आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जमिनीच्या वाट्यावरुन होणारे वाद तसे आपल्याला फार पूर्वीपासून माहीत आहेत. गावांमध्ये तर हे प्रमाण बरंच मोठं असतं, मग ते वाद कुटुंबातील भावा-भावांमधले असो वा दोन शेजाऱ्यांमधले. ही भाऊबंदकी आपल्याकडे पूर्वीपासून चालत आली आहे. जमिनीचा हिस्सा मिळण्यावरून एकदा का वाद सुरू झाला, की मग कितीही जिवाला जीव देणारे भाऊ असले तरी त्यांचे आपापसात संबंध बिघडू लागतात. प्रसंगी सख्खे भाऊ पक्के वैरी बनतात एकमेकांचे!
लहान असताना एकत्र खेळलेले, एका ताटात जेवलेले, मिळालेला खाऊ एकमेकांत वाटून खाणारे भाऊ ज्यावेळी जमिनीचा समान हिस्सा मिळाला नाही म्हणून प्रसंगी हमरातुमरीवर येऊन एकमेकांवर हात उचलायलाही मागेपुढे पाहत नाहीत. त्यावेळी त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. ज्यांना एकमेकांचे राम-लक्ष्मण म्हणून वाढवलं, ते आज असे वागताना पाहून त्यांच्या मनाला होत असलेल्या यातना शब्दांत व्यक्त करता न येणाऱ्या असतात.
यातूनच मग एकमेकांचे द्वेष, धुसफूस, एका कुटुंबाचं अनेक तुकड्यांत विभाजन वगैरे गोष्टी चालत असतात. बरेचदा ही भाऊबंदकी जशी पुस्तकात मागील पानावरून पुढे चालू म्हणतात, तशी एका पिढीतून दुसऱ्या पिढीत अगदी त्याच स्वरूपात वारसाहक्काने पुढे चालत राहते. जसे दोन भाऊ एकमेकांशी चांगले नसतात, तसे त्यांच्या मुलांचेही संबंध फार सुखद वगैरे होत नाहीत. जितके भाऊ जास्त, तितके वारस जास्त. जितके वारस जास्त, तितके जमिनीचे तुकडे जास्त. जितके तुकडे जास्त, तितकेच त्या तुकड्यांवरून होत असलेले वाददेखील जास्तच असतात. जशा घरोघरी मातीच्या चुली तशी गावागावांत दरघरटी ही भाऊबंदकी आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बघायला मिळतेच.
जमिनीच्या हिस्सा वाटपावरून होणारे हे वाद जसे आपल्या भारतात चालतात, तसे इतर देशांतसुध्दा चालतात. अशाच एका प्रकरणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
ही गोष्ट आहे युगांडा या देशातली. इथं एका मुलानं तर दोन दशकांनंतरही त्याच्या वडिलांनी कायदेशीर वादांमध्ये गमावलेली जमीन वकिलीची सनद घेऊन परत मिळवली आहे.
जॉर्डन किन्येरा असं या मुलाचं नाव असून ते उत्तर युगांडामधील किटगम जिल्ह्यात राहतात. आपल्या वडिलांची ही जमीन जॉर्डननं तब्बल २३ वर्षांनी परत मिळवली आहे. तो १९९६मध्ये फक्त सहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांवर जमिनीच्या हद्दीच्या वादातून त्यांच्या शेजाऱ्यांनी खटला दाखल केला. हा खटला सुमारे दोन दशकं चालला. परंतु अखेर जॉर्डन यानं स्वतःच वकिलीची पदवी प्राप्त करून आपली ही वडिलोपार्जित जमीन अखेर कायदेशीररित्या परत मिळवली आहे.
जॉर्डनचे वडील हे त्यावेळी एक निवृत्त झालेले कर्मचारी होते. उत्पन्नाची साधनं मर्यादित असल्याने त्यांची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती. त्यामुळे ते आपली ती जमीन सोडवण्यासाठी फार काही करू शकत नव्हते. त्यांच्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंतचा काळ याच परिसरात गेला होता. त्यांच्या सख्ख्या भावाप्रमाणेच त्यांच्या अनेक नातेवाईकांचे दफन संस्कार हे त्याच जमिनीत झाले होते. त्यामुळे या जमिनीशी त्यांचं भावनिक नातं जुळलं होतं.
