आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात गेली हजारो वर्षे विविध धर्म एकत्र नांदत आहेत. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, पारसी, अशा अनेकविध धर्मीयांसोबतच इथे गेली हजारो वर्षे यहुदी लोकांनीही आश्रय घेतला आहे. म्हणूनच शिकागोच्या विश्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद म्हणाले होते की,
“मला माझ्या देशाचा अभिमान आहे, जिथे सर्वच देशातील आणि धर्मातील पिडीत आणि शोषित लोकांना आश्रय दिला जातो. मला हे सांगताना अभिमान वाटतो की, आम्ही आमच्या हृदयात इज्रायली लोकांच्या पवित्र स्मृतींनाही जपले आहे. रोमन शासकांनी यांच्या धर्मिक स्थळांवर ह*ल्ले करून त्यांना नेस्तनाबूत केले होते. तेव्हा हे लोक दक्षिण भारतात आश्रयासाठी आले.”
जेव्हा रोमन शासकांनी यहुदिंवर अत्या*चार सुरु केले तेव्हा आपला जीव आणि धर्म दोन्ही वाचवण्यासाठी हे लोक भारतात आले असा अंदाज आहे. यहुदी लोकांनी भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर सुरुवातीला आपली वस्ती वसवली.
यहुदी धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे असे मानले जाते. या धर्माला जवळपास ४००० वर्षांचा जुना इतिहास आहे. आज इस्राइल देशाचा राजधर्म यहुदीच आहे. बायबलच्या पहिल्या खंडात आणि “ओल्ड टेस्टामेंट” या प्राचीन ग्रंथात यहुदींच्या इतिहासाबद्दल बरीच माहिती मिळते.
इसवी सन २००० वर्षापूर्वी झालेल्या प्रेषित हजरत अब्राहम यांच्यापासून या धर्माला सुरुवात होते. मुसलमान प्रेषित हजरत अब्राहम यांना इब्राहीम तर ख्रिश्चन अब्राहम म्हणतात. ख्रिश्चन, मुस्लीम आणि यहुदी तिन्ही धर्मीय लोक हजरत अब्राहम यांना आपले मसीहा मानतात.
आदमपासून अब्राहम आणि अब्राहमपासून मुसापर्यंत यहुदी, ख्रिश्चन आणि मुस्लीम या सर्वांचे प्रेषित एकच होते. परंतु मुसानंतर यहुदींना आपल्या पुढील प्रेषिताची प्रतीक्षा आहे.
प्रेषित अब्राहम यांचे नातू हजरत याकुब यांचे दुसरे नाव इज्रायेल होते. याकुब यांनी यहुदींच्या १२ जातींना एकत्र करून इस्रायल राष्ट्राची निर्मिती केली असे मानले जाते. याकुब यांच्या मुलाचे नाव याहुदा होते. यावरून त्यांच्या वंशजांना यहुदी म्हटले जात असावे, जो पुढे जाऊन त्यांचा धर्म बनला.
यहुदी लोक याहोवा या देवाला मानतात. जसे ख्रिश्चनांमध्ये गॉड आणि मुस्लिमांमध्ये अल्लाह सर्वश्रेष्ठ मनाला जातो, तसेच यहुदी लोक याहोवाला मानतात.
त्यांच्यात मूर्तीपूजा निषिद्ध समजली जाते. ते एकेश्वरवादी आहेत. यहुदींच्या पवित्र ग्रंथाचे नाव आहे ‘तनख.’ हा ग्रंथ हिब्रू भाषेत लिहिलेला आहे. याला तालमुद किंवा तोरादेखील म्हटले जाते.
यहुदींच्या विश्वासानुसार मुसाने पहिल्यांदा ईश्वराकडून हे नाव ऐकले होते. ख्रिश्चनांचे बायबल आणि यहुदींच्या बायबलमध्येही हे नाव अनेकदा येते. ख्रिश्चन धर्मीय तनखलाच ओल्ड टेस्टामेंट म्हणतात. याचा रचनाकाळ सुमारे इसपू. ४४४ ते इसपू १०० च्या दरम्यानचा आहे, असे मानले जाते.
यहुदींच्या इतिहासात अब्राहमनंतर सर्वात जास्त मान हा मुसाला दिला जातो. इजिप्तमध्ये राजा फराओच्या काळात यहुदी लोकांवर खूपच अत्याचार होत होते. मुसाने आपल्या या सर्व यहुदी बांधवांना एकत्र करून इस्रायलला नेले आणि तिथे यहुदी लोकांचा स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले.
