आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
युद्धात घातक कारवायांसाठी प्राण्यांचा वापर करण्याची पद्धत खूपच जुनी आहे. समोरच्या शत्रूला नामोहरम करण्यासाठी दोन्ही शत्रू पक्षांकडून बरेच नाविन्यपूर्ण शोध लावले जातात. यातूनच बॉम्ब आणि अणुबॉम्बसारख्या संहारक शस्त्रांचा शोध लागला. युद्धाच्या काळात तर मानवी मनाची आणि मेंदूची ही कल्पकता पाहून अचंबित व्हायला होतं.
त्यातही संपूर्ण जगाचा इतिहास बदलून टाकणाऱ्या दोन्ही महायुद्धात जणू एकसे बढकर एक अशा हत्यारांचा शोध लावण्याची स्पर्धाच लागली होती. अशीच काही शास्त्रांची माहिती घेतल्यास मानवी मेंदूच्या घातक कल्पकतेचा आवाका पाहून हादरून जायला होईल.
युद्धात प्राण्यांचा वापर करणे ही काही नवीन कल्पना नाही. पण, दुसऱ्या महायुद्धात ज्या प्रकारे प्राण्यांचा वापर करण्यात आला ते पाहता आपल्या स्वार्थासाठी माणूस निसर्गाच्या संसाधनाचा दुरुपयोग करण्यासाठी कुठल्याही पातळीवर उतरेल हे सिद्ध झाले. या युद्धात रशियाने अँटी-टँक डॉगचा वापर केला होता. तर दुसऱ्या बाजूला अमेरिका देखील प्राण्यांचा वापर करून शत्रूला नामोहरम करण्याचे नवनवे मार्ग शोधत होता. टाडारीडा ब्रासिलेन्सीस या मेक्सिकन वटवाघुळाला हत्यार म्हणून कसे वापरता येईल याचा ते विचार करत होते.
पॅसिफिक महासागराच्या प्रदेशाने दुसऱ्या महायुद्धाच्याकाळातील अत्यंत हिंसक कारवाया अनुभवल्या.
अमेरिकेची सातत्याने सुरु असलेली चढाई आणि जपानची पीछेहाट चालल्याने दिसणारी घोर निराशा यामुळे इथल्या प्रदेशात सततच्या हिंसक कारवाया आणि कुरघोडीला उत आला होता. यासाठी दोन्ही पक्ष कोणतेही मार्ग वापरायला सज्ज होते. त्यांना काहीही करून या प्रदेशावर आपले वर्चस्व सिद्ध करायचे होते. यासाठी दोन्ही पक्षांची वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी होती.
जपानवर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी अमेरिकेने पारंपारिक मार्ग सोडून जपानच्या सैन्याला लक्ष्य करण्याऐवजी जर्मनच्या अधिपत्याखालील प्रदेशांवर आणि त्यांच्या नागरी वसाहतीवर हल्ला करण्याचे ठरवले. जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास खालावेल. नागरिकांवरील हल्ल्यामुळे त्यांचे उद्योगधंदे थंडावतील आणि देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस येईल.
जपानच्या टोकियोसारख्या महत्वाच्या शहरातील घरे पारंपारिक पद्धतीने आणि लाकडापासून बनवलेली असत. अशा वस्त्यांवर हल्ला करण्यासाठी लिटल एस. ऍडम याने एक अत्यंत खुनशी योजना तयार केली. ऍडम पेनिसिल्वानियातील एक डेंटल सर्जन होता. त्याने जपानच्या या शहरांवर हल्ला करण्यासाठी बॅट बॉम्बची कल्पना मांडली.
बॅट बॉम्बमध्ये मेक्सिकन वटवाघूळांचा वापर करून त्यांच्याद्वारे या शहरांवर बॉम्ब हल्ला करणे अशी ही कल्पना होती. या वटवाघूळांमध्ये टायमर बॉम्ब बसवून त्यांना जपानच्या दिशेने पाठवायचे. ही वटवाघूळे पहाटेला एखाद्या घराचा आडोसा घेतील तेंव्हा जपानची ही जास्तीत जास्त लाकूडकाम असलेली घरे त्यातील लोकांसाठी अक्षरश: मृत्यूचा सापळा ठरतील.
