आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतभूमीने असंख्य वीरांना जन्म दिला आहे, ज्यांच्या हिंमतीचे व साहसाचे जगभरात कौतुक केले जाते.
ही गोष्ट त्या वेळेची आहे, जेव्हा भारत गुलामीत होता, एकीकडे इंग्रज भारतात आपली एकाधिकारशाही प्रस्थापित करत होते आणि दुसरीकडे त्यांची जगावर राज्य करण्याची सुप्त इच्छा जागृत झाली होती. यामुळेच दुसरं महायुद्ध घडून आले होते.
या महायुद्धात भारतीय सैनिकांनी देखील आपल्या ताकदीचे प्रदर्शन दाखवले. इंग्रजांच्या बाजूने लढत असतांना त्यांनी आपल्या ताकदीचा संपूर्ण जगाला परिचय करून दिला.
याच वीर सैनिकांमध्ये एक होते लेफ्टनंट करमजीत सिंह जज, यांनी ब्रिटिश सैन्यासोबत पाऊल टाकत शत्रूचा सामना केला आणि विजयासाठी आपल्या प्राणांचे दान दिले. फक्त २१ वर्षांचे असताना लेफ्टनंट करमजीत सिंह शहीद झाले आणि त्यांचे नाव विश्वातील त्या वीर लोकांमध्ये घेण्यात आले ज्यांच्या रक्ताने धरणी पवित्र झाली होती.
१९२३ साली, जेव्हा भारतावर ब्रिटिश राजवट होती, २५ मार्चला पंजाबच्या कपूरथला या ठिकाणी करमजीत यांचा जन्म झाला. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर करमजीत ब्रिटीशांच्या आधीन असलेल्या भारतीय सैन्यात भरती झाले. १९४५ साली दुसरं जगतिक महायुद्ध वणव्यासारखे पेटले होते. संपूर्ण जग दोन भागात विभागलं गेलं होतं.
भारतीय सैन्य इंग्रजांच्या हातचे एक मजबूत हत्यार होते. भारतीय सैन्याच्या बळावर त्यांनी युद्ध लढलंच नाहीतर त्या युद्धात त्यांनी विजय देखील संपादन केला. भारतीय लोकांना इच्छेविरुद्ध ब्रिटिशांच्या बाजूने हे युद्ध लढावं लागलं. भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या रेजिमेंटसला जगाच्या कानाकोपऱ्यात रवाना करण्यात आले होते. त्यावेळी लेफ्टनंट करमजीत सिंह १५ व्या पंजाब रेजिमेंटच्या चौथ्या बटालियनचा भाग होते.
१८ मार्च १९४५ रोजी लेफ्टनंट करमजीत सिंह जज यांच्या तुकडीला मेईकतिला, या ब्रम्हदेशातील एका ठिकाणी रवाना करण्यात आले. त्यांना तेथील एका कॉटन मिलवर ताबा मिळवायचा होता, जी जपानी सैन्याच्या ताब्यात होती.
ह्या मिलवर हल्ला करण्याचा मार्ग फार खडतर होता आणि ज्या कालावधीत हा हल्ला करायचा होता, त्यावेळी परिस्थिती अधिकच चिघळली. यात भारतीय सैन्याच्या विजयाची संभावना फारच कमी होती. परंतु लेफ्टनंट करमजीत सिंह जज यांनी पुढे जाऊन शत्रूच्या विरोधात लढायचा निर्धार केला होता. त्यांना विश्वास होता की जर ते रेजिमेंटला घेऊन जमिनीच्या मार्गाने गेले तर त्यांना ब्रिटिश रणगाड्यांची मदत मिळू शकेल.
पण मिलकडे जाण्याचा मार्ग मोठा खडतर होता. यामुळे ब्रिटिश रणगाडे मदत करण्यास असमर्थ होते.अशा गंभीर परिस्थितीतदेखील लेफ्टनंट करमजीत सिंह यांनी संयम सोडला नाही. त्यांनी आपल्या पलटणीच्या मनोधैर्याला मजबूत केले आणि पुढे मार्गक्रमण केले.
