आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मुंबई. लाखो लोकांच्या डोळ्यांतील स्वप्नांना आपल्यात सामावून घेणारं शहर. गर्दी, गडबड आणि गोंधळानं भरलेल्या या शहरातील हॉर्निमन सर्कलजवळ ‘सेंट थॉमस कॅथेड्रल’ नावाचं मुंबईतील सर्वात जुनं अँग्लियन चर्च आहे. या चर्चच्या आतमध्ये अनेक प्रतिष्ठित इंग्रजांची स्मारकं आहेत. या स्मारकांपैकी एक स्मारक मात्र, त्याच्या वेगळेपणामुळं चटकन डोळ्यात भरतं. एका पवित्र वटवृक्षाखाली, चिंतनशील मुद्रेमध्ये उभ्या असलेल्या एका हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याची मूर्ती आहे! हे स्मारक कुणाचं आहे? आणि एका ख्रिश्चन चर्चमध्ये हिंदू धर्मीय पुजाऱ्याची मूर्ती कशी काय आली? असे प्रश्न तुमच्या मनात आले असतील. याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर जोनाथन डंकनच्या आयुष्यात डोकावून पहावं लागेल.
१५व्या आणि १६व्या शतकामध्ये युरोपमध्ये मसाल्याचे पदार्थ ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू झाली होती. कारण मांस जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी मसाल्यांचा वापर केला जात असे. भारतीय उपखंड मसाल्याचं आगार होतं. या मसाल्याचा आणि रेशीम, कापूस, नीळ, चहा, अफूचा व्यापार करण्याच्या हेतूनं ब्रिटीश भारतात आले.
२४ ऑगस्ट १६०८ रोजी सुरत बंदरावर त्यांनी आपलं पहिलं पाऊल ठेवलं. मुघल बादशाह जहांगीरनं १६१३ साली कॅप्टन विल्यम हॉकिन्सला सुरत येथे कारखाना उभारण्याची परवानगी दिली. १६१५ साली ब्रिटिश राजा जेम्स पहिलाचा राजदूत थॉमस रोला जहांगीरनं राजेशाही परवाना दिला. यामुळं ब्रिटिशांनी संपूर्ण मुघल साम्राज्यात आपले कारखाने स्थापन केले आणि हळूहळू त्यांनी भारतावर आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली.
१७०० च्या दशकात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी भारतावर आपली पकड घट्ट करण्यात व्यस्त होती. त्यांनी भारतातील महत्त्वाच्या ठिकाणी ब्रिटिश प्रभारी अधिकारी नियुक्त केलेले होते. यापैकी काही अधिकारी भारताकडे फक्त नफा मिळवून देणारं ठिकाण म्हणून पाहात होते. काहींना वाटत होते की, याठिकाणी शासन आणि प्रशासनाची आवश्यकता आहे. तर, शासक म्हणून आपण सर्व नागरिकांसाठी न्याय, सुव्यवस्था आणि कल्याणकारी योजना आणल्या पाहिजेत, असा विचार करणारे देखील काही अधिकारी होते. अर्थातच, असा परोपकारी विचार करणारे ब्रिटिश अधिकारी खूप कमी होते आणि जोनाथन डंकनचा यात प्रामुख्यानं उल्लेख केला पाहिजे.
१७७२ साली जोनाथन डंकन पहिल्यांदा भारतात आला आणि कलकत्त्यातील ईस्ट इंडिया कंपनीत सामील झाला. त्यावेळी तो फक्त १६ वर्षांचा होता. त्याचं डच भाषेवर प्रभुत्व होतं, त्यामुळं त्याला डच अनुवादक म्हणून काम दिलं होतं. हळूहळू त्यानं ब्रिटिशकालीन भारतात अनेक जबाबदाऱ्या हाताळल्या आणि नोकरीमध्ये बढती मिळवत गेला.
१७८८ साली, गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिसला बनारसचा कारभार पाहण्यासाठी एका चांगल्या प्रशासकाची आवश्यकता होती. तेव्हा त्यानं अनेक अधिक वरिष्ठ आणि अनुभवी लोकांना डावलून मेहनती जोनाथन डंकनच्या हाती बनारसचा कारभार सोपवला. तोपर्यंत डंकन बंगाली आणि पर्शियन या दोन भाषा शिकला होता. त्याला भारतीयांच्या वैदिक संस्कृतीबद्दल कमालीची उत्सुकता आणि आदर वाटे.
