आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारत आणि युरोपियन राष्ट्रे यांच्या दरम्यान प्राचीन काळापासून व्यापारी संबंध आहेत. युरोपियन व्यापाऱ्यांना भारतात मुबलक कच्चा मालासोबतच कारागीर आणि मजूरही मिळत असत. रेशमी आणि सुती कापडासोबतच तत्कालीन व्यापारातील आणखी एक घटक म्हणजे भारतीय मसाले. भारतातील गंगेच्या खोऱ्यात आणि दक्षिण भारतात मसाल्यांची सुपीक शेती होती. युरोपमध्ये या मसाल्यांना त्याकाळी भरपूर मागणी होती.
प्राचीन काळी भारतातून सोन्याचा धूर निघत होता असे जे म्हटले जायचे ते फक्त मुबलक सोने-चांदी सारख्या संपत्तीसाठीच नाही, तर मसाल्यासारखे स्वादिष्ट भारतीय जिन्नसही त्यावेळी परकीय व्यापाऱ्यांना खुणावत असत. मसाल्यांचे सुगंध आणि स्वाद यांच्यामुळेच युरोपियन देश भारताकडे आकर्षित झाले.
वास्को-द-गामा हा पहिला युरोपियन व्यापारी होता ज्याने भारतातील राजांशी मसाल्यांच्या व्यापाराचा करार केला. तसेही युरोपच्या किनाऱ्यावर वसलेला पोर्तुगालही स्वस्तात मसाले मिळवण्यासाठी धडपड करत होताच.
इसवी सनाच्या पूर्वीपासून कित्येक शतके भारत आणि युरोप दरम्यान व्यापार होत होता, असे म्हटले जाते. जे जे परकीय आक्रमक या भारतात आले त्यांच्या येण्यामागे दोन उद्देश होते-
एक तर इथली संपत्ती लुटणे किंवा इथल्या मसाल्याच्या बाजारपेठेवर कब्जा मिळवणे.
कोणे एके काळी युरोपमध्ये इटलीचे मोठे वर्चस्व होते. लाल समुद्राच्या मार्गाने भारत आणि इटली दरम्यान व्यापार होत असे. पश्चिमी घाटात मिळणारी काळी मिरी युरोपियन लोकांना ज्यास्त प्रिय होती.
मालाबारहून मोठ्या प्रमाणात मिरीची निर्यात होत असे. ही मिरी इजिप्तहून इटलीच्या बंदरावर पोहोचत असे. भारत आणि इटली दरम्यान होण्यारा हा थेट व्यापार होता. यात इटलीच्या शेजारी राष्ट्रांचा फारसा सहभाग नसे. पण, इटलीत पोहोचलेला माल तिथून संपूर्ण युरोपात विकला जात असे. त्यामुळे या मसाल्याच्या किंमती अगदी गगनचुंबी होत्या असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
भारताने इराणला जर १००० रु. प्रती किलो दराने काळी मिरी विकली असेल तर, इराण हीच मिरी तुर्कांना २००० रु. प्रती किलो दराने विकत असे. तुर्क पुढे ग्रीसला हा माल पाठवताना ३००० रु. प्रती किलो दराने पाठवत. असे करत करत पोर्तुगाल पर्यंत ही मिरी पोहोचेपर्यंत त्याचा दर दहा हजार रुपये प्रती किलो झालेला असे.
या उदाहरणावरून भारतीय मसाल्यांना युरोपात किती भाव होता हे समजेल.
म्हणूनच पोर्तुगीजांना भारताशी थेट व्यापारी संबंध प्रस्थापित करायचे होते आणि इथल्या बाजारपेठेवर हुकुमत गाजवायची होती. याच हेतूने वास्को-दा-गामा भारताच्या शोधात निघाला होता. युरोपियन लोक मांस-मटण जास्त काळ टिकून राहावे किंवा खराब होऊ नये म्हणून त्याला काळी मिरी लावून सुकवत असत. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात काळी मिरीची गरज भासत असे.
