आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
‘गरज शोधाची जननी आहे’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. जोपर्यंत माणसाला एखाद्या गोष्टीची गरज निर्माण होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी माणूस प्रयत्न सुरू करत नाही. जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा या गरजेतून माणूस अनेक गोष्टी साकार करत असतो. मानवी सभ्यतेचा इतिहास आज ह्याची प्रत्यक्ष साक्ष देतो आहे.
आपल्या देशातील ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांना आयुष्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. शहरात व निमशहरी भागात वास्तव्यास असलेल्या आणि खुर्चीवर बसून काम करणाऱ्या आपल्या सारख्यांना त्या ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी व त्यांना आपल्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी करावे लागणारे कष्ट याची अनुभूतीच नाही आहे. आपल्याला जे सहज उपलब्ध होते त्यासाठी त्या लोकांना द्रविडी प्राणायम करावे लागतात.
पाण्यासाठीच हे लोकं तब्बल २-३ किलोमीटरची पायपीट करत असतात. पण ह्याच अनेक अशा अडचणीवर मात करत ह्या ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या समस्येवर समाधान शोधायला सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन मार्ग शोधायला सुरुवात केली आहे, ह्यातूनच अनेक शोध ह्या लोकांनी लावले आहेत. ह्या शोधांबद्दल आज शहरातील जनता संपूर्णपणे अनभिज्ञ आहे. ग्रामीण भागातील लोकांनी कुठल्याही विज्ञानाचे ज्ञान नसतांना असे शोध लावले आहेत की आजच्या विज्ञान विभूषित लोकांना देखील लाजवल्या खेरीज राहणार नाहीत.
आज आम्ही तुम्हाला ग्रामीण भागातील अशा दहा संशोधनांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी भारतातच नव्हे तर जगभरात कीर्ती मिळवली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था ह्या ग्रामीण भागातील संशोधकांचा गौरव करत आहेत.
१) मिट्टीकुल
गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील एका खेडेगावात राहणाऱ्या मनसुखभाई प्रजापती ह्यानी इको फ्रेंडली रेफ्रिजरेटर तयार केले असून त्याला मिट्टीकुल असे नाव दिले आहे. मनसुखभाई हे कुंभार असून मडके बनवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. रेफ्रिजरेटरच्या रचनेला लक्षात घेऊन त्यांनी मातीच्या रेफ्रिजरेटरची निर्मिती केली असून पदार्थं थंड करण्यात हे मातीचे रेफ्रिजरेटर देखील महत्वपूर्ण भूमिका बजावतात, ह्यांना वीजेची देखील गरज पडत नाही. हे पर्यावरणपूरक रेफ्रिजरेटर आता ऑनलाइन उपलब्ध आहे.
२) कापणी आणि काढणी यंत्र
शेतकऱ्याचा बहुतांश वेळ हा शेतीची मशागत करण्यात आणि आलेल्या पिकाची काढणी व कापणी करण्यात जात असतो. भगवान सिंह डांगी ह्यांच्या मते लहान शेतकऱ्यांना ह्यासाठी कष्ट करावे लागतात. अशा शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणूनच त्यांनी कापणी काढणी यंत्राची निर्मिती केली आहे. ह्यामुळे शेतीशी निगडित दोन्ही प्रक्रिया अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडल्या आहेत.
३) मिल्किंग मशीन
राघव गौडा ह्या कर्नाटकच्या शेतकऱ्याने एका अशा यंत्राचा आविष्कार केला आहे ज्याच्या मदतीने लोक अत्यंत सहजपणे गायी म्हशीचं दूध काढू शकतात. हे काही प्रमाणात स्वयंचलित यंत्र असून ह्याचा मदतीने एकाच वेळी दोन पशूंचे दूध काढणे सहज शक्य होते. गौडा ह्यांना त्यांच्या ह्या संशोधनासाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे. क्षीरा एंटरप्राइज ह्या नावाखाली त्यांनी ह्या यंत्रांच्या निर्मितीचे पेटंट आपल्या नावी देखील करून घेतले आहे.