या दोन दशकांच्या काळात जॉर्डनच्या वडिलांना त्या जमिनीचा वापर कोणत्याही प्रकारे करता आला नाही. तिथं एक झाड लावता आलं नाही की, कुठल्या स्वरूपाचं बांधकामदेखील करता आलं नाही. या सर्व प्रकरणामुळे जॉर्डनचे वडील हे मानसिकदृष्ट्या खूप खचले. संपूर्ण किन्येरा कुटुंबावरच या गोष्टीचा खूप सखोल परिणाम झाला होता. सर्वजण प्रचंड निराश झालेले होते. वडिलांची ही हताश अवस्था पाहतच जॉर्डन लहानाचा मोठा झाला होता. त्यामुळे त्यानं शाळेत शिकत असतानाच वकील होण्याचा निर्णय घेतला.
सुमारे दोन दशकांहून अधिक काळ चालू असलेल्या या खटल्यात अखेर न्यायालयाने किन्येरा कुटुंबाच्या बाजूने निकाल दिला. यावेळी जॉर्डनला आपण गेली अठरा वर्षं घेतलेली मेहनत सफल झाल्याचा आनंद झाला.
मात्र या आनंदाला काहीशी दुःखाची किनारही आहे. जेव्हा जॉर्डननं आपल्या वडिलांना कोर्टाच्या निकालाविषयी कळवलं, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अतिशय भावुक होती. ते आनंदानं रडू लागले. मात्र आता त्यांचं वय सुमारे ८२/८३ च्या घरात आहे, शिवाय ते अल्झायमर्सच्या आजारानेही त्रस्त आहेत. ज्या कारणामुळे त्यांना सतत विस्मरण होत राहतं. घरच्यांना नेहमी त्यांना या गोष्टीची आठवण करुन द्यावी लागते की, जॉर्डननं त्यांची जमीन त्यांना परत मिळवून दिली आहे. पण जेव्हा जेव्हा ही गोष्ट त्यांना कळते, त्या दरवेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं ते समाधान, तो आनंद त्या सर्वांना पुन्हापुन्हा अनुभवता येतो.
युगांडामध्ये जमिनीचे वाद खूप मोठ्या प्रमाणात चालतात. तेथील न्यायालयाने त्यासाठी एक स्वतंत्र शाखाच स्थापन केली आहे. तेथे असलेल्या कायदेशीर सल्लागारांच्या नमाटी समूहाच्या मते सुमारे ३३-५०% जमीनधारकांना हा असा त्रास सहन करावा लागतो. युगांडामधील बरेचसे विस्थापित नागरिक जेव्हा काही वर्षं शिबिरामध्ये घालवून आपल्या मूळ ठिकाणी परततात, तेव्हा त्यांना अशाप्रकारे आपल्याच जमिनीच्या मालकी हक्कासाठी लढा द्यावा लागतो.
आधीच शिबिरात आश्रित असल्यासारखे राहून परत आपल्या मूळभूमीत परतल्यावर तिथेसुद्धा संघर्षच करावा लागतो. त्यापायी होत असलेल्या प्रचंड आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. जॉर्डन किन्येरा हा अशाच लोकसमूहाचे प्रतिनिधीत्व करत असून या लोकांना न्याय मिळवून देण्याचा मी यापुढेही नक्की प्रयत्न करेन, हेही तो आवर्जून नमूद करतो.
तसं पाहिलं तर न्यायालयातली प्रकरणं निकालाच्या दृष्टीनं जितकी लांबतात, तितका त्यांचा गुंता वाढत जातो. याला आपल्याकडची न्यायव्यवस्थेची संथरचना हीदेखील एक मुख्य कारण आहे. इथं अनेक महत्वाची प्रकरणंही तशीच धूळ खात वर्षानुवर्षं पडलेली असतात, पण त्यातील पीडित लोकांना न्याय मात्र मिळत नाही. अगदी खून, बलात्कार यांसारख्या संवेदनशील विषयांवरील प्रकरणं सुद्धा आपल्या नेहमीच्या न्यायपध्दतीनुसार गरजेपेक्षा उशिरापर्यंत लांबली जातात, तिथं जमिनीच्या वादांवरील प्रकरणांची काय कथा.
आपल्याकडचे अनेक खटले उदा. १९९३ साली झालेला मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट किंवा मग राममंदिराचा वाद ही याचीच उदाहरणं, ज्यांचा निकाल हा बराच आधी लागू शकला असता. पण एकदा का फार वेळ लागला की मग सहसा ही प्रकरणं तशीच पडून राहतात. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हणही आपल्याकडे त्यामुळेच आलीय. हे भारतासारखं युगांडातही असंच चालतं. परंतु जॉर्डन किन्येरा यानं मात्र आपल्या वडिलांना ज्याप्रकारे तब्बल २३ वर्षांनंतरही न्याय मिळवून दिला, ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.