भल्या पहाटे लोक साखर झोपेत असताना त्यांना त्यांच्यात घरात जाळून मारण्याची ही क्रूर कल्पना माणसाच्याच डोक्यातून निघाली असेल का असा प्रश्न पडतो.
पण, युद्धात सगळं माफ असतं म्हणतात. मग क्रौर्याचे कुठलेही टोक गाठले तरीही. यासाठी वटवाघूळेच जास्त उपयोगी ठरली असती. कारण, वटवाघूळे रात्रीला फिरतात आणि पहाटेला ते स्वतःसाठी आसरा शोधतात. शिवाय, वटवाघूळांमुळे शहरातील अग्नीरोधक यंत्रेही बेसावध राहतील. अशी योजना अमेरिकेने आखली आणि त्यासाठी चाचणी सुरु केली.
पहिल्याच प्रयत्नात या योजनेला यश आले नाही. वटवाघूळांना प्रशिक्षण देणे तितके सोपे काम नव्हते. कधी ती रस्ता भरकटत भलत्याच ठिकाणी पोहोचत. कधीकधी तर ही वटवाघूळे इंधनाच्या टँकरखाली जाऊन बसत आणि स्वतःच स्वतःला नष्ट करून टाकत. शेवटी अमेरिकेने १९४३च्या ऑगस्टमध्ये ही योजना आपल्या नौदलाकडे सोपवली.
अमेरिकन नौदलाने याला प्रोजेक्ट एक्सरे असे नाव दिले. त्यांच्यामते यामध्ये बॉम्बऐवजी एक्सरेचा वापर केल्यास जास्त परिणामकारक होईल. त्याचवर्षी डिसेंबरमध्ये नौदलाने समुद्री कार्पोरेशनकडे सोपवली त्यांना एका चाचणीत यश आले. बॉम्बपेक्षा एक्सरे वजनाने हलके असल्याने एक्सरे पाठवणे जास्त सोपे जाईल असा संरक्षण तज्ञांचा अंदाज होता.
दुसऱ्या भाषेत सांगायचे तर एका बॉम्बमुळे १६७ ते ४०० आगीचे लोळ उठतील पण तेच एक्सरे मुळे ३,६२५ ते ४,७४८ आगीचे लोळ उठतील.
अर्थात, या योजनेला काही प्रमाणात यश मिळाले असले तरी, १९४४च्या मध्यात या योजनेला स्थगिती देण्यात आली. मॅनहॅटन प्रोजेक्ट याच्या तुलनेत जलद गतीने अंमलात आला आणि अधिक प्रभावी पर्याय ठरला. त्यामुळे हा प्रकल्प कायमचा बंद करण्यात आला.
युद्ध कोणतेही असो त्यामध्ये एकाच वेळी मानवाच्या दोन बाजू दिसून येतात. एक बाजू सर्जनशील असते आणि त्याचवेळी ती तितकीच विध्वंसक देखील ठरते.
आपण नेहमी स्पर्धा करतो. मृत्यूच्या भयाने आपल्याला अधिकाधिक अस्वस्थ केले आहे. आपण संशोधन करतो पण नेहमीच त्याचा वापर वरदान ठरेल असे कधीच होत नाही. आपण संशोधनाच्या आधारे अधिकाधिक हिंसक बनत चाललो आहोत. बॉम्ब-अणुबॉम्ब असे शोध याचीच साक्ष देतात. या शोधांचा वापर मानवी जीवन अधिक आनंददायी करण्यासाठी केला जात नसून मानवाने मानवालाच संपवण्यासाठी होतो आहे.
युद्धजन्य परिस्थितीत फक्त असे अधिकाधिक विध्वंसक, संहारक आणि मानवजातीसोबत अखंड पृथ्वीलाच धोक्यात आणणारे हे शोध खरेच वापरावेत का?
खरंतर आपल्या संशोधक वृत्तीचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. अगदी आजच्या कोरोना महामारीच्या प्रसंगातही आपल्याला हेच कळून आले की आपल्यातील सर्जनशीलता नेहमीच कठीण काळातच आपण पणाला लावतो. युद्ध असो की महामारी संशोधनाचा प्रयत्न फक्त अशा काळापुरताच मर्यादित ठेवू नये.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.