आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
एखाद्या देशाला जेव्हा नैसर्गिक आपत्तीचा सामना हा आपत्ती आल्यावर नाही, तर आपत्ती येऊन गेल्यावर पुन्हा सर्व पूर्व स्थितीत उभं करण्याच्या वेळी करावा लागतो. जर एखादा देश, एखाद्या समस्येचा सामना करत असेल तर तो देश पुन्हा उभा करणे हे फार कठीण कार्य असते.
रोगराई, आर्थिक व वित्तीय नुकसान, अन्न-पाण्याचा तुटवडा, विखुरलेले कुटुंब आदी सर्व गोष्टींवर मात करून प्रवास सुरु राहत असतो. एखाद्या देशाला नैसर्गिक आपत्तीच्या धक्क्यातून सावरायला काही महिने लागतात तर काही देश कित्येक वर्ष ते करू शकत नाही.
जपानला नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याचा एक मोठा इतिहास राहिला आहे. एका विजेमुळे त्याठिकाणी एक अख्खा किल्ला जळून नष्ट होण्यापासून ते २०११ ला मोठ्या विनाशकारी भूकंपात आणि त्सुनामीत संपूर्णपणे बेचिराख होण्यापर्यंत असा हा संहाराचा इतिहास असला, तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जपान तितक्याच ताकदीने पुन्हा उभा राहतो. जपानला हे कसं शक्य होतं, असा प्रश्न सर्वांना पडत असतो.
जपानचा समाज हा अत्यंत यांत्रिक पद्धतीने कार्यरत असतो असं आजवरचा ग्रह होता. पण मुळात तसं नाही, तो एक एकरूप असा समाज आहे, त्यांच्या एकतेची प्रचिती जेव्हा त्यांचा समाज एकमेकांना नैसर्गिक आपत्तीत कशाप्रकारे उभं करतात ह्यावरून येते. आज जपानला जेव्हा एखाद्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो तेव्हा जपानच्या लोकांना आधार देण्यासाठी त्यांच्या जवळचा सामाजिक फंड कामी येतो.
हा सामाजिक फंड आपत्तीपूर्व काळात साठवला जातो आणि आपत्ती येऊन गेल्यानंतर ह्या फंडाचा वापर लोकांना गरजेच्या गोष्टी पुरवण्यासाठी आणि पुन्हा सर्व नव्याने उभं करण्यासाठी केला जातो.
विविध सामजिक संघटना देशात कार्यरत आहेत. जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता वाढीस लागते तेव्हा जपानच्या लोकांना पुरेपूर काळजी कशी घ्यायची आणि काय उपाययोजना तत्काळ अंमलात आणायच्या याचं संपूर्ण प्रशिक्षण मिळालेलं असतं.
जर एखादी नैसर्गिक आपत्ती येण्यची सूचना मिळाली तर सर्वात आधी आपलं सामान घेऊन एखाद्या उंच ठिकाणी जाण्याचं काम ते करतात. उंचावर मंदिरं आणि टाऊनहॉलची निर्मिती ह्याच अनुषंगाने केलेली असते. जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा लोक तेथे वास्तव्यास जातात.
नैसर्गिक आपत्तीची आणि काय काळजी घ्यावी यासंबंधीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून ह्या यंत्रणेच्या बळावर सरकार आपत्ती येण्याच्या अगोदरच लोकांना वेळीच सुरक्षित घटनास्थळी हलवण्यात यशस्वी होत असते.
सरकारच्या जलद कृती आणि आपत्ती बचाव यंत्रणेच्या कार्यामुळे जपानमध्ये जीवितहानी टाळणे शक्य झालं आहे. जपानमध्ये आपल्या खाजगी मालमत्तेचं नुकसान झाल्यावर त्याची भरपाई करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न जपान सरकार करत असते. यासाठी लोकांना विविध ५२ प्रकारच्या विम्यांचे संरक्षण उपलब्ध आहे.
