आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
राणी व्हिक्टोरियाच्या मृत्यूनंतर सातव्या एडवर्डला तिचा वारसदार घोषित करण्यात आले. जून १९०२ मध्ये राजा एडवर्डचा राज्याभिषेक करण्याचे निश्चित करण्यात आले. एडवर्डच्या राज्याभिषेकासाठी त्याने भारतातील काही संस्थानिकांनाही आमंत्रण दिले होते. यामध्ये जयपूरचे सवाई माधव सिंह दुसरे यांचाही समावेश होता.
पण, त्याकाळी भारतीय लोकांवर धार्मिक रुढींचा मोठा पगडा होता. हिंदू शास्त्रानुसार सप्तसिंधू ओलांडणे हे गंभीर पातक होते. समुद्र ओलांडल्याने वर्ण पातकाचा दोष लागतो असा समज त्याकाळच्या हिंदूमध्ये प्रचलित होता.
आपल्या वर्णाची अधोगती होते आणि आपला वर्ण सोडून आपण खालच्या वर्णात ढकलले जातो, असेही मानले जायचे. शिवाय, परदेशी भूमीत भारतीय प्रथेप्रमाणे आचारण करणे कठीण जाईल, असाही एक समज होताच.
पण, ब्रिटीश साम्राज्याची प्रजा आणि त्यांचे मांडलिक म्हणून राजाच्या राज्याभिषेकासाठी न जाणे हे देखील शिष्टाचाराला धरून नव्हते. मग यावर काय उपाय योजावा हा एक गहन प्रश्न होता. राज्याभिषेकाला तर जाता आले पाहिजे, पण, आपला धर्मही भ्रष्ट व्हायला नको, असा काही तोडगा काढण्यासाठी सवाई माधवसिंहांनी ब्राह्मणांची सभा बोलावली आणि त्यांना यावर उपाय शोधण्याची विनंती केली.
यावर महाराजांच्या मुख्य ब्राह्मणाने एक तोडगा सुचवला. महाराजांनी जहाजाने प्रवास करावा. हा प्रवास करताना जहाजावर मांसाहार अजिबात करू नये. इतरांनाही करू देऊ नये, आणि त्यांच्या प्रवासात आणि इंग्लंडमधील वास्तव्या दरम्यान त्याच्या सर्व प्रकारच्या धार्मिक आणि दैनंदिन कामासाठी फक्त गंगाजलाचा वापर करावा. या तोडग्यामुळे महाराजांना थोडासा दिलासा मिळाला. त्यांनी इंग्लंडला जाण्याची तयारी सुरु केली.
जहाजाने जाण्याचे नियोजन असल्याने त्यांनी थॉमस कुक या प्रवासी वाहतूक करणाऱ्या जहाज एजन्सीकडून एसएस ऑलिम्पिया हे जहाज भाड्याने घेतले. यासाठी त्यांनी त्याकाळी १.५ लाख रुपये भाडे दिले. जहाजावरील एका खोलीला त्यांनी चक्क मंदिरात रुपांतरीत केले.
त्यांनी आवश्यक तितके गंगाजल साठवण्यासाठी दोन मोठे कलश घेतले. यातील प्रत्येक कलशात चार हजार लिटर इतके पाणी साठवण्याची क्षमता होती. हे कलश १८९४ मध्ये बनवण्यात आले होते. यासाठी १४००० चांदीची नाणी वितळवण्यात आली होती.
जयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये हे कलश आपल्याला पाहायला मिळतात. जगातील सर्वांत मोठे चांदीचे कलश म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची नोंद केली आहे.
सवाई माधवसिंह रयतेच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी ओळखले जातात. जयपूर शहराची “गुलाबी शहर” म्हणून असलेली ओळख त्यांनीच निर्माण केली. त्यांच्याच कालखंडात जयपूरमधील सर्व घरांना गुलाबी रंग देण्यात आला होता. राजा एडवर्ड भारत भेटीवर आला असता, त्यालाही या गुलाबी शहराने अवाक् करून सोडले होते.
जयपूरच्या शाही सोनारांना चांदीचे हे तीन कलश बनवण्यासाठी दोन वर्षांचा कालवधी लागला होता. मात्र, एवढे मोठे कलश त्याकाळी कशासाठी बनवण्यात आले होते, याची माहिती कुठेही सापडत नाही. पण, १९०२ मध्ये जेंव्हा सवाई माधवसिंह इंग्लंडच्या दौऱ्यावर निघाले तेव्हा यातील दोन कलशांचा वापर झाला. आजच्या बाजार भावानुसार या कलशांसाठी वापरण्यात आलेली चांदी सुमारे ५ करोड रुपये किमतीची आहे.