लवंग आणि दालचिनी सारखे मसाले स्वच्छतेसाठी आणि हवा शुद्ध राखण्यासाठी वापरले जात. ऋतूमानानुसार उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवरही हे मसाले त्यांच्यासाठी वरदान ठरत. जायफळ, दालचिनी, वेलदोडे, लवंग अशा अगणित जिन्नसांचा व्यापार त्याकाळी होत असे. यातील प्रत्येक मसाल्याचा स्वतःचा औषधी गुणधर्म तर आहेतच. म्हणून युरोपियन बाजारपेठेत या भारतीय मसाल्यांना त्याकाळीही विशेष मागणी होती. शिवाय, या मसाल्यांमुळे जेवणाचा स्वाद आणि लज्जत वाढते ते वेगळीच!
जेवणाचा रुचकरपणा वाढवण्यासाठी त्याकाळी लोक अनेक प्रकारचे मसाले आणि झाडपाल्याचाही वापर करत. याला युरोपियन लोकही अपवाद नव्हते. खाण्याच्या पदार्थांना विशिष्ट चव, रंग आणि सुवास वाढवणाऱ्या या मसाल्यांना युरोपियन देशात मोठी मागणी होती.
भारताच्या कोचीन किनारपट्टीवरील मालाबार किनाऱ्यावर काळ्या मिरीचे चांगले उत्पादन होत असे. बंगालच्या खाडीत लवंग घेतली जात असे. युरोपला निर्यात केली जाणारी वेलची देखील दक्षिण भारतातच पिकवली जाई.
वास्को-दा-गामाने या मसाल्याच्या व्यापारातून भरपूर फायदा उठवला.
भारतीय राजा जामोरीनशी मसाल्याच्या व्यापाराचा करार करणारा तो पहिला पोर्तुगीज होता. हा करार झाल्यानंतर परत जाताना त्याने मुबलक मसाले स्वतःसोबत पुर्तुगालला नेले. यानंतर पोर्तुगीजांनी मसाल्याच्या व्यापारात अरब राष्ट्रांनाही मागे टाकले.
वास्को-दा-गामाने पहिल्या खेपेतच भारतीय मसाल्यांची बाजारपेठ आणि इथल्या प्रचंड संपत्तीचा अंदाज घेतला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा तो भारतात आला ते व्यापारी चौक्या प्रस्थापित करण्याच्या इराद्यानेच.
पोर्तुगीजांनी समुद्री मार्गावर स्वतःची इतकी दहशत निर्माण केली होती की, मुघलांना देखील समुद्र मार्गाने व्यापार करताना पोर्तुगीजांची अनुमती घ्यावी लागत असे.
१५११ पर्यंत पोर्तुगीजांनी भारतीय मसाल्यांची बाजारपेठ पूर्णतः नियंत्रणात ठेवली. यातून पोर्तुगीजांना अमाप फायदा मिळाला. त्याकाळी काळ्या मिरीला तर जवळपास सोन्याचा भाव होता. पोर्तुगीजांना त्याकाळी भरघोस उत्पन्न मिळवून देणारी दोन साधने होती. एक म्हणजे आफ्रिकेतून होणारा सोन्याच्या व्यापार आणि दुसरा भारतातून केला जाणारा मसाल्याचा व्यापार. यात भारतीय मसाल्याच्या व्यापाराचे प्रमाण जरा जास्तच होते.
हळूहळू या व्यापारात इतर युरोपियन राष्ट्रांचा रस वाढला. त्याबरोबर पोर्तुगीजांचे स्पर्धकही वाढले. पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच, फ्रेंच, डॅनिश व्यापारी आणि इंग्रजही भारतात येण्यास अधीर झाले होते. या सर्वांनी हळूहळू भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले. इंग्रजांनी तर व्यापाराच्या निमित्ताने संपूर्ण देशावरच कब्जा मिळवला. यासाठी त्यांनी आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
फक्त भारतीय मसालेच नाही तर आयुर्वेदिक जडीबुटी, रत्न आणि अनेक मौल्यवान धातूंची निर्यात फार पूर्वीपासून चालत असे. आज या मसाल्यांची किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्यातली असली तरी, त्याकाळी या मसाल्यांना सोनेचांदीचा भाव होता. त्यातही काळी मिरी विशेष महाग होती.
भारतातील अमाप संपत्ती आणि हे सुवासिक मसाले पाहून युरोपियन व्यापाराच्या तोंडाला जास्तच पाणी सुटले. इंग्रजांनी तर भारताची कितीप्रकारे लुट केली हे जगजाहीरच आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.