महायुद्धाच्या इतिहासात हे युद्ध मेईकतिलाचे युद्ध म्हणून ओळखले जाते. या लढाईत भारतीय रेजिमेंटने मोठ्या शौर्याचे प्रदर्शन करून शत्रूशी दोन हात केले. युद्धात आपल्या सैन्य टोळीसकट कमांडर लेफ्टनंट करमजीत सिंह यांनी शत्रूवर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांच्या युद्धकौशल्याने व रणभूमीत घेतलेल्या निर्णयांमुळे, त्यांच्या शत्रूची अवस्था बिकट झाली.
युद्धादरम्यान एक क्षण असा देखील आला जेव्हा करमजीत दोन जपानी सैनिकांच्या समोर एकटे उभे होते. त्यांच्या जवळ बंदुकीचा मुखावर असलेल्या चाकू व्यतिरिक्त काहीच शिल्लक नव्हते. इतक्या प्रतिकुल परिस्थितीत देखील त्यांनी पुढे जाऊन मोठ्या शौर्याने जपानी सैनिकांना कंठस्नान घातले.
युद्धात हळूहळू लेफ्टनंट करमजीत सिंह आणि त्यांच्या सैन्य तुकडीला यश प्राप्त होत होते. पुढे जात ते आपल्या या युध्दाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचले. त्यांनी आतापर्यंत शत्रूच्या दहा बंकराना उध्वस्त केले होते. आता फक्त जपानी सैन्याच्या एका तुकडीचा विनाश करत मिल ताब्यात घ्यायची राहिली होती. यासाठी तीन अजून बंकर उध्वस्त करावे लागणार होते.
या बंकरांच्या रक्षणार्थ सैन्यासोबत रणगाडे देखील उभे होते. या बंकरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लेफ्टनंट करमजीत सिंह यांनी, आपल्या तुकडीसकट या बंकरांवर सरळ हल्ला केला. ते लहान लहान तुकड्या करून सतत हल्ले करत होते. युद्धाच्या या काळात लेफ्टनंट करमजीत यांनी अतुलनीय शौर्य दाखवले, त्यांच्या या शौर्यामुळे ते इतिहासात अजरामर झाले.
त्यांनी छोट्या सैन्य तुकडीला घेऊन शत्रूच्या बंकरावर हल्ला केला आणि त्यांच्यावर शत्रू दलाकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला, ज्यात असंख्य गोळ्यांनी त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळणी केली.
लेफ्टनंट करमजीत प्रचंड जखमी झाले. त्यांना तिथून सुरक्षा केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले, पण डॉक्टर त्यांना वाचवण्यात अयशस्वी ठरले. अशा प्रकारे भारताचा हा महान सुपुत्र इंग्रजांसाठी लढताना शहीद झाला.
लेफ्टनंट करमजीत यांच्या मृत्यूनंतर तुकडीत एक वेगळाच प्रतिशोधाचा अग्नी संचारला, ज्याने पेटून उठत त्यांनी जपानी सेनेच्या तिन्ही बंकरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
सैन्य विजयी जरी झालं असलं, तरी लेफ्टनंट करमजीत यांच्या बलिदानाने प्रचंड दुःखी होतं. मेईकतिलाच्या युद्धातील लेफ्टनंट करमजीत सिंह यांच्या बलिदानामुळे ब्रिटिश आणि भारतीय सैन्याला मोठे नुकसान झाले होते. त्यांच्या शौर्याने २० लाख ब्रिटिश आणि भारतीय सैनिकांमध्ये जोशाची एक नवीन लहर निर्माण झाली होती.
लेफ्टनंट करमजीत सिंह जज यांना त्यांच्या या अद्वितीय शौर्यासाठी ब्रिटिश सैन्याचा सर्वोच्च युद्ध सन्मानाने व्हिक्टोरिया क्रॉसने सन्मानित करण्यात आले होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.