महाराजांनी या प्रवासात स्वतःसोबत घरातील देवसुद्धा घेतले होते. देवतांच्या या मुर्त्यांखाली त्यांनी जयपूरची माती टाकली होती आणि त्यावर या मुर्त्या स्थापन केल्या होत्या. महाराजांच्या पलंगाखालीही हीच माती पसरण्यात आली होती. जणू महाराज जयपूरच्याच भूमीवर होते. या तीन महिन्याच्या काळात महाराजांनी फक्त देवतांना अर्पण केला जाणारा प्रसाद आणि गंगाजल यांचेच सेवन करावयाचे होते.
या सर्व कर्मकांडांचे यथोचित पालन होते आहे की नाही याकडे लक्ष देण्यासाठी महाराजांनी आपल्यासोबत मोठा लवाजमा घेतला होता. जहाज मुंबईतून मार्गस्थ होण्याआधी वरुण या जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी यज्ञयाग करण्यात आला. यासाठी मोती, हिरे आणि सुवर्ण नाणी समुद्रात अर्पण करण्यात आली. यानंतर पाण्याचे हे कलश जहाजावर चढवण्यात आले आणि महाराजांचा प्रवास सुरु झाला.
मुंबई बंदरातून निघाल्यानंतर काही दिवसांनी समुद्रात मोठे वादळ उठले. हे वादळ शांत व्हावे म्हणून जहाजावरील ब्राह्मणांनी त्यातील एक कलश समुद्रात विसर्जित करण्यास सांगितले. कलश विसर्जित केल्याने वरुण देवता शांत होईल असा ब्राह्मणांचा अंदाज होता. हे कलश विसर्जित केल्यानंतर समुद्रातील वादळ शांत झाले.
महाराजांचा ताफा इंग्लंडमध्ये पोचल्यावर ब्रिटीश पत्रकारांमध्ये खूपच उत्सुकता ताणली गेली. अनेक ब्रिटीश वृत्तपत्रांनी महाराजांच्या या भल्या मोठ्या ताफ्याची आणि त्यामागच्या कारणांची मीमांसा केली. राजाच्या राज्याभिषेकासाठी आलेल्या या पौर्वात्य पाहुण्यामुळे पश्चिमात्यांमध्ये पौर्वात्य रूढी-परंपराबद्दल कुतूहल निर्माण झाले.
“जयपूरच्या महाराजांच्या ताफ्यात कित्येक टनांचे सामान, यामध्ये देवीदेवता आणि पवित्र जल यांचाही समावेश,” अशी बातमी अबर्दिन जर्नलने छापली होती.
याचवेळी डेली न्यूजने “पाश्चिमात्य विचारांना अनोळखी असणारी पौर्वात्य पाहुण्यांचे धार्मिक विधी” अशा मथळ्याखाली तपशीलवार माहिती दिली होती.
या राज्याभिषेकासाठी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बर्म्युडा असे देशोदेशीचे सैन्य उपस्थित होते. दरम्यान राजा एडवर्ड यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा राज्याभिषेक पुढे ढकलण्यात आला. माधवसिंहांनी राजांना रत्नजडीत तलवार भेट दिली आणि ते तत्काळ परतीच्या प्रवासाला निघाले. एक हिंदू राजा आणि एक संस्थानिक अशा दोन्ही भूमिका प्रामाणिकपणे पार पाडल्याचे समाधान त्यांना मिळाले.
“एक राजपूत हिंदू आणि संस्थानिक म्हणूनही मी माझी कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पडल्याचे मला समाधान आहे”, असे त्यांचे विधान अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. त्यांचा परतीचा प्रवासही सुखरूप झाला. जयपूरच्या इतिहासकारांच्या मते, महाराजांसोबतचे हे कलश पाहण्यासाठी राजा एडवर्डने देखील माधवरावांच्या शामियानाला भेट दिली होती. जयपूरच्या पॅलेसमध्ये आजही यातील दोन कलश जतन करून ठेवण्यात आले आहेत. तिसरा कलश आजही तांबड्या समुद्राच्या तळाशी कुठेतरी विसावला असेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.