बनारस तर वैदिक संस्कृतीबद्दल माहिती असलेली खाणच होती. तिथे आल्यानंतर डंकननं वेदांचा आणि संस्कृत भाषेचा अभ्यास सुरू केला. कुठल्याही प्रदेशावर प्रभावीपणे राज्य करायचं असेल तर त्याठिकाणच्या लोकांच्या मनात घर करता आलं पाहिजे, या विचाराचा डंकन होता. हिंदू धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केल्यास सुयोग्य कारभार करण्यास मदत होईल, असा विश्वास त्याला होता. त्यामुळं त्यानं प्राचीन भारतीय साहित्याचा अभ्यास केला.
जोनाथन डंकननं १७९१ साली आधुनिक भारतातील पहिल्या संस्कृत महाविद्यालयाची बनारस शहरात स्थापना केली. वाराणसीतील ‘संपूर्णानंद संस्कृत विश्व विद्यालय’ हे भारतातील सर्वात जुनं संस्कृत महाविद्यालय आहे. आता त्याचं रुपांतर विद्यापीठामध्ये झालं असून त्याठिकाणी प्राचीन संस्कृत हस्तलिखितांचा अभ्यास केला जातो. प्राचीन हस्तलिखितांचा खजिना म्हणून हे विद्यापीठ प्रसिद्ध आहे. याचं संपूर्ण श्रेय जोनाथन डंकन नावाच्या ब्रिटिशाला जातं.
ब्रिटिश असला तरी त्याने इतरांप्रमाणं फक्त नफा मिळवण्याचा आणि सत्ता उपभोगण्याचा विचार केला नाही. या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो याची त्याला जाणीव होती. या विचारातून त्यानं बनारसमध्ये स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचं अभियान राबवलं. बनारसमध्ये ‘राजकुमार’ समुदायामध्ये नवजात मुलींना मारण्याची परंपरा होती. डंकनच्या मनाला ही परंपरा रूचली नाही. त्यानं या समाजातील वडिलधाऱ्यांसोबत चर्चा केली. नवजात मुलींना मारणं हे हिंदू धर्मग्रंथांनुसार अक्षम्य पाप आहे, ही गोष्ट त्यानं त्यांना पटवून दिली.
यानंतर राजकुमार समुदायानं ही प्रथा सोडून देण्याचं लेखी आश्वासन डंकनला दिलं. (नंतर ब्रिटिशांनी लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या नेतृत्वाखाली बालहत्येविरुद्ध दंडात्मक कायदा केला होता). गुलाम असणाऱ्या देशातील लोकांसाठी इतका खोलवर जाऊन विचार करणारा डंकन कदाचित एकमेव शासक असावा. त्याच्या प्रयत्नामुळं कितीतरी मुलींना मोकळा श्वास घेता आला.
लॉर्ड कॉर्नवॉलिस बनारसमधील डंकनच्या कामगिरीनं खूप प्रभावित झाला. जेव्हा कॉर्नवॉलिस इंग्लंडला परतला, तेव्हा त्यानं डंकनला मुंबईचा गव्हर्नर करावं यासाठी संचालक मंडळाकडे शिफारस केली होती. त्यानंतर जोनाथन डंकनकडे मुंबई प्रांताचं गव्हर्नरपद देण्यात आलं. १७९५ ते १८११ या काळात डंकननं मुंबईचा गव्हर्नर म्हणून काम पाहिलं. आपल्या कार्यकाळत त्यानं अनेक उत्तम कामं केली. निवृत्तीनंतर इंग्लंडला जाण्याची आशा डंकनला होती. त्यासाठी त्यानं एका घराची व्यवस्थादेखील करून ठेवली होती. मात्र, निवृत्त होण्यापूर्वी १८११ मध्ये डंकनचा मृत्यू झाला. सेंट थॉमस चर्चमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला.
एक आदर्श प्रशासकीय अधिकारी कसा असावा, याचं जोनाथन डंकन उदाहरण होता. त्याच्या मनात भारतीय लोक आणि संस्कृतीबद्दल आदराची भावना होती. त्यामुळेचं जोनाथन डंकनचं मुंबईतील स्मारकाची रचना वेगळ्या पद्धतीनं करण्यात आली. फक्त त्याची वैयक्तिक धार्मिक श्रद्धा (ख्रिश्चन) विचारात न घेता, त्याच्या एकूण व्यक्तीमत्त्वाचा विचार करून या स्मारकाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.