मुसाने या विखुरलेल्या परंपरा एकत्र आणून त्याला नवसंजीवनी दिली, म्हणून मुसा हाच यहुदी धर्माचा संस्थापक मानला जातो.
३००० वर्षांपूर्वी महाभारताचे यु*द्ध समाप्त झाल्यानंतर यहुदी धर्माचे १० जमाती भारताच्या काश्मीर भागात विसावल्या होत्या. या लोकांनी हळूहळू स्वतःला बौद्ध आणि हिंदू धर्मियांशी जुळवून घेतले. आजही यांचे वंशज काश्मीरमध्ये अस्तित्वात आहेत. पण, त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आहे. अर्थात, यावर अजून पुरेसे संशोधन होणे गरजेचे आहे.
इस्रायलमध्ये यहुदींचे सुलेमानी हे पवित्र मंदिर होते. आज या मंदिराची फक्त एकच भिंत शाबूत आहे. यहुदी लोक आजही या भिंतीकडे तोंड करून प्रार्थना करतात. याच ठिकाणी मुसाने याहुदींना यहुदी धर्माची शिकवण दिली होती, असे मानले जाते.
भारतात यहुदींचे ३ समुदाय पहायला मिळतात. बेन इज्राईली, कोचीन यहुदी आणि युरोपातून आलेले श्वेत यहुदी. हे तिन्ही समुदाय इथे गुण्यागोविंदाने नांदतात. भारतातील यहुदींच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास मध्ययुगीन काळापर्यंत मागे जातो. या काळात अनेक यहुदी व्यापाराच्या उद्देशाने भारतात आले. पण, यांची संख्या अतिशय तुरळक होती.
अकराव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात यहुदी लोक वास्तव्यास होते, याची साक्ष मिळते. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर यांनी वस्त्या वसवल्या होत्या. सोळाव्या आणि सतराव्या शतकात फारस, अफगाणीस्तान आणि चारासीन येथून आलेल्या यहुदींनी उत्तर भारत आणि काश्मीरमध्ये वास्तव्य केल्याचेही दिसून येते.
यहुदींमधील बेने ईज्राइली समुदाय जवळपास २१०० वर्षापूर्वी भारतात वास्तव्यास आला असे मानले जाते. जेरुसलेम सेंटर फॉर पब्लिक अफेयर यांच्या माहितीनुसार इस्रायल, रशिया आणि इराणनंतर भारतातील यहुदी समुदाय हा जगातील चौथ्या क्रमांकाचा समुदाय आहे.
१९४८ च्या दरम्यान इस्रायलला स्वतंत्र राष्ट्राची मान्यता मिळाल्यानंतर अनेक बेने इज्राइली इस्रायलला निघून गेले. सध्या भारतात यहुदींची संख्या ५००० पेक्षाही कमी आहे.
दक्षिण भारताच्या कोचीनमध्ये राहणारे काळे यहुदी हे भारतात आलेले पहिले यहुदी असावेत असा अंदाज आहे. इज्रायलचा राजा सुलेमानच्या काळात इज्रायल साम्राज्याचे विभाजन झाल्यानंतर हे यहुदी भारतात आले असावेत असे मानले जाते. यांच्यानंतर पश्चिमी युरोपातील हॉलंड आणि स्पेनसारख्या देशातून श्वेत यहुदी भारतात आले. हे लोक प्राचीन सेफर्डिक भाषा बोलत असत. १५ व्या शतकापासून स्पॅनिश आणि पोर्तुगील यहुदी भारतात येऊ लागले.
जगाच्या विविध भागातून व्यापाराच्या आणि आश्रयाच्या शोधात आलेले यहुदी भारताच्या विविध भागात आजही विखुरलेले आहेत. व्यापारी यहुदींचा व्यापार आलेप्पोपासून बगदाद, बसरा ते सुरत/मुंबईपर्यंत, कलकत्तापासून रंगून पर्यंत आणि सिंगापूरपासून हॉंगकॉंग, जपानपर्यंत विस्तारलेला होता.
भारताच्या विविध भागात राहणाऱ्या यहुदींनी तिथली स्थानिक भाषा आत्मसात केली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.