपूर यात्रेसाठी येणाऱ्या शीख यात्रेकरूंना उद्घाटनाच्या दिवशी आणि १२ नोव्हेंबर २०१९ रोजी गुरु नानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही’ अशी घोषणा पाकिस्तानचा तत्कालीन पंतप्रधान इम्रान खानने ट्विटरवर केली.
पाकिस्तान सरकारने एक “स्पेशल गेस्चर” म्हणून कर्तारपूर यात्रेकरूंसाठी एक वर्षापर्यंतच्या पासपोर्टची आवश्यकता देखील माफ केली होती. दोन्ही देशांमधील करारानुसार पासपोर्ट आवश्यक असेल असे भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नंतर जाहीर केले.
कॉरिडॉरचा उद्घाटन समारोह:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानकदेव यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त, ९ नोव्हेम्बर २०१९ रोजी कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन केले. अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीत पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, सुखबीर सिंग बादल आणि नवज्योत सिंग सिद्धू यांचा समावेश होता.
तसेच पंतप्रधानांनी कॉरिडॉरच्या प्रवासी टर्मिनल इमारतीचेही उद्घाटन केले. हीच इमारत चेक पोस्ट म्हणूनही ओळखले जाते. याठिकाणी यात्रेकरूंना कॉरिडॉरमधून प्रवास करण्याची परवानगी मिळेल. हा कॉरिडॉर सुमारे ४.५ किलोमीटर लांबीचा आहे.
कोव्हीड-१९ महामारीचा कर्तारपूर कॉरिडॉरवरील परिणाम आणि रिओपनिंग:
उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच, मार्च २०२० मध्ये कोविड-१९ च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर कॉरिडॉर बंद करण्यात आला होता.
पंजाबमधील नेत्यांच्या शिष्टमंडळाने तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कॉरिडॉर पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आणि केंद्र सरकारने कॉरिडॉर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान सरकारनेही भारताला ‘प्रकाश उत्सवा’च्या पार्श्वभूमीवर गुरुद्वाराला भेट देण्यासाठी कॉरिडॉर सुरु करण्याची विनंती केली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.