४) गॅसवर चालणारी इस्त्री
ग्रामीण भागातील लोकांना प्रामुख्याने विजेचा आणि कोळश्याचा तुटवडा भासत असतो, ह्यामुळे इस्त्रीसाठी आता गॅसचा वापर करण्याचा नवीन मार्ग के लिंगा ब्राम्हण ह्या व्यक्तीने पुढे आणला असून त्यांनी गॅसवर चालणाऱ्या इस्त्रीचे संशोधन केले आहे. त्यांच्या ह्या उपकरणाला राष्ट्रीय संशोधन संस्थेने आर्थिक सहाय्य प्रदान केले आहे. त्यांच्या ह्या गॅस इस्त्रीमुळे एका तासाला इस्त्रीसाठी फक्त १.८ रुपये इतका क्षुल्लक खर्च येतो. टेलर आणि ड्रायक्लिनिंग करणाऱ्या लोकांसाठी हे उपकरण फायदेशीर ठरू शकतं.
५) विना वीज आणि विना डिझेल चालणारी पाणचक्की
उत्तर प्रदेशातील भैलोनी ह्या अत्यंत छोट्या गावचे निवासी असलेल्या मंगल सिंग नामक व्यक्तीने एका अल्प खर्चात एका अशा पाणचक्कीची निर्मिती केली आहे, जिच्या मदतीने शेतकऱ्यांना आपल्या विहिरीतून वीज व इंधनाचा वापर न करता पाणी काढणे सहज शक्य होते आहे.
६) परपेच्युअल पेंटब्रश
रंगकाम करताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे आपल्याला पेंट ब्रश पुन्हा पुन्हा रंगात बुडवावा लागतो. पण आता ही समस्या दूर होणार आहे. जहांगीर अहमद नावाच्या एका व्यक्तीने असा पेंट ब्रश बनवला आहे जो पेंट पंप करतो, ज्यामुळे आपोआप त्याच्या दर्शनी भागात रंग जमा होतो, ज्यामुळे त्याला रंगाच्या बादलीत पुन्हा पुन्हा बुडवण्याची गरज पडत नाही.
७) नारळ तोडणी यंत्र
दिवंगत एम जे जोसेफ नावाच्या एका व्यक्तीने आपल्याला झाडावरून नारळ तोडायला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अशा उपकरणाची निर्मिती केली आहे ज्याच्या मदतीने झाडावर न चढता सहजतेने नारळ तोडणे शक्य होणार आहे. ह्यात वेळ आणि श्रम दोघींची बचत तर होतेच सोबत जीव धोक्यात घालावा लागत नाही.
८) पायांच्या गतीवर चालणारे वॉशिंग मशीन
रेम्या जोस ह्या एका शाळकरी मुलीची आई हाताने कपडे धुते म्हणून सतत आजारी पडायची, तिच्या आईची अडचण लक्षात घेऊन ह्या मुलीने एका अशा वॉशिंग मशीनची निर्मिती केली जे सायकल प्रमाणे कार्य करते. तुमच्या पायांच्या गतीवर ह्या वॉशिंग मशीनचे काम होते. ह्यासाठी ना वीज लागते ना इंधन. रेम्याच्या ह्या संशोधनाचे सर्वत्र कौतुक होते आहे.
९) वॉटर वॉकर्स
उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील द्वारका प्रसाद ह्या व्यक्तीने एका स्पेशल पाण्यावर चालण्यासाठी उपयोगी येणाऱ्या बुटांची निर्मिती केली आहे, यासाठी थर्माकोलचा वापर केला आहे. त्यांचे हे संशोधन पाणथळ जागेत चालण्यासाठी उपयुक्त असून त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे, कारण ह्या प्रकारचे संशोधन आजपर्यंत जगात फार कमी झाले आहे.
१०) १४० उपकरणांचा जनक
उद्धब भराली नावाच्या एका गृहस्थाने पीक लागवडी पासून ते त्या पिकाला खाण्यायोग्य बनवण्याच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या अशा तब्बल १४० कृषी संबंधित उपकरणांची निर्मिती केली असून त्यांच्या ह्या संशोधनाचा अमेरिकन स्पेस एजन्सी नासाकडून गौरव करण्यात आला आहे.
हे ग्रामीण भागातील १० शोध हे सिद्ध करतात की कुठल्याही प्रकारच्या संशोधनासाठी दरवेळी विज्ञान तंत्रज्ञान ह्या विषयी ज्ञान असणे आवश्यक नसते, काहीवेळा आपल्याला फक्त कुठल्या तरी समस्येवर उपाय शोधण्याची एक निकड निर्माण झाली पाहिजे. एकदा ती गरज निर्माण झाली की मनुष्य शोधांना जन्म देत असतो.
हे ग्रामीण संशोधक आज प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या अडचणींवर मात करत आहेत, हे निश्चितच प्रेरणादायी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.