आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
फोर्ब्जने सादर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये देखील गौतम अदानी यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. अदानीचा एक साधा व्यापारी ते जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान पटकावण्याच्या हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. आज ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांच्या संपत्तीत कितीतरी पटीने वाढ झालेली आहे.
अदानी यांच्या संपत्तीत ही वाढ कशी झाली? त्यांनी आपले उद्योग-व्यवसाय कसे विस्तारले? जाणून घेऊया या लेखातून.
कधीकाळी शिक्षणाचा खर्चही परवडत नसल्याने त्यांना शाळा सोडावी लागली होती. आज त्याच अदानींनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
एक साधा मध्यमवर्गीय व्यापारी ते अब्जाधीश होण्याचा हा प्रवास तितकाच आव्हानांनी भरलेला होता. पण, अदानी यांनी या सगळ्या आव्हानांवर मात करत माणसाची इच्छाशक्ती किती दृढ असू शकते हे दाखवून दिले. कधीकाळी त्यांनी आपल्या मित्राच्या स्कूटरवरून फिरून आपला व्यवसाय केला आहे. त्याच अदानींकडे आज ब्रीचक्राफ्ट जेट आणि हॉकर जेटसारखी विमाने आहेत. मोठमोठे राजकीय नेते त्यांच्याकडून भाडेतत्वावर विमाने घेतात.
परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यात सोडून पैशासाठी ते गुजरातमधून मुंबईत येऊन स्थायिक झाले आणि इथल्या एका डायमंड कंपनीत त्यांनी नोकरी सुरू केली. दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचे डायमंड शॉप सुरू केले. १९८१ पासून त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाच्या पिविसी युनिटचे कामही सांभाळले आणि त्यानंतर १९८८ साली स्वतःची एक्स्पोर्ट-इम्पोर्ट कंपनी सुरू केली.
त्यानंतर अदानी यांनी गेली दोन दशके कोळशाचा व्यापार केला, त्यानंतर आता त्यांनी जीवाश्म इंधन, सिमेंट आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात रस घेतला आहे. खनन उद्योग, वाहतूक, ऊर्जा निर्मिती, विमानतळ, डेटा सेंटर आणि सुरक्षा व्यवसाय या क्षेत्रातही अदानी ग्रुपने प्रवेश केला आहे. या सर्वच क्षेत्रात गुंतवणुकीला चांगली संधी आहे आणि ती वाढण्याचीही शक्यता आहे.
याच कारणाने गेल्या एका वर्षात अदानी यांच्या ६ कंपन्यांचे एकूण मूल्य ७५५ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचले आहे. शिवाय, रिलायन्स आणि टाटा यांसारख्या मोठमोठ्या भारतीय कंपन्यांनीही आता अदानी ग्रुप्स ऑफ कंपनीजमध्ये गुंतवणूक केली आहे. फ्रान्सच्या टोटल एसइ आणि वॉरबर्ग पिनकस एलएलसी या मोठ्या तेल कंपन्यांनीही अदानीच्या कंपनीत पैसे गुंतवले आहेत.
अर्थात, अदानी यांनी हे यश एका दिवसात किंवा एका वर्षात मिळवलेले नाही. त्यांनी कमोडीटी ट्रेडर म्हणून १९८० साली आपला पहिला व्यवसाय सुरु केला. त्यानंतर त्यांनी एकेक करत आपल्या कंपनीचा विस्तार इतर क्षेत्रांतही केला. यश मिळाल्यावर त्या व्यक्तीकडे सर्वांचे लक्ष जाते पण त्याआधी तिने पत्करलेली जोखीम आणि घेतलेले कष्ट यांची माहिती कुणालाच नसते.
२०१० साली त्यांना ऑस्ट्रेलियातील एका कोळसा खाणीचे काम मिळाले. तेव्हापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापारी म्हणून ओळखले जाऊ लागले.
एक यशस्वी उद्योजक होण्याच्या त्यांच्या या प्रवासात त्यांनी भरपूर टीका देखील पचवली आहे. अनेकांच्या मते अदानींवर मोदींचा वरदहस्त असल्यानेच त्यांना ही प्रगती करणे शक्य झाल्याचे म्हटले जाते. मोदी-अदानी संबंधांची नेहमीच चर्चा होत असते. खरे तर त्यांनी अनेकदा याबाबत खुलासा केला असला तरी विरोधकांचे समाधान झालेले नाही.
पर्यावरण कार्यकर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रेटा थनबर्गनेदेखील गौतम अदानी यांच्यावर पर्यावरणाला हानी पोहोचवल्याचा आरोप केला होता. देशांतर्गत तर त्यांना नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणाने लक्ष्य केले जाते.
अदानी यांच्या प्रकल्पांचा विस्तार वाढेल तसेच कर्जाचाही विस्तार होत आहे. अदानी यांच्या ग्रीन एनर्जी लिमिटेडने आतापर्यंत १२ बँकाकडून १.३५ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी जवळपास २ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. आर्थिक संस्थांनी कोळशाऐवजी जीवाश्म इंधनाच्या प्रकल्पांमधील गुंतवणूक वाढवावी असा त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. कदाचित पुढे जाऊन अदानींना या धोरणाचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे, असाही दावा केला जात आहे.
अदानी यांनी आता भारतात पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. या क्षेत्रातून त्यांच्या कंपनीला भरपूर आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कारण भारतात याची गरज येत्या काळात वाढणार आहे. शिवाय, सरकार देखील पायाभूत सुविधा उभारण्याकडे विशेष लक्ष देत आहे. या क्षेत्रातून येत्या काळात हजारो लोकांसाठी रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात असणाऱ्या संधी बघता अनेक गुंतवणूकदार देखील अदानींच्या या प्रकल्पाकडे अपेक्षेने पाहत आहेत.
संपत्तीच्या बाबतीत अदानी यांनी एका वर्षात चीनच्या जॅक मा यांनाही मागे टाकले आहे. अदानी यांच्याकडे आज ४७२० डॉलर्सची संपत्ती आहे.
जगभरातील इतर श्रीमंत व्यक्तींशी तुलना करता इतर कुणाच्याही संपत्तीत इतक्या वेगाने वृद्धी झालेली नाही. भारतातील इतर उद्योगपतींच्या तुलनेत अदानी यांना ही श्रीमंती वारशात मिळालेली नाही तर ती त्यांनी स्वकष्टाने अर्जित केलेली आहे. म्हणूनच त्यांच्या या प्रवासाबद्दल अनेकांना त्यांचा अभिमान वाटतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.