आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
1967 चा जून महिना उजाडला होता. घडामोडी कमालीच्या जलद झाल्या होत्या. इस्राईलच्या विरोधात इजिप्त, सीरिया, जॉर्डन, सौदी अरेबिया, इराक, कुवेत, सुदान, अल्जेरिया आणि येमेन या देशांची फौज एकवटली होती. युद्धाच्या विरोधात असणारे आणि अतिशय शांत, मवाळ स्वभावाचे इस्राईलचे पंतप्रधान, लेव्ही एश्कॉल यांनी अचानक 1जूनला अचानक मोशे देयान यांना संरक्षण मंत्री केलं.
गेल्या दोन तीन महिन्यांत हालचाली गतिमान झाल्या होत्या. ‘सिक्स डे वॉर’ (Six Day War) नावानं ओळखल्या जाणाऱ्या आणि मध्य पूर्वेचा नकाशा बदलून टाकणाऱ्या या युद्धाचा शंखनाद झाला होता. आता युद्ध अटळ होतं…
खरंतर या युद्धाची पार्श्वभूमी इस्राईलच्या जन्मापासूनची होती. दुसरं महायुद्ध संपताना सौदी अरेबियानं आपल्या तेलाच्या बदल्यात अमेरिकेकडून एक आश्वासन पदरात पाडून घेतलं होतं. ते म्हणजे सौदीला विचारल्याशिवाय अमेरिका इस्राईल बाबत कोणताही निर्णय घेणार नाही.
दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडची जगावरची पकड सैल होऊ लागली होती. इंग्लंडने पॅलेस्टाईनमधून काढता पाय घेतला होता. जगभरातून ज्यू लोकांचा ओघ आता पॅलेस्टाईनकडं सुरू झाला होता. शेवटी 1947 मधे संयुक्त राष्ट्रसंघात पॅलेस्टाईनच्या फाळणीचा प्रस्ताव मंजूर झाला.
सौदी अरबला ही गोष्ट मान्य होणं शक्यच नव्हतं. सौदीनं ज्यूंवर हल्ले सुरू केले. अशातच 14 मे 1948 ला इस्राईलच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. पराकोटीचा अमानुष छळ सहन केलेल्या ज्यू लोकांच्या इस्राईलचा जन्मच संघर्षानं झाला होता. सोव्हिएत पाठोपाठ अमेरिकेनं इस्राईलच्या निर्मितीला पाठिंबा दिला. पण अमेरिकेकडून होणारी प्रचंड गुंतवणूक, त्यातून मिळणाऱ्या अफाट पैशांकडं बघून सौदी शांत बसला. पण इस्राईल सोबत त्यांची कुरबुर कायमचीच झाली होती.
बाजूनं असणारे इजिप्त, सिरिया, पॅलेस्टाईन आणि जॉर्डन या सगळ्यांनाच इस्राईल पुरून उरला होता. आता तेलाचा पैसा खेळू लागल्यानं आता सगळे इस्राईल विरोधात एकवटू लागले होते. त्यातच 1956 साली इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासिर यांनी सुएझ कालवा अडवला होता. जगभरातील तेल वाहतूक बंद झाली होती. त्यामुळं इस्राईलनं इंग्लंड आणि फ्रान्सच्या साहाय्यानं सुवेझवर हल्ला चढवला होता, त्यामुळं इजिप्त सकट त्याची सल सगळ्यांच्याच मनात होती. त्यानंतर इस्राईलच्या सगळ्या बॉर्डर्स वर सतत लहान मोठी युध्दं सुरूच असायची.
1967 च्या एप्रिल महिन्यात इस्राईलनं 6 सीरियन मिग विमानं पाडली. त्यातून प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सोव्हिएतच्या इंटेलिजन्स विभागानं इस्राईल उत्तरेच्या बॉर्डरवर सैन्य पाठवून सिरिया ताब्यात घेणार असल्याचंही सांगितल्यावर अजूनच ठिणगी पडली.
याला उत्तर म्हणून 22 मे दिवशी इजिप्त, सिरिया आणि जॉर्डन यांनी मिळून तिरानची सामुद्रधुनी बंद करून इस्राईलचा गळा आवळला होता.
या सगळ्या दरम्यानच पुढं मेच्या शेवटी, गमाल अब्दुल नासिर यांनी पुढाकार घेऊन इजिप्त आणि जॉर्डन मध्ये एक करार केला. इस्राईलनं जर कोणावर हल्ला केला, तर दुसरा देश त्याला मदत करेल. म्हणजेच इस्राईलने कोणावरही हल्ला केला, तर तो इजिप्त वर हल्ला मानला जाणार होता. आणि त्यात इतर देश अप्रत्यक्ष सहभागी होणार हे उघडच होतं.
सिरियावर इस्राईलकडून होणाऱ्या हल्ल्याची माहिती मिळाल्यावर नासिर यांनी सिनाईच्या द्वीपकल्पावर आपलं सैन्य धाडलं. तिथं आधीपासूनच तैनात असणारं संयुक्त राष्ट्रसंघाचं पीस किपिंग फोर्सचं सैन्य बाजूला करण्यात आलं होतं.
इकडे इजिप्त, सिरिया, जॉर्डन आणि इतर अरब देशांनी युद्धाची सगळी जुळवाजुळव केली होती. तिन्ही बाजुंनी इस्राईलला घेरण्याची तयारी केली होती. त्यांच्या दिमतीला 2 लाख 40 हजारांची फौज, जवळपास 3 लाख राखीव दल, 957 लढाऊ विमानं आणि 2504 रणगाडे होते.
तर इस्रायली सैन्याकडं 50 हजार फौज, 2 लाख 40 हजार राखीव दल, 300 लढाऊ विमानं आणि 800 रणगाडे दिमतीला होते. इस्राईल लष्करी ताकदीला कमी होता.
शेवटी जून महिना उजाडला. अचानकपणे संरक्षणमंत्री झालेले मोशे देयान आता रियल हिरो होणार होते. त्यांनी युद्धाच्या धामधुमीत एक आश्चर्यकारक घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, इस्रायली सैन्य सुट्टीवर गेलं आहे, आणि हवाई दलाचं ट्रेनिंग सुरू आहे. सगळे जग गाफील राहिले.
ताकदीनं कमी असल्यामुळं पहिला हल्ला इस्राईलला करणं क्रमप्राप्त होतं. आणि शेवटी 5 जूनचा दिवस उजाडला.
इस्राईलची 200 लढाऊ विमानं हवेत झेपावली. त्यांनी थेट जॉर्डन मधला अरब देशांचा सैन्यतळ गाठला. ‘ऑपरेशन फोकस’ या नावाखाली केलेला हा हल्ला एवढा भयंकर होता, की तीनच तासांत इस्राईलच्या या लढाऊ विमानांनी 18 वायुतळ उध्वस्त केले. जॉर्डन मधली विरोधकांची तब्बल 90% लढाऊ विमानं जागेवरच बेचिराख करून टाकली. सगळी वायुसेना च संपवल्यावर अरब राष्ट्रं सैरभैर झाली. आता युद्ध फक्त जमिनीवर उरलं होतं.
इस्राईलच्या सैन्याला कव्हर फायर द्यायला लढाऊ विमानं असल्यामुळं इस्राईल अक्षरशः तुटून पडला. इस्रायली फौजा इजिप्त मध्ये घुसल्या. 6 जूनला सिनाई द्वीपकल्पावर ताबा मिळवला. गाझा पट्टी ताब्यात घेतली. तर 7 जूनला जॉर्डन कडून पूर्व जेरुसलेम बळकावलं. शेवटच्या टप्प्यात म्हणजे 9 जून ला सीरियन आर्मीला नेस्तनाबूत करून गोलनच्या टेकड्या ताब्यात घेतल्या.
इस्राईली सेना एवढ्या त्वेषानं लढली, की फक्त 132 तासांत 21 हजारांवर जास्त विरोधी सैन्याला यमाकडे पाठवलं. शेवटी 10 जून ला संयुक्त राष्ट्रसंघानं हस्तक्षेप करून युद्ध थांबवलं. युद्ध 5 जून ते 10 जून दरम्यान केवळ सहा दिवसच चाललं.
इस्राईलने जिनिव्हा करार मोडला होता. मानवाधिकारावर पाणी फिरवलं होतं. दुसरीकडं नासिर यांनी राजीनामा दिला. अर्थात ते परत सत्ताधीश झाले. तर इस्राईल मध्ये गोल्डा मायर पंतप्रधान झाल्या. एवढ्या सगळ्यांत युद्धाचे हिरो ठरलेल्या मोशे देयान यांना राजकारणामुळं राजीनामा द्यावा लागला.
इतिहासात हे युद्ध कायम स्वतःची जागा निर्माण करून गेलं. एकटा टीचभर इस्राईल तब्बल आठ अरब राष्ट्रांच्या विरोधात एकट्यानं लढला होता. फक्त लढलाच नाही, तर 6 दिवसांत सगळा भूगोल बदलून टाकला, जिंकला.
युद्धासाठी कोण जबाबदार होतं आणि कोण नाही, महत्वाचं नसतं. युद्धानंतर काय झालं हे महत्वाचं असतं. कारण ‘History remembers the battle, and forgets the blood’
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.