जपानच्या प्रत्येक नागरिकाला नैसर्गिक आपत्तीच्या काळात स्वतःचा जीव कसा वाचवायचा याचं प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. जपान सरकार आज वेगवेगळ्या पद्धतीने शाळा महाविद्यालयात याचं प्रशिक्षण देखील देत असते. जपानच्या सैन्यात आपत्ती बचाव यंत्रणेची एक वेगळी तुकडी कार्यरत आहे.
२०११ सालच्या फुकोशिमा अणु दुर्घटनेसारखे प्रकार रोखता यावे यासाठी तेथे विविध यांत्रिकी अलर्ट सिस्टम तयार करण्यात आलेल्या आहेत. यामुळे आपत्ती नंतर अणु संकट उभं राहत नाही.
आपत्ती काळाच्या आठवणी जपणे-
जपानमध्ये असलेल्या कमर्शियल आणि सरकारी यंत्रणेची कार्यालये हे फार लवकर पूर्वपदावर येतात. जपानची अर्थव्यवस्था जास्त काळ होल्डवर राहत नाही. जपानच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तींचा परिणाम होणार नाही याची पुरेपूर काळजी जापान सरकारने आधीच घेउण ठेवली आहे. परंतु जपानमध्ये आपत्तीमुळे अनेक भागांचं प्रचंड नुकसान देखील होत असतं.
ह्या नुकसानामुळे खचून न जाता जपानी लोक त्या नुकसानग्रस्त जागा, इमारती यांचं जतन करतात. जपानचे लोक त्या जागेवर त्या आपत्ती वा दुर्घटनेची आठवण म्हणून स्मारकाची निर्मिती करतात आणि भग्न वास्तूंचे जतन करतात.
हिरोशिमा दुर्घटना जरी मानवनिर्मित दुर्घटना असली तरी ह्या दुर्घटनेमुळे एखाद्या नैसर्गिक आपत्तीपेक्षा भयानक परिस्थिती उभी राहिली होती. हिरोशिमा पीस पार्क म्युझियम हे आज सुद्धा हे त्याच कटू आठवणीचं स्मारक आहे. ह्या स्मारकात अणुहल्ल्या आधीची आणि नंतरची हिरोशिमा यांचं स्वरूप उभं करण्यात आलं आहे.
ज्या जागी अणु बॉम्ब पडला त्या जागेवर औद्योगिक केंद्र होती, आज त्याच औद्योगिक केंद्राच्या भग्न अवशेषाच्या आवती भोवती हे स्मारक उभारण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अणु हल्ल्या नंतर मरूस्थळ बनलेल्या जागेवर त्यांनी एका सुंदर उद्यानाची निर्मिती केलो आहे.
जपानमध्ये १९९५ साली कोबे ह्या शहरात मोठा भूकंप आला होता. ६००० पेक्षा जास्त लोकांनी ह्या भूकंपात आपले प्राण गमावले होते. मोठ्या प्रमाणावर इमारती आणि सार्वजनिक वित्ताचे नुकसान झाले होते.
रेल्वे लाईन पासून भुयारी मार्गांपर्यंत सर्व गोष्टींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कोबेचं बंदरच ह्या दुर्घटनेत नेस्तनाबूत झालं होतं. पण कालांतराने कोबेच्या लोकांनी ह्या दुखद घटनेची आठवण म्हणून त्या जागी असलेल्या अवशेषांचे संवर्धन करून स्मारकाची निर्मिती केली.
आज ह्या दोन्ही स्मारकांना बघितल्यावर गेल्या शतकभरात जणू कुठली नैसर्गिक आपत्ती आलेली नाही, याचीच प्रचिती येत होती. आज जपानचं हे स्मारक आपल्यासमोर एक आदर्श म्हणून उभं आहे, जपानी लोकांच्या जिद्दीचं, त्यांच्या एकमेकांप्रतीच्या दृढ विश्वासाचे हे स्मारक प्रतिक आहे.
कुठल्याही संकटाचा सामना कसा करावा आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं हे जपानकडून शिकायला हवं. जपान हा पुन्हा कसा उभा राहतो हे जाणणे रंजक असले तरी त्याची उत्कट राष्ट्